

From Acidity to Chronic Disease: Ayurvedic Warning You Shouldn’t Ignore
sakal
डॉ. मोहन पडोले (BAMS, MD)
सध्याच्या काळात आम्लता किंवा अॅसिडिटी ही जवळजवळ सर्व वयोगटांमध्ये आढळणारी सामान्य समस्या झाली आहे. अनियमित दिनचर्या, फास्ट फूडचे वाढते प्रमाण, मानसिक ताण आणि उशिरापर्यंत जागरण यांचा पचनसंस्थेवर सर्वाधिक परिणाम होत आहे. आयुर्वेदात या समस्येला आम्लपित्त असे म्हटले जाते. हे केवळ छातीत जळजळ होण्यापुरते मर्यादित नसून शरीरातील पित्तदोष आणि जठराग्नीच्या असंतुलनाचे परिणाम आहे. योग्य वेळी नियंत्रण न केल्यास हे गंभीर जठरविकारांचे रूप धारण करू शकते.
आयुर्वेदातील प्राचीन आणि प्रमाणिक ग्रंथ जसे चरक संहिता आणि अष्टांग हृदयम् यामध्ये आम्लपित्ताचे सविस्तर वर्णन आढळते. या ग्रंथांनुसार पित्तदोषाची अत्याधिक वाढ होऊन त्यामध्ये आम्ल (आंबट) गुण वाढल्यास हा विकार निर्माण होतो. आयुर्वेदानुसार शरीराचे संपूर्ण आरोग्य 'अग्नि' म्हणजे पचनशक्तीवर अवलंबून असते. जेव्हा अग्नि मंद किंवा विकृत होते, तेव्हा अन्न पूर्णपणे पचत नाही आणि अपक्व अन्नरस आम्लीय बनून शरीरात विकार निर्माण करतो. हीच स्थिती पुढे जाऊन आम्लपित्तास कारणीभूत ठरते.