मुलांसाठी पोषक आहार

लहान मुले घराचे चैतन्य असतात. ती तेजस्वी असली, आनंदी असली, मस्ती करत असली व मुख्य म्हणजे व्यवस्थित खात-पीत असली तर आई-वडिलांना कुठलीच चिंता राहत नाही.
dr malvika tambe Nutritious food for children health
dr malvika tambe Nutritious food for children healthsakal
Summary

लहान मुले घराचे चैतन्य असतात. ती तेजस्वी असली, आनंदी असली, मस्ती करत असली व मुख्य म्हणजे व्यवस्थित खात-पीत असली तर आई-वडिलांना कुठलीच चिंता राहत नाही.

- डॉ. मालविका तांबे

लहान मुले घराचे चैतन्य असतात. ती तेजस्वी असली, आनंदी असली, मस्ती करत असली व मुख्य म्हणजे व्यवस्थित खात-पीत असली तर आई-वडिलांना कुठलीच चिंता राहत नाही. आधुनिक जीवनशैलीचा जसा आपल्या सर्वांच्या आरोग्यावर परिणाम झालेला आहे, तसाच परिणाम लहान मुलांच्या आरोग्यावरही झालेला दिसतो.

पूर्वीच्या काळी लहान मुलांना जे ताटात वाढले जाईल ते खाणे भाग असायचे. पण सध्याच्या काळात मुलांमध्ये आवडी-निवडी फार प्रमाणात वाढल्या आहे. त्यांना काही प्रकारचे जेवण आवडते, काही पदार्थ जबरदस्तीने खाऊ घालावे लागतात, अन्नसेवन करताना मुले टीव्ही पाहतात, फोन वापरतात, आयपॅड वगैरे लावून बसतात.

आमचा मुलगा समोर आयपॅड लावल्याशिवाय जेवत नाही असे पालक मोठ्या अभिमानाने सांगतात. आपण लाड करतो आहेत या नावाखाली आजी-आजोबा नातवंडांना चिप्स, बिस्किटे अगत्याने आणून देतात. जंक फूड, पॅकेटमधील तयार अन्न वगैरे अनैसर्गिक द्रव्ये टाकलेले पदार्थ मुलांना मनापासून आवडायला लागलेले आहे,

त्यामुळे मुलांची आरोग्याची पातळी खालावलेली दिसते. निस्तेजता, सतत कुरकुर करणे, चिडचिड करणे, मस्ती न करणे, थोडे श्रम झाले वा थोडे खेळले तरी पाय दुखण्याची तक्रार करणे, त्वचा रूक्ष होणे, डोळ्यांभोवती सूज येणे, नखांवर पांढरे डाग पडणे, वजन कमी असणे, सतत सर्दी- खोकला-ताप येणे वगैरे तक्रारी सध्या मुलांमध्ये पाहायला मिळतात.

मुलांचे आरोग्य नीट टिकवून ठेवायचे असेल तर चौरस आहाराला पर्याय नाही. मुलांना देण्यात येणारा आहार ताजा, गरम व शक्यतो सात्त्विक असावा. पूर्वी मुलांना आठवड्याचे सातही दिवस पानात वरण-भात वाढला जायचा, त्याबद्दल त्यांची तक्रार नसायची.

पण आज सात दिवस सात वेगवेगळ्या प्रकारचा भात वाढला व आठव्या दिवशी भाताचा तोच प्रकार करून वाढला तर ‘अरे हाच भात मागच्या आठवड्यात खाल्ला होता’ अशी प्रतिक्रिया येते. मुलांच्या जेवणात सतत वैविध्य देण्यापेक्षा आठवड्यातून चार वेळ तरी एकाच प्रकारचे जेवण खाण्याची सवय लावणे आवश्यक आहे.

खेळाच्या नादात लहान मुलांना पाणी पिण्याचे भान राहत नाही, त्यामुळे त्यांचे पचन बिघडू शकते. मुलांना अधून मधून पाणी पिण्याची सवय लावणे, जेवत असताना कोमट पाणी देणे, अधून मधून मोसमी फळांचा ताज रस देणे, कुठल्याही प्रकारचा कार्बोनेटेड शीतपेये किंवा डबाबंद फळांते रस देण्याचे टाळणे योग्य ठरते.

मुलांच्या आरोग्यासाठी चांगले असते ते म्हणजे गाईचे दूध नियमितपण घेणे. सकाळी न्याहारीच्या वेळी व संध्याकाळी पाचच्या सुमारात दोन चमचे संतुलन चैतन्य कल्प टाकलेले दूध देणे योग्य ठरते. सध्याच्या काळात चांगले दूध मिळत नाही किंवा मुलाला दूध पचत नाही या कारणामुळे मुलांना दूध न देता दही देण्याची पद्धत रूढ झालेली आहे.

एक तर लहान मुलांनी दही कमी प्रमाणात खावे तसेच रात्री दही खाऊ नये. दह्याऐवजी सकाळच्या जेवणात मुलांना रोज ताजे ताक देणे उत्तम. पनीर हा मुलांचा आवडता पदार्थ. घरी पनीर करणे सोपे असते. घरी पनीर करणे शिकून घेतले व त्याची भाजी करून किंवा थोडी खडीसाखर घालून मुलांना खायला दिले तर ते चवीलाही उत्तम असते. मुलांच्या आहारामध्ये गाईचे साजूक तूप आवर्जून ठेवावे.

त्यामुळे शरीराला आवश्यक पोषक पदार्थ मिळायला मदत मिळते, जसे ओमेगा फॅटी ॲसिड, फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स इ., तसेच मुलांची पचनशक्ती सुधारायला मदत मिळते. तूप मज्जासंस्थेसाठी पोषक असल्यामुळे तल्लख बुद्धीसाठी व डोळ्यांचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी मदत मिळते. दूध, दही वगैरे पदार्थांपासून मुलांना नैसर्गिक कॅल्शियम मिळायला मदत होतो.

सध्या मुलांमध्ये कॅल्शियम कमी असण्याची प्रवृत्ती वाढत आहे, त्यामुळे त्यांची ताकदही कमी होताना दिसते, मुले पाय दुखण्याची तक्रार करतात. आहारात दुधाचा योग्य प्रमाणात समावेश तक्रारी कमी होऊ शकतात. उन्हाळ्यात मुलांना भूक कमी लागते अशा वेळी त्यांना दुधामध्ये संतुलन गुलकंद स्पेशल घालून देणे चांगले. तसेच उष्णतेचा त्रास होत असला तर संतुलन पित्तशांती गोळ्या देणे चांगले.

डाळिंब, अंजीर, द्राक्षे, सफरचंद, पेअर वगैरे मोसमी ताजी फळे रोज थोड्या प्रमाणात तरी मुलांना आवर्जून खायला द्यावीत. असे फळ डब्यात देणे उत्तम. सोपे पडते व पटकन खाऊन होते म्हणून केळे देण्याकडे अनेकांचा कल असतो.

तसे न करता रोज वेगळ्या प्रकारचे फळ देणे उत्तम ठरते. तुपाबरोबर खजूर, काळ्या मनुका, सुके अंजीर, बदाम, अक्रोड, काजू वगैरे सुका मेवा मुलांना वरचेवर देणे उत्तम. सुका मेवा खाणे मुलांना आवडत नसल्यास भाजी करताना कांद्याऐवजी सुक्या मेव्याची पूड टाकणे उत्तम ठरते.

भाज्या हा मुलांचा नावडता पदार्थ. लहानपणापासूनच पालकांनी आपल्याबरोबर मुलांना भाज्या खाण्याची सवय लावण्याचा प्रयत्न करावा. पालक, मेथी, दुधी, भोपळा, भेंडी, बटाटा, तोंडली, कारली वगैरे भाज्या मुलांच्या आहारात असाव्या. भाज्या व फळे यांचा आहारात समावेश असल्यास शरीराला मायक्रोन्यूट्रिएंटस् मिळायला मदत होते.

मुद्दाम आवर्जून देण्यायोग्य गोष्टींमध्ये शुद्ध मधाचा समावेश असावा. नैसर्गिक मध मुलांच्या पचनाकरता मदत करतो. नैसर्गिक गूळ आहारात असल्यास शरीराला लोहाची पूर्ती व्हायला मदत होते. शुद्ध केशर शरीराला नैसर्गिक लोहतत्त्व मिळायला मदत करते. लिंबू पचनास मदत करते त्यामुळे मुलांच्या ताटात लिंबाची छोटी फोड निश्र्चित असावी.

खोबरे व कोथिंबीर या दोन गोष्टी मुले टाळायचा प्रयत्न करतात. पण लहानपणापासून या गोष्टींची सवय मुलांना लावावी. किसलेले खोबरे पदार्थांवर घालणे तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरवलेले अन्न मुलांना देणे आवश्यक असते. यातूनही शरीराला आवश्यक तत्त्वे मिळतात.

मुलांच्या आहारात भाताचा समावेश नक्की असावा. न्याहारीसाठी मऊ गुरगुट्या भात तूप व मीठ घालून दिला तर मुलांचे पचन व्यवस्थित राहायला मदत मिळते. वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी, कडधान्ये, धान्ये मुलांच्या आहारात आवर्जून ठेवावीत. मूग आरोग्याकरता व चेतासंस्थेकरता उत्तम समजले जातात. मुगाची आमटी, मुगाचे सूप, मुगाचा लाडू मुलांना अवश्य द्यावे.

मुलांना जेवणात फार तिखट वा चमचमीत पदार्थ देण्याऐवजी सुंठ, हळद, वेलची, काळी मिरी, दालचिनी वगैरे पचनाला मदत करणारे मसाले वापरून केलेले पदार्थ देणे जास्त हितकर ठरते. मुलांचे पचन व्यवस्थित राहण्याच्या दृष्टीने त्याच्या यकृताची कार्यक्षमता चांगली राहणे गरजेचे असते. त्यासाठी मुलांना जन्मापासूनच बाळगुटी देण्याची पद्धत आपल्याकडे रूढ आहे.

वर्षापेक्षा अधिक वयाच्या मुलांना पचनाकरता संतुलन बाल हर्बल सिरप, सॅन अग्नी सिरप देणे उत्तम. नैसर्गिक लोहतत्त्व व कॅल्शियम मिळण्यासाठी व प्रतिकारशक्ती व्यवस्थित राहण्याकरता धात्री रसायन-च्यवनप्राश-मॅरोसॅनसारखे रसायन, लोहित प्लससारख्या गोळ्या मुलांना देता येते.

संपूर्ण आयुष्याचा पाया लहान वयात मिळणाऱ्या पोषणावर अवलंबून असतो. तसेच याच वयात शरीराचा विकास होत असतो. म्हणून मुलांना या काळात आहाराचे महत्त्व पटवून देणे आवश्यक असते.

आई-वडिलांनी एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की लहान मुले मोठ्यांचे अनुकरण करत असतात. त्यामुळे पालक स्वतःचा आहार कसा घेत आहेत याचे निरीक्षण करून मुले आपली आहारपद्धत ठरवत असतात. दिवसातील एक तरी जेवण कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र मिळून करावे.

अशा वेळी ताटातील हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, फळे, भात, डाळ, पोळी-भाकरी, कोशिंबीर आणि भात-पोळी-भाकरीवर घेतले जाणारे साजूक तूप हे मुलांच्या पाहण्यात आले तर त्यांना रागावून, दामटून योग्य आहाराकडे वळविण्याची कसरत पालकांना करावी लागणार नाही, मुले आपसूकच अशा प्रकारच्या आहाराकडे वळतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com