मानसिक ताणापासून सावधान....

‘शरीरातील असंतुलन म्हणजे रोग’ अशी व्याख्या करत असताना शरीर या शब्दात आयुर्वेदाने भौतिक शरीर, सूक्ष्म शरीर व आत्मिक शरीर अशा तिन्ही शरीरांचा समावेश केलेला आहे.
Beware of stress
Beware of stresssakal

‘शरीरातील असंतुलन म्हणजे रोग’ अशी व्याख्या करत असताना शरीर या शब्दात आयुर्वेदाने भौतिक शरीर, सूक्ष्म शरीर व आत्मिक शरीर अशा तिन्ही शरीरांचा समावेश केलेला आहे. रोग शारीरिक असतात, तसेच मानसिकही असतात. किंबहुना शारीरिक रोगांचे मूळही मनाच्या असंतुलनातच असू शकते. मनाची शक्ती, गती, कार्यक्षमता सर्वच अतुल्य असते.

मात्र, हेच मन तणावग्रस्त झाले, अकार्यक्षम होऊ लागले तर त्यातून अनेक रोगांना आमंत्रण मिळू शकते. मानसिक ताण ही मनाच्या असंतुलनाची पहिली पायरी आहे, असे म्हणायला हरकत नाही. जोपर्यंत मन स्वतःची कामे व्यवस्थित करते आहे तोपर्यंत मानसिक ताणही नसतो, त्यातून उद्‌भवणारे विकारही नसतात, मात्र एकदा का मनाची कार्यक्षमता उणावू लागली की मनावर ताण यायला सुरुवात होते. मन हे एकटे नसतेच तर त्याला बुद्धी, विवेक, अहंकार, स्मृती, मेधा, वगैरे इतरही तत्त्वांची जोड असते.

पंचज्ञानेंद्रियेदेखील मनाच्या जोरावरच आपापली कामे करत असतात. मन तणावग्रस्त असले की त्याचा या सर्वांच्या कामावर परिणाम होतो. योग्य निर्णय घेतले जात नाही, अनुशासन राखता येत नाही अर्थातच यातून असंख्य रोगांना आमंत्रण मिळू शकते. मनाची संतुलित अवस्था म्हणजे काय? तर ज्या ठिकाणी मनुष्याचे भौतिक शरीर असेल त्याच ठिकाणी व त्याच्या आसपास मन असावं आणि मनाला संवेदना देता- घेता याव्यात.

मनाचा इंद्रियांवर पूर्ण ताबा असावा, मनात आरोग्याचे, उत्कर्षाचे, समृद्धीचे विचार यावेत, सर्व जण आनंदी होवोत, सर्व जण सुखी होवोत अशा तऱ्हेचे मनात विचार यावेत. त्या उलट मनात दुसऱ्याचे अकल्याण, शत्रुत्व, ईर्ष्या, असूया याबद्दलचे विचार, किंवा आपण काहीही करू नये असे वाटणे, एकदा बसले की बसून राहावे असे वाटणे, पळायला सुरुवात केली की पळत राहणे वगैरे गोष्टी घडत असतील, आत्महत्येचा विचार मनात घोळत असेल, अंगावरचे कपडे फाडण्यासारख्या गोष्टी हातून घडत असतील तर ते मानसिक असंतुलनातच मोडते.

साध्या मानसिक असंतुलनापासून ते उन्मादावस्थेपर्यंतचे सर्व प्रकारच्या मानसिक असंतुलनाला रोग म्हटले जाते. स्वतःकडे संपत्ती, आरोग्य वगैरे सर्व असताना स्वतःविषयी कमीपणा वाटणे, स्वतःविषयी अहंगंड वा न्यूनगंड असणे, जिवाला स्वस्थता न लाभणे, झोपायच्या वेळी स्वस्थ झोप न येणे, विश्रांतीच्या वेळी विश्रांती न घेता येणे हे सर्व मानसिक असंतुलनाचे रोग समजता येतील.

शरीर व मन प्रसन्न राहिले, आरोग्यवान राहिले तर सर्व बाह्य शरीर तेजस्वी व कार्यरत राहील, इतरांना आनंद देणारे राहील. आतला आत्मा-जीव-व्यक्ती संतोष, आनंद, समाधान यांचा अनुभव करेल तेव्हा ते आत्मिक संतुलन असेल. मनुष्य सुखासाठी धडपड करत असतो, पण त्यात अतिरेक झाल्याने असंतुलन निर्माण होते व हे असंतुलन रोगांना आमंत्रण देते.

तसे पाहताना शारीरिक असंतुलनामागेसुद्धा विचित्र प्रकारचे विचार किंवा समज, चिंतनाची चुकीची पद्धत वा बुद्धीचे चुकीचे मार्गदर्शन जबाबदार असते. मनुष्या-मनुष्यातील देवाणघेवाण व प्रेम; संपूर्ण समाजाशी, वातावरणाशी व बाह्य विश्वाशी असलेला व्यवहार नीट करता न येणे; पैसा व सामाजिक प्रतिष्ठा असताना सुद्धा समाजाविषयी घृणा वाटणे, किंवा समाजाने त्या व्यक्तीला बाजूला टाकणे अशा प्रकारे रोगाची उत्पत्ती झालेली दिसते.

सर्व काही असताना झोप न येणे, शांतता न वाटणे, बाह्य वस्तू मला सुखी करू शकतील अशा विचाराने त्यांच्या मागे पळणे हे आत्मिक असंतुलन रोगांना कारणीभूत होते. बाह्य वस्तू स्थिर नसतात, त्या आकार बदलतात, शक्ती बदलतात, स्वरूप बदलतात, गुण बदलतात, त्यामुळे बाह्य वस्तूच्यामागे धावत असताना ती वस्तू अदृश्‍य झाली असून आपण कुठल्यातरी चुकीच्या वस्तूच्या मागे धावत आहोत हे मनुष्याच्या लक्षातही येत नाही.

शेवटी तोंडघशी पडायला होते, सुख तर मिळत नाहीच. म्हणून प्रत्येक रोगाचे कारण जवळ जवळ मानसिक आहे असे म्हणायला हरकत नाही. मानसिक ताण हे मानसिक असंतुलनाचे मुख्य कारण आहे. एखाद्या उद्योग व्यवसायात एक विशिष्ट प्रकारची वस्तू तयार करण्यासाठी कोणती साधने व कच्चा माल लागेल याची यादी करावी लागते. ही यादी तयार करण्याचे ज्ञान नसले तर ताणाला सुरुवात होते.

यादी व्यवस्थित झाली तरी जो कोणी वस्तू बाजारातून मिळवणार असतो त्याने सर्व वस्तू नीट मिळवल्या नाहीत, त्या वस्तू मिळत नाहीत असे सांगितले किंवा वस्तू वेळेवर मिळवल्या नाहीत तर मानसिक ताण तयार होतो. कच्चा माल मिळाल्यावर उत्पादित झालेली वस्तू गिऱ्हाईकाच्या पसंतीला उतरली नाही तरी मानसिक ताण तयार होतो. साधारणतः प्रत्येकाने कष्ट करणे अपेक्षित असते.

कष्ट केले की सृजनाचे कार्य आपसूक घडते. म्हणजेच अपेक्षा असो वा नसो, मेहनत करणाऱ्याला चार पैसे मिळतातच. मिळालेल्या चार पैशांनी आपल्याला काय काय सुख घेता येईल याचा विचार न करता चाराच्या जागी आठ, आठाच्या जागी सोळा, सोळाच्या जागी एकशे साठ, एकशे साठच्या जागी हजार कसे मिळतील असा विचार करत गेले तर पैसे मिळाले तरी त्यातून सुख मिळावे हा उद्देश विसरला जातो व मनुष्य पैशांच्या, प्रसिद्धीच्या मागे धावत राहतो.

जसजसा मनुष्य ह्या वस्तूंच्या अधिकाधिक मागे लागतो तसतशा वस्तू अधिक वेगाने दूर पळतात. हातात आलेली वस्तू समाधान देत नाही व हवी असलेली वस्तू हातात येत नाही अशा चक्रात सापडल्याने मानसिक ताणतयार होतो. शिवाय, एखादी वस्तू पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या वेळाबद्दल पूर्ण कल्पना नसल्यास, वस्तू हवी तेव्हा का तयार झाली नाही असे वाटून मानसिक ताण तयार होतो.

अमुक गोष्ट किती वेळात तयार होऊ शकते याचा अंदाज असताना दुसऱ्याला खूष करण्यासाठी किंवा इतर काही अपेक्षेने ती गोष्ट दोन दिवसात करून देतो फुशारक्या मारण्याने मानसिक ताण तयार होतो. मानसिक ताण तयार झाला की मनाला इंद्रियांवर ताबा ठेवता येत नाही, इंद्रिये आपापल्या विषयांकडे धावायला लागली की मनाची अधिकच ओढाताण होते व मानसिक ताण दुप्पट होतो.

मानसिक ताण वाढल्याचा परिणाम म्हणून अन्नपचन कमी झाल्याने किंवा झोप कमी लागल्याने शारीरिक आजार उत्पन्न झाला तर शरीरातील वीर्यशक्ती व ओजशक्ती कमी झाल्याने पुन्हा मन अस्वस्थ होऊन अधिकच मानसिक ताण उत्पन्न होतो. आजारी शरीराची मानसिक ताण सहन करण्याची शक्ती कमी झाल्याने नेहमीचा ताण सहन होईनासा होतो व त्यामुळे रोगोत्पत्ती होते. तेव्हा रोगांपासून चार हात दूर राहण्यासाठी मनःशांती व मानसिक समाधान हे सर्वांत आवश्‍यक आहे.

(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com