उन्हाच्या तडाख्यात कोल्ड्रिंकपेक्षा ताकच भारी

पोषकमुल्यामुळे वाढती मागणी, शीतपेयात रासायनिक घटक
Buttermilk
ButtermilkSakal

शिरपूर जैन - अंगाची लाही लाही करणाऱ्या अंगातून घामाच्या धारा वाहवणाऱ्या उन्हाळ्यात नागरिकांची पावले शीतपेय, आईस गोला, कोल्ड्रिंककडे वळतात, परंतु या सर्वात बऱ्याच प्रमाणात आरोग्याला हानिकारक असणाऱ्या रासायनिक घटकांचा वापर केला जात असतो. तुलनेत निंबुपाणी, उसाचा रस यासारखे देशी पेय शरीराला अधिक लाभदायक असल्याचे दिसून येते. या सगळ्या पेयामध्ये ताक सगळ्यात फलदायी आहे. चहाच्या दरात ताक मिळते त्यात पोषक मूल्ये ही ज्यादा आहेत. त्यामुळे ताकातील पोषक मुल्य समजून अनेकांनी ताकाला पसंती दिली आहे. उन्हाळ्यात तहान भागवण्यासाठी ताक उपयोगी ठरते.

ताक शरीराला अत्यंत उपयुक्त असून ते दह्यात भरपूर पाणी घालून बनवलेले असते. त्यामध्ये प्रोबायोटिक गुणधर्म असतात. घरगुती नैसर्गिक पद्धतीने बनवलेल्या दह्यात आरोग्यदायी जिवाणू भरपूर प्रमाणात असतात, त्यातील चांगल्या बॅक्टेरियामुळे व विटामिन बी, फॉस्फरस या घटकांमुळे ते शरीरास अत्यंत उपयोगी ठरते. त्यामुळे पचनशक्ती सुधारते, दह्यापासून तयार होणाऱ्या ताकात अल्फा हायड्रोलिक आणि लॅक्‍टिक ऍसिड असते, त्यामुळे उन्हात त्वचेवर होणाऱ्या परिणामापासून बचाव होतो. शरीराला थंडावा मिळतो, त्यामुळे उन्हाळ्यात आवर्जून ताक प्यावे असे आहार तज्ज्ञ सांगतात.

दही सेंदवमिठ आणि पाण्याच्या मिश्रणातून तयार झालेल्या ताकामुळे शरीरातील पाण्याचे व इलेक्ट्रोलाईटचे प्रमाण संतुलित राहते. डीहायडरेशनपासून मुक्ती मिळते, थकवा जाऊन मनास प्रसन्न वाटते. ताकात असलेल्या स्निग्धतेमुळे आतड्यांना एक प्रकारे वंगण मिळाल्याने अन्नाचे वहन व पचन होते. ताकाच्या नियमित सेवनाने पचनक्रिया सुधारते. पित्ताचा त्रास कमी होतो, तसेच बद्धकोष्ठता किंवा पचनाच्या विकारात आराम मिळतो. शरीरातील कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहते, ताकामुळे पोट भरल्याची भावना निर्माण होऊन अनावश्यक खावेसे वाटणारे पदार्थ टाळले जातात. वजन नियंत्रणात ठेवता येते, ताकात प्रोटीन, कॅल्शियम, पोटॅशियम,विटामिन बी, डी असल्याने रक्तदाब नियंत्रण, हृदय व हाडांच्या बळकटीसाठी उत्तम टॉनिक म्हणूनही उपयोगी ठरते.

लोकांमध्ये आजकाल विटामिन बी १२ ची कमतरता दिसू लागली आहे. रोज एक ग्लास ताक नियमित घेतल्याने ते आरोग्यासाठी फलदायी ठरते.प्रतिकारशक्ती वाढते ,ताक सहज उपलब्ध होऊ शकणारे पेय आहे. ताज्या ताकामुळे तर कोणत्याही प्रकारचे वाईट परिणाम शरीरावर होत नाहीत. ताक दुग्धजन्य पदार्थ असून त्यामध्ये फॅट नसते. त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता नाही. स्वादासाठी जिरे, काळी मिरी, सैंधव मीठ, पुदिना, कोथिंबीर आणि लसूण यांचे मिश्रण घातले असता ताकाचा स्वाद वाढतो व फायदे होतात .उन्हाळ्यात दररोज ताक घेत राहिल्यास उष्माघातापासून बचाव तर होतोच पण उत्तम आरोग्यासाठी ही ते बहुगुणी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com