भाजपकडून लोकशाही मुल्यांची सातत्याने पायमल्ली - अशोक चव्हाण यांचा आरोप

अशोक चव्हाण
अशोक चव्हाण sakal

पणजी : गोव्यात काहीही करून, पक्ष फोडून, आमदारांत फूट पाडून सत्ता आणा असे प्रयोग राबवित दहा वर्षे भाजपने लोकशाही मुल्यांचा चोळामोळा केल्याचा आरोप कॉंग्रेसचे नेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला. गोव्याच्या रणधुमाळीत ते कॉंग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी येथे आले होते. त्यावेळी सकाळला दिलेल्या खास मुलाखतीत विविध राजकीय मुद्यांवर भाष्य केले.

प्रश्न - आम्ही कॉंग्रेसला कौल देतो पण पक्षाचे नेतेच आपापसातील भांडणात सत्ता घालवितात असा येथील मतदारांचा आरोप आहे?

उत्तर - भाजपचे दहा वर्षातील राजकारण आपण अनुभवले आहे. ते वेगळ्या पद्धतीचे आहे. समोरच्या विरोधी पक्षात भांडणे लावा, फूट पाडा, पक्ष फोडा. विरोधी आमदारांना राजीनामे द्यायला लावून आपल्याकडे ओढा. लोकशाही मुल्यांचा भाजपने चोळामोळा केला आहे. कॉंग्रेसने असे कधी केले नाही. निवडून आलेल्या बहुमतातील सरकारला अस्थिर करण्याचे किंवा पाडण्याचे काम कधी कॉंग्रेसने केले नाही. लोकांना फोडले नाही. कॉंग्रेसला गोवा व कर्नाटकात भाजपच्या राजकारणाचा हा नवीनच अनुभव आला. त्यामुळे काही गोष्टी घडल्या. त्यासाठी यावेळी आम्ही आमच्या उमेदवारांकडून शपथ घेत काळजी घेतली आहे.

प्रश्न - उमेदवारांकडून पक्षासमवेत राहण्याची शपथ घेणे, अफेडेव्हिट लिहून घेणे म्हणजे आपल्याच लोकांवर अविश्वास दाखविल्यासारखे वाटत नाही का?

उत्तर - भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे आम्हाला हे करावे लागले आहे. यामध्ये अविश्वासाचा प्रश्न येत नाही. फाटाफूट होवू नये यासाठी जितके काही कायदेशीरपणे करता येणे शक्य आहे तितके पक्षाने केले आहे.

प्रश्न - आप व तृणमुलमुळे भाजपविरोधी मतांची यंदा गोव्यात प्रथमच मोठ्या प्रमाणात फाटाफूट होणार आहे. याचा कॉंग्रेसला कितपत फटका बसेल?

उत्तर - आम आदमी पक्ष, तृणमुल कॉंग्रेसमुळे कॉंग्रेसच्या मतांवर काहीही परिणाम होणार नाही. येथे कॉंगेसची संघटना सक्षम आहे. जनतेला कळते कोणाला मते द्यायची. येथील जनता सूशिक्षित व सुज्ञ आहे. त्यामुळे ते कॉंग्रेसला बहुमत देतील. येणारे सरकार आमचेच असेल.

प्रश्न - महाराष्ट्रात महाविकास आघाडीत असलेले शिवसेना व राष्ट्रवादी क़ॉंग्रेस गोव्यात कॉंग्रेसच्या विरोधात लढत आहे. तुम्ही त्यांच्याशी आघाडी का केली नाही ?

उत्तर - प्रत्येक राज्याची राजकीय परिस्थिती वेगळी असते. महाराष्ट्राची तुलना गोव्याशी होत नाही. येथे कॉंग्रेसची स्वबळावर सत्ता येवू शकते. त्यामुळे आघाडी झाली नाही. गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रसचे अस्तित्व मला तरी कोठेच जाणवत नाही. त्यामुळे त्यांच्यामुळे भाजपला फायदा होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

प्रश्न - महाराष्ट्रातून भाजपने गोव्याला प्रचारासाठी खासदार, आमदारांच्या माध्यमातून भरपूर ताकद पुरवली आहे. त्यात महाराष्ट्रातील कॉंग्रेस कमी पडते आहे का?

उत्तर - गोव्यात कॉंग्रेसचे नेटवर्क फार चांगले आहे. येथील प्रचाराचे सूत्र मी पाहिले, येथे घरोघरी जावून प्रचार असतो. येथे मोठया सभा नसतात. महाराष्ट्रासारखा येथे प्रचार नसतो. त्यात यावेळी येथील प्रचारसभांना कोरोनामुळे मर्यादा आहेत. महाराष्ट्रातून पुरेशी ताकद गोव्यासाठी देण्यात आलेली आहे. निवडणुकीमध्ये माणसे किती येतात त्यापेक्षा निवडणूक व्यवस्थापन कसे केले जाते याला फार महत्व असते. त्यात आम्ही कोठेच मागे नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com