अस्वस्थता आणि स्वस्थता

प्रत्येक व्यक्तीची स्वभावाची जडणघडण, तणाव पेलण्याची क्षमता, परिस्थितीला react होण्याची पद्धत, भावनिक समतोल वेगळा असतो.
Restlessness
Restlessnesssakal

आज कॉर्पोरेट, मीडिया, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि सर्वच क्षेत्रांमध्ये ताणतणावाचं नियोजन न करता आल्यामुळे लहानसहान कारणांमुळे चिडणं, निराश होणं, सतत अस्वस्थ राहणं या गोष्टी वाढल्या आहेत. अस्वस्थतेच्या आजारांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होते आहे.

प्रत्येक व्यक्तीची स्वभावाची जडणघडण, तणाव पेलण्याची क्षमता, परिस्थितीला react होण्याची पद्धत, भावनिक समतोल वेगळा असतो. त्यामुळे ताणतणावाच्या शारीरिक व मानसिक दुष्परिणामांची तीव्रता वेगळी असू शकते; पण शेवटी तणावांमुळे शरीरात होणाऱ्या cortisol, adrenalin व इतर घातक संप्रेरकांचे दुष्परिणाम होतातच.

त्याचबरोबर मेंदूतील serotonin आणि norepinephrine या neurotransmitters मध्ये असंतुलन निर्माण होतं. ज्यामुळे अस्वस्थतेच्या आजाराला निमंत्रण मिळतं. याची शारीरिक, मानसिक आणि वर्तणुकीतील लक्षणं दिसायला लागतात, ज्यांची नोंद वेळेवर घेणं आवश्यक असतं.

बदलत्या समाजव्यवस्थेमध्ये व्यक्तीवर अपरिमित ताणतणाव  असतात. या ताणाचे स्रोत विविध प्रकारचे असतात. व्यक्तिगत, कौटुंबिक, महाविद्यालयाअंतर्गतचे, डिपार्टमेंटअंतर्गतचे, राजकीय, सामाजिक आणि समाजव्यवस्थेचे. त्यातच अनियमित ड्युटीच्या वेळा, जेवणाच्या वेळा, अभ्यासाच्या वेळा, सबमिशन्सच्या वेळा, जागरणं, सततची जागृत राहण्याची मेंदूची सवय आणि ताणाचा निचरा व्यवस्थित न होणं हे प्रश्न असतात.

या ताणाचे परिणाम प्रत्येक व्यक्तीनुसार वेगवेगळे  असतात. वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे ताण निर्माण होतो. या ताणामुळे जी अस्वस्थता निर्माण होत राहते, त्याचे परिणाम शरीर आणि मनावर निश्चितपणे होतात. वेळीच यावर उपाय झाले नाहीत, तर वेगवेगळे शारीरिक व मानसिक आजार होण्यात त्याची परिणती होते.

अस्वस्थतेमुळे वाटणारी सुुरुवातीची, शारीरिक व मानसिक लक्षणं : सतत अस्वस्थ वाटत राहणं, लहानसहान कारणांवरून होणारी चिडचिड, राग अनावर होणं, झोप न येणं किंवा जास्त येणं, अनामिक भीती वाटत राहणं, भूक न लागणं किंवा अतिभूक लागणं, विनाकारण संशय येणं, एकाग्रता न होणं, विचारांमध्ये गोंधळ व निर्णय घेता न येणं, विलक्षण थकवा वाटणं, वारंवार पोट बिघडणं, निराश वाटत राहणं, आत्मविश्वास कमी होणं, जगण्यातील आनंद कमी होणं इत्यादी.

या आणि अशा लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास नैराश्याचा आजार किंवा एखादा शारीरिक आजार होऊ शकतो. Cortisol आणि  इतर ताणतणावाशी निगडित संप्रेरकं अतिरिक्त प्रमाणात स्रवतात  व त्यामुळे  इतर शारीरिक अवयवांच्या मेटॅबोलिझमवर विपरीत  परिणाम होतो.  त्यातून अतिरक्तदाब, हृदयविकार, पचनसंस्थेसंबंधातले विकार व अनेक आजार उद्‍भवू शकतात.

Neuroimmunology या शास्त्र शाखेच्या निष्कर्षांनुसार, बहुतेक शारीरिक आजारांचं मूळ हे खूप काळ सहन केलेल्या  मानसिक ताणतणावात असतं. तसंच या सर्व लक्षणांची परिणती कार्यक्षमता कमी होणं, व्यसनाधीनता वाढणं, गैरहजेरी वाढणं इत्यादी गोष्टींमध्ये होते.

अस्वस्थतेची मानसिक लक्षणं

  • आत्मविश्वास कमी होणं, अभ्यासात, कामात व एकूणच एकाग्रता न होऊ शकणं

  • लक्षात न राहणं; स्मृतीसंदर्भात अडचणी

  • निर्णयक्षमता कमी होणं

  • लहानसहान गोष्टींत गोंधळ उडणं

  • विचार करताना मूळ मुद्दा सोडून भरकटायला होणं

  • छातीत धडधड, अचानक घाम फुटणं, काल्पनिक भीती वाटायला लागणं वगैरे

  • उतावीळपणा वाढणं

  • अचानक रडू येणं

  • लहानसहान कारणांवरून अतिराग येणं

  • आत्मविश्वास डळमळीत होणं

अस्वस्थतेची शारीरिक लक्षणं

  • झोपेचे प्रश्न - अजिबात झोप न येणं किंवा जास्त झोप येणं

  • पचनाच्या तक्रारी

  • डोकेदुखी

  • त्वचेबाबतच्या समस्या

  • अचानक थकवा येणं

  • रक्तदाब वाढणं किंवा कमी होणं

  • लैंगिक तक्रारी, इच्छा, क्षमता कमी होणं

  • इतर अनेक मनोकायिक आजार

या ताणतणावांचं नियोजन कसं करायचं, हे आपण पुढच्या भागात बघूया.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com