- डॉ. हंसा योगेंद्र
हवामानात बदल होताच आपल्याला त्वचेवर खडबडीतपणा दिसतो. योग्य काळजी न घेतल्यास त्वचेला खाज येणे, जळजळ होऊन लालसरपणा येतो. हवामानातील बदलांबरोबरच, हायड्रेशनचा अभाव, पोषक तत्त्वांची कमतरता, हवामानास अनुकूल कपडे न घालणे, इत्यादी कारणेही आहेत. तसेच उच्च वात दोष असणाऱ्यांना त्वचेच्या अधिक कोरडेपणाचा सामना करावा लागतो.
काही प्रभावी घरगुती उपायांद्वारे कोरड्या त्वचेला व्यवस्थित करता येईल.
१. बॉडी मिस्ट ः बॉडी मिस्ट कोरड्या त्वचेसाठी उत्तम उपाय आहे. ते दिवसभर त्वचा हायड्रेट ठेवते. हिबिस्कस आणि रोझ वॉटर स्प्रे वापरून पहा. एका भांड्यात ४-५ हिबिस्कस फुले घ्या. त्यात एक ग्लास पाणी घाला. ते १० मिनिटे उकळवा. थंड करून गाळून घ्या आणि त्यात एक चमचा गुलाबजल मिसळा. हा द्रव एका स्प्रे बाटलीत भरा आणि नेहमी सोबत ठेवा. दर २ ते ३ तासांनी किंवा त्वचा कोरडी जाणवते तेव्हा फवारा.
२. तुळशी आणि मध ः तुळशीच्या पानाचे आरोग्य आणि सौंदर्यासाठी अनेक फायदे आहेत. तुळशीमध्ये त्वचेचे पोषण आणि मॉइश्चरायझेशन करणारे महत्त्वपूर्ण घटक असतात. मधामध्ये दाहविरोधी, हायड्रेटिंग असतात. त्यामुळे त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यास मदत होते. मिक्सरमध्ये तुळशीची पुरेशी पाने आणि थोडे पाणी घालून पेस्ट बनवा. निरोगी आणि मुलायम त्वचेसाठी या पेस्टमध्ये एक चमचा मध घाला आणि संपूर्ण शरीरावर लावा. १५ मिनिटांनंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवा.
३. साय आणि मसूर डाळ फेसपॅक ः चेहऱ्याची त्वचा संवेदनशील आणि पातळ असल्यामुळे जास्त काळजी घेतली पाहिजे. चेहरा नियमितपणे मॉइश्चराईझ करणे महत्त्वाचे आहे. कोरडी त्वचा असणाऱ्यांसाठी साय आणि मसूर डाळ फेसपॅक उपयुक्त आहे. आपल्या पूर्वजांनी दुधाची मलई (साय) मॉइश्चरायझर म्हणून वापरली.
मसूर डाळीमुळे त्वचेचे आरोग्य सुधारते आणि मृत त्वचेच्या पेशी हळूवारपणे बाहेर काढते. एक चमचा साय घ्या, त्यात मसूर डाळीचे दीड चमचा पीठ घाला आणि नीट मिसळा. जाडसर पेस्ट संपूर्ण चेहऱ्यावर समान रीतीने लावा. १५ मिनिटांनंतर ते धुवा आणि तुम्हाला मऊ आणि रेशमी त्वचा दिसेल.
४. जोजोबा तेल ः जोजोबा तेल त्वचेच्या नैसर्गिक तेलांना संतुलित करते. हे दाहविरोधी आहे. अंघोळीनंतर जोजोबा तेल संपूर्ण शरीरावर लावा जेणेकरून कोरडेपणा, फुगणे, खाज सुटणे आणि इतर लक्षणांवर मात करू शकता. जोजोबा तेलाव्यतिरिक्त बदाम, खोबरेल तेलही उपयुक्त आहे.
५. दीर्घकाळ अंघोळ टाळा ः उन्हाळ्यात गरम हवामानामुळे आपल्याला गार पाण्याने अंघोळ करावीशी वाटते. तथापि, पाण्याच्या जास्त संपर्कामुळे त्वचा नैसर्गिक तेलांपासून वंचित राहू शकते. त्यामुळे ती कोरडी आणि कठोर होते. अंघोळीचा कालावधी पाच ते दहा मिनिटांपर्यंत मर्यादित ठेवणे चांगले. त्वचेला कोरडे करू शकणारे साबण टाळा.
पुरेसे पाणी न प्यायल्यास त्वचेला कोरडेपणा येऊ शकतो. दिवसभरात ८ ग्लास पाणी, तसेच फळांचा रस, दूध आणि नारळाचे पाणी पिऊन हायड्रेटेड राहा. तुमची त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आणि कोरडेपणा टाळण्यासाठी ओमेगा-३ फॅटी ॲसिडस् अर्थात फ्लेक्ससीड्स आणि अक्रोड्स, तसेच ताजी फळे आणि भाज्यांचा आहारात समावेश करा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.