Mental Health Problem : राज्यात ४४ टक्के महिलांना मानसिक समस्या

‘माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित’ अभियानातील माहिती
Maharashtra 44 percent women have mental health problems
Maharashtra 44 percent women have mental health problemsEsakal

मुंबई : राज्यातील ३० वर्षे वयावरील ४४ टक्के महिला मानसिक आरोग्याच्या समस्यांनी ग्रस्त असल्याची माहिती ‘माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित’ या अभियानातून समोर आली आहे. गेल्या दोन महिन्यांत १.५६ कोटी महिलांची विविध असंसर्गजन्य आजारांसाठी तपासणी करण्यात आली. यात ३० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सुमारे ६९,४०,२९९ महिलांना मानसिक समस्या असल्याचे आढळले, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

या महिलांवर उपचार सुरू असून त्यांना समुपदेशनाची गरज असल्याचे मानसोपचारतज्ज्ञ सांगत आहेत, पण मानसोपचारतज्ज्ञांची संख्या आपल्याकडे कमी असल्याने अशा आजारांचे निदान होत नाही, असेही सांगण्यात येत आहे.

‘माता सुरक्षित तर घर कुटुंब सुरक्षित’ या अभियानाला २६ सप्टेंबर रोजी सुरवात झाली आहे. यात महिलांच्या आरोग्य समस्यांचे निदान आणि उपचार केले जात आहेत. आरोग्य विभागातील एका वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले, की मानसिक समस्यांनी वेढलेल्या महिलांचे समुपदेशन सुरू करण्यात आले आहे.

मानसिक तक्रारींवर मदत हवी असल्यास मानसिक विकार ओपीडीला नियमित येण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मानसिक विकार बाह्यरुग्ण विभागाला (‘ओपीडी‘) भेट देणाऱ्या महिलांना समुपदेशनाची गरज असल्यास समुपदेशानसह उपचार केले जात आहेत.

या महिला आपल्या समस्या सांगण्यास संकोच करताना दिसून येतात; मात्र ‘ओपीडी‘मधील मानसोपचारतज्ज्ञ आग्रह करून त्यांच्या समस्यांचा शोध घेत असल्याचेही अधिकाऱ्याने सांगितले. ग्रामीण भागातील महिलांच्या मानसिक आरोग्य समस्येवर बोलताना एका वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितले, की या महिलांमध्ये माहितीचा अभाव असल्याने त्या त्यांच्यातील नैराश्य किंवा चिंता ओळखण्यास कमी पडत आहेत.

निद्रानाश, श्वास लागणे, तळवे आणि मानेमध्ये प्रचंड घाम येणे यांसारख्या सामान्य वाटणाऱ्या आरोग्य तक्रारी घेऊन बऱ्याचदा त्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जातात. या समस्यांचा संबंध मानसिक आजाराशी असू शकतो. मानसोपचारतज्ज्ञांचा तुटवडा असल्याने अशा विकारांचे निदान करण्यास विलंब होत असल्याचा इशारादेखील त्या अधिकाऱ्याने दिला.

शहरी तसेच ग्रामीण भागातही समस्या

मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी यांच्या मते कोरोना काळात प्रत्येक व्यक्ती मानसिक आरोग्याच्या समस्येला सामोरे जात आहे. यात महिलांची संख्या किंचित जास्त दिसून येत आहे. महिला शहरातील असो किंवा ग्रामीण भागातील, त्यांच्यात मानसिक समस्या दिसून येत आहेत. दरम्यान, शहरी महिलांच्या तुलनेत ग्रामीण भागातील महिला अधिक अबोल असतात, त्यामुळे त्यांना व्यक्त करण्याची संधी देणे आवश्यक असल्याचे डॉ. शेट्टी यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com