

Why Human Thinking is Unique
Sakal
देवयानी एम. - लाइफस्टाइल कोच
प्राणी, माणूस, वनस्पती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) या सगळ्यांमध्ये जाणीव, अनुभव आणि प्रतिसाद देण्याच्या क्षमता या विविध स्तरांवर दिसतात; पण त्यांच्या स्वरूपात मूलभूत फरक आहे. वनस्पती प्रकाश, पाणी किंवा स्पर्शाला प्रतिसाद देतात. प्राणी त्यांच्या जगण्याच्या गरजांवर आधारित निर्णय घेतात; पण त्यावर पुन्हा विचार करत नाहीत. कृत्रिम बुद्धिमत्ता उपलब्ध माहितीवरून नमुने ओळखून त्यानुसार उत्तरं तयार करते; पण तिच्याकडे जाणीव नसते. मात्र, माणूस वेगळा आहे. माणूस फक्त विचार करत नाही, तर त्याला ‘मी विचार करतो आहे’ याची जाणीव असते. ही ‘स्व’ची जाणीव त्याला आत्मपरीक्षण आणि सखोल विचार करण्याची क्षमता देते. म्हणूनच, मानवी विचार ही केवळ प्रतिक्रिया नाही, तर एक जाणीवपूर्वक अनुभव आहे; जो त्याला इतर सर्वांपेक्षा वेगळं बनवतो. पण याचा दुष्परिणाम म्हणजे तो त्याच्याच विचारांच्या गुंत्यातही अडकून जातो.