Goa Election 2022: भाजपने लोकशाही मूल्यांचा चोळामोळा केला - अशोक चव्हाण

गोव्यात प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात काँग्रेसने सारा भर अल्पसंख्याकांच्या ध्रुवीकरणावर दिला असल्याचा आरोप भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
ashok chavan devendra fadnavis
ashok chavan devendra fadnavisSakal

गोव्यात प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात काँग्रेसने सारा भर अल्पसंख्याकांच्या ध्रुवीकरणावर दिला असल्याचा आरोप भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तर काहीही करून, पक्ष फोडून, आमदारांत फूट पाडून सत्ता आणा असे प्रयोग राबवीत दहा वर्षे भाजपने लोकशाही मूल्यांचा चोळामोळा केल्याचा आरोप काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी केला. गोव्याच्या रणधुमाळीत प्रचारात व्यग्र असलेल्या महाराष्ट्राच्या या दोन माजी मुख्यमंत्र्यांनी ‘सकाळ’ला दिलेल्या खास मुलाखतीत विविध राजकीय मुद्यांवर भाष्य केले.

प्रश्न ः भाजपने येथील राजकीय संस्कृती बिघडविली असा काँग्रेसचा आरोप आहे?

फडणवीस ः हा आरोप म्हणजे शतकातील मोठा विनोद आहे. पाच वर्षांत सात मुख्यमंत्री देणाऱ्या पक्षाला हे शोभत नाही. भाजपने गोव्यात राजकीय स्थैर्य आणले. सलग दहा वर्षे स्थिर सरकार दिले.

मात्र या स्थिरतेसाठी आमदारांची घाऊक प्रमाणात फोडाफोडी केली असा विरोधकांचा आरोप आहे?

काँग्रेसचे इतके आमदार पक्ष सोडून का आले, यावर त्यांच्या नेत्यांनी आत्मचिंतन करावे. आमचे सरकार असतानाही त्यांचे बारा लोक फुटून आमच्याकडे का आले? याचे कारण म्हणजे त्यांचा त्यांच्या नेतृत्वावरच विश्वास नाही.

गोव्यात काँग्रेस पुन्हा स्पर्धेत आला असून काँग्रेसने कॅथॉलिक मतांवर लक्ष केंद्रित केल्याचे बोलले जाते. त्यावर भाजपची रणनीती काय आहे?

 गोव्यात काँग्रेसची अनेक वर्षे सत्ता होती. मात्र आत्ता त्यांचा सगळा भर ध्रुवीकरणावर आहे. मतदारांच्या मनात भीती तयार करून अल्पसंख्याक समाजाचे ध्रुवीकरण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. बहुसंख्याकांना डावलून अल्पसंख्याकांचे ध्रुवीकरण करून निवडणुका जिंकायच्या ही कुठली धर्मनिरपेक्षता? यालाच आमचा विरोध आहे. आम्ही सर्वांसाठी काम केले. लोक सुज्ञ आहेत. ते आम्हाला बहुमत देतील.

आम आदमी पक्ष व तृणमूल काँग्रेसमुळे भाजपविरोधी मतांची फाटाफूट होईल असे सुरुवातीला वाटले होते. आता तसे चित्र दिसत नाही...

 नुसत्या बॅनरबाजीवर निवडणुका जिंकता येत नाहीत. काही तरी काम करावे लागते, विश्वास असावा लागतो. तृणमूलबाबत लोकांना वाटते की, हा गोव्याच्या लायक पक्षच नाही. त्यांचा राजकीय अत्याचार, हिंसाचार पाहिल्याने त्यांचे असे मत झाले आहे. माझ्या मते तृणमूलचा फटका महाराष्ट्रवादी गोमंतकवादी पक्षाला बसेल. ‘मगो’ने काही केले असते तरी चालले असते पण, युती करून तृणमूलला गोव्यात आणायला नको होते असे लोकांचे मत आहे.

शिवसेनेसारख्या हिंदुत्ववादी पक्षाचा भाजपच्या मतांवर परिणाम होईल?

 शिवसेना आता हिंदुत्ववादी पक्षच उरलेला नाही. गोव्याने त्यांना कधीही स्वीकारले नाही. त्यांचे डिपॉझिटही वाचत नाही. त्यामुळे त्यांचा बिलकूल परिणाम होणार नाही.

भाजप प्रचारात पदोपदी दिवंगत नेते मनोहर पर्रीकर यांचे नाव घेतो. अशा वेळी उत्पलला पक्षात तुम्ही थांबवायला हवे होते असे आता वाटते का?

 दिवंगत पर्रीकर यांचे माझ्यावर खूप प्रेम होते. उत्पल राजकारणात यशस्वीच झाला पाहिजे या मताचा मी होतो. मी खूप प्रयत्न केला. पण त्यांनी पणजीतून लढण्याची भूमिकाच कायम ठेवली. एका मर्यादेनंतर काही करता येत नाही.

बंडखोर उत्पल पर्रीकर, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर निवडून आले तर त्यांना भाजप सोबत घेणार का?

 खरे सांगू, त्यांच्याबद्दल वाईट बोलणेही मला दुःखद वाटते. पण ते निवडून येणार नाहीत.

प्रश्न ः आम्ही काँग्रेसला कौल देतो पण पक्षाचे नेतेच आपापसातील भांडणात सत्ता घालवितात असा येथील मतदारांचा आरोप आहे?

चव्हाण ः भाजपचे दहा वर्षांतील राजकारण आपण अनुभवले आहे. समोरच्या विरोधी पक्षात भांडणे लावा, फूट पाडा, पक्ष फोडा. विरोधी आमदारांना राजीनामे द्यायला लावून आपल्याकडे ओढा. लोकशाही मूल्यांचा भाजपने चोळामोळा केला आहे. काँग्रेसने असे कधी केले नाही. निवडून आलेल्या बहुमतातील सरकारला अस्थिर करण्याचे किंवा पाडण्याचे काम कधी काँग्रेसने केले नाही. गोवा व कर्नाटकात भाजपच्या राजकारणाचा हा नवीनच अनुभव आला. त्यामुळे काही गोष्टी घडल्या. त्यासाठी यावेळी आम्ही आमच्या उमेदवारांकडून शपथ घेत काळजी घेतली आहे.

उमेदवारांकडून पक्षासमवेत राहण्याची शपथ घेणे, प्रतिज्ञापत्र लिहून घेणे म्हणजे आपल्याच लोकांवर अविश्वास दाखविल्यासारखे वाटत नाही का?

 भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे आम्हाला हे करावे लागले आहे. यामध्ये अविश्वासाचा प्रश्न येत नाही. फाटाफूट होऊ नये यासाठी जितके काही कायदेशीरपणे करता येणे शक्य आहे तितके पक्षाने केले आहे.

आप व तृणमूलमुळे भाजपविरोधी मतांची यंदा गोव्यात प्रथमच मोठ्या प्रमाणात फाटाफूट होणार आहे. याचा काँग्रेसला कितपत फटका बसेल?

 आम आदमी पक्ष, तृणमूलमुळे काँग्रेसच्या मतांवर काहीही परिणाम होणार नाही. येथे काँग्रेसची संघटना सक्षम आहे. जनतेला कळते कोणाला मते द्यायची. येथील जनता सुशिक्षित व सुज्ञ आहे. त्यामुळे ते काँग्रेसला बहुमत देतील. येणारे सरकार आमचेच असेल.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीत असलेले शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस गोव्यात काँग्रेसच्या विरोधात लढत आहेत. तुम्ही त्यांच्याशी आघाडी का केली नाही ?

 प्रत्येक राज्याची राजकीय परिस्थिती वेगळी असते. महाराष्ट्राची तुलना गोव्याशी होत नाही. येथे काँग्रेसची स्वबळावर सत्ता येवू शकते. त्यामुळे आघाडी झाली नाही. गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व मला तरी कोठेच जाणवत नाही. त्यामुळे त्यांच्यामुळे भाजपला फायदा होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

महाराष्ट्रातून भाजपने गोव्याला प्रचारासाठी खासदार, आमदारांच्या माध्यमातून भरपूर ताकद पुरवली आहे. त्यात महाराष्ट्रातील काँग्रेस कमी पडते आहे का?

 गोव्यात काँग्रेसचे ‘नेटवर्क’ फार चांगले आहे. येथील प्रचाराचे सूत्र मी पाहिले, येथे घरोघरी जाऊन प्रचार असतो. येथे मोठ्या सभा नसतात. त्यात यावेळी येथील प्रचारसभांना कोरोनामुळे मर्यादा आहेत. महाराष्ट्रातून पुरेशी ताकद गोव्यासाठी देण्यात आलेली आहे. निवडणुकीमध्ये माणसे किती येतात त्यापेक्षा निवडणूक व्यवस्थापन कसे केले जाते याला फार महत्त्व असते. त्यात आम्ही कोठेच मागे नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com