ग्लॅम-फूड : ‘चौरस आहारच आवडतो’

मी सकाळी उठल्यावर गरम पाणी पिते आणि मग साधारण अर्धा तास वर्कआऊट करते. मध्यंतरी मी ३३ दिवसांचे फिटनेस चॅलेंज ॲक्सेप्ट केले होते.
Nikita Patil
Nikita PatilSakal

मी तशी ‘खानदेश कन्या.’ खानदेशी पद्धतीतील पदार्थ म्हणजे खापराची पुरणपोळी, पिठले, मसाल्याची खिचडी, कढी, मिरचीचा ठेचा, मसाल्याच्या पाटोड्याची भाजी, वांग्याचे भरीत, ज्वारी- बाजरी आणि कळण्याची भाकरी मला प्रचंड आवडते. मुंबईहून चाळीसगावला घरी येते, तेव्हा रोज एकदा तरी कढी-खिचडी आईला करायला सांगते अन् चवीने खाते.

मी सकाळी उठल्यावर गरम पाणी पिते आणि मग साधारण अर्धा तास वर्कआऊट करते. मध्यंतरी मी ३३ दिवसांचे फिटनेस चॅलेंज ॲक्सेप्ट केले होते. माझ्या मते फिजिकल व मेंटल फिटनेसकरिता दैनंदिन जीवनात व रोजच्या खाण्यात डाएट चार्ट असायला हवाच. मालिकेतील चित्रीकरणासाठी आम्ही सर्व कलाकार १२-१२ तास न थकता काम करतो. त्याचे कारण खाण्यात समतोलपणा आहे; सोबत शरीराला आवश्यक असणारे प्रोटिन्स, व्हिटॅमिन्सचीही गरज आहे. त्यामुळे दररोज प्रोटिन पावडर घेणे गरजेचे वाटते. शुद्ध शाकाहारी असल्यामुळे सर्व प्रकारच्या भाज्या, सॅलड खाणे मला आवडते.

लहानपणी शाळेत असताना आई घरी नसताना गुलाबजाम करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पाक गुलाबजाममध्ये कसा शिरेल, असा प्रश्न पडल्याने मी त्याला सुईने छिद्र पाडले होते. सुट्टीमध्ये मामाच्या गावाला म्हणजेच संगमनेरला जाणे झाले, की तिथे प्रसिद्ध असणारे ‘आठवण पोहे’ खाण्याचा योग येतोच. तसेच, ‘संगमनेरी खमंग ढोकळा’ मामा व मामी आवर्जून खाऊ घालतात. आजीच्या हातच्या मासवड्या हा तर जगाच्या पाठीवर कुठेही न मिळणारा पदार्थ वाटतो. सध्या चित्रीकरण सुरू असल्यामुळे आजीकडे जाणे होत नाही. त्यामुळे तिच्या हातच्या मासवड्या व शिरा खूप जास्त मिस करते. संगमनेरला आत्याही असल्यामुळे तिथे खाण्याची चंगळ असते. तिथे जाऊन ‘डिस्को पाणीपुरी’ खाणे म्हणजे परम सुखच. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असताना पावसाळ्यात सिंहगडची सहल केली. त्यावेळी तेथील पालक भजी व पिठलं-भाकरीचा आस्वाद घेतला.

लॉकडाऊनमध्ये कुटुंबीयासोबत वेळ घालवता आला. त्यावेळी मी वेगवेगळ्या फ्लेवर्सचे आईस्क्रीम बनवून खाऊ घातले. लॉकडाऊनमध्ये सगळे बंद असल्यामुळे माझ्या वडिलांची फेवरेट जिलेबी त्यांना बनवून खाऊ घातली आणि त्यांना ती प्रचंड आवडली. टोमॅटो सॉसची बाटली आणि इन्स्टंट रिमिक्स वापरून ही जिलेबी बनवली. मुंबईला चित्रीकरणासाठी असल्यामुळे तेथील विशेषतः वडापाव खाण्याची आवड निर्माण झाली. वडापाव मला याआधी कधीच आवडत नव्हता. सर्व प्रांताच्या पदार्थांची चव जरी घेतली, तरी शेवटी महाराष्ट्रीयन थाळी- म्हणजे वरण-भात, भाजी-पोळी, आमटी, कोशिंबीर हाच चौरस आहार मानला जातो. आरोग्यासाठीही तो उत्तम आहे आणि मलाही खूप आवडतो.

(शब्दांकन : अरुण सुर्वे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com