मानस वारी ध्यान

भाजून काढणारा वैशाखवणवा संपून ज्येष्ठाचा पाऊस सुरू होतो आणि चाहूल लागते ती पंढरीच्या वारीची.
मानस वारी ध्यान
मानस वारी ध्यानsakal
Updated on

ध्यानस्थ

मनोज पटवर्धन.योगतज्ज्ञ

भाजून काढणारा वैशाखवणवा संपून ज्येष्ठाचा पाऊस सुरू होतो आणि चाहूल लागते ती पंढरीच्या वारीची. मराठी मातीत जन्मलेला प्रत्येक माणूस विठोबाचं दर्शन घेतो. मात्र, वारकऱ्यांबरोबर वारीत सामील होणं त्याला जमतंच असं नाही. अशांना ‘मानस वारी ध्याना’तून अनुभूती घेता येऊ शकते. हे कसं करायचं ते बघू या.

शरीर शिथिल, श्वसन संथ, मन शांत अशा स्थितीत डोळे मिटून बसावं. मनात खालील भाव आणावेत :

देहू, आळंदीतून ज्ञानोबा-तुकोबांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने निघाल्या आहेत. पालखीच्या मागोमाग दिंड्या चालल्या आहेत. आपणही वारकरी होऊन दिंडीत सामील झालेले आहोत. ‘लाखो वारकरी घरसंसार विसरून, तहानभूक हरपून त्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी का बरं जातात?’ या प्रश्नाचं उत्तर शोधण्याची उत्सुकता मनात दाटलेली आहे.

रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवीगार झाडं आहेत. मध्येच पावसाची एखादी जोरदार सर चिंब भिजवून जाते आहे. सगळा आसमंत विठ्ठलनामात बुडून गेला आहे. ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’च्या गजरात तल्लीन होऊन, देहभान विसरून वारकरी नाचतायत. हरीनामात दंग होऊन आपण विठ्ठलाच्या समीप चालत आहोत. पंढरपूरजवळ आलेले आहोत. चंद्रभागेच्या वाळवंटी क्षणभर विसावताना दुरून देवळाच्या कळसाचं दर्शन होतंय. प्रत्यक्ष पांडुरंगाच्या दर्शनाची तळमळ अधिक तीव्र झाली आहे. हरीनामाचा गजर करत आपण देवळाच्या दिशेने निघालो आहोत.

ज्ञानोबाऽऽ माऊऽऽली तुकारामऽऽ

ज्ञानराजऽऽ माऊऽऽली तुकारामऽऽ

ज्ञानबाऽऽ तुकाराम... ज्ञानबाऽऽ तुकाराम...

आता अगदी देवळाच्या दारात उभे आहोत. ‘देवाचीये द्वारी उभा क्षणभरी’ असा विचार मनात येताक्षणी ‘सायुज्य, सालोक्य, सारुप्य, सामिप्य’ या चारही मुक्ती प्राप्त झाल्या. या मुक्तावस्थेतच विठ्ठलरखुमाईच्या चरणी कधी लीन झालो कळलंच नाही. त्या पावलांना अगदी घट्ट मिठी घालुन आता त्याचेच होऊन राहिले आहोत.

हेच ते आपल्या संतांनी हजारो वर्षांपासून वर्णीलेलं ध्यान!!!

मनाची ताकद विलक्षण असते. श्रद्धापूर्वक अंत:करणाने हे ध्यान करून अनेक योगसाधक खरोखरच वर्षानुवर्षं घरबसल्या विठ्ठलभेटीचा स्वर्गसोहळा अनुभवत आहेत. साधकांना येणारा हा ‘ध्यानानुभव’ म्हणजे केवळ अंधश्रद्धा नसून ‘विज्ञानानुभव’ आहे असा एका दीर्घानुभवी, ज्येष्ठ योगतज्ज्ञांचा ठाम निष्कर्ष आहे. ही अनुभूती त्यांनी अनेकदा शास्त्राच्या कसोटीवर घासून पाहिल्यावर विलक्षण गोष्टी समोर आल्या.

देवाची भक्ती, परमेश्वराचं चिंतन करताना अपार आनंद मिळतो. अशावेळी मनात उमटणाऱ्या भावना, विचार, विकारांचं स्पष्ट प्रतिबिंब मेंदूतल्या रसायनांमधे दिसतं. ‘डोपामाइन’ रसायन मेंदूत पाझरलं, की आनंदाची, सुखाची भावना निर्माण होते. परमेश्वराशी एकरूपत्व साधलं, की होणारा आनंद अतुलनीय असतो. त्यामुळे या ध्यानात तर ते खूपच स्रवत असणार.

मेंदूवर जगभर प्रचंड संशोधन चालू आहे. विज्ञानाच्या कक्षेत न येणाऱ्या विषयांमध्ये वैज्ञानिक डोकावतायत. ‘मेंदूविज्ञानावर आधारीत धर्मशास्त्र’ (न्यूरोथिऑलोजी) या विषयात होणाऱ्या संशोधनामुळे वर्षानुवर्षांचे गैरसमज मोडीत निघत आहेत. त्यामागचं वैज्ञानिक तत्त्व लक्षात येतं आहे. भविष्यातही बरंच काही समोर येईल याची शास्त्रज्ञांना खात्री आहे.

‘मानस वारी ध्यान’ करून प्रत्येकाला विठ्ठलाचा शोध लागेल की नाही ते सांगता येत नाही; पण आपल्या स्वतःचा शोध नक्कीच लागेल. आपण स्वतःला जास्त चांगलं ओळखू लागू, हे मात्र निश्चित.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.