

Health benefits of honey natural remedies
sakal
(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित.)
मध खाऊ नये, मधामुळे त्रास होतो, लहान मुलांना तर मध मुळीच देऊ नये वगैरे प्रचार अचानक सगळीकडे सुरू झालेला दिसतो. तसे पाहता आयुर्वेदाने पाच अमृतयोग सांगितले आहेत, त्यामधील मध एक आहे. म्हणून मध, दही, तूप, साखर व दूध यापासून तयार केलेले पंचामृत प्राणशक्ती वाढविणारे, जीवनदान देणारे अप्रतिम रसायन म्हटलेले आहे. यावर लोकांची श्रद्धा राहावी किंवा त्याचा उपयोग व्हावा म्हणून पूजा वगैरे करताना देवांना पंचामृतस्नान घालण्याची पद्धत रूढ होती. देवाला पंचामृताचे स्नान घालून झाल्यावर पंचामृताचे तीर्थ सर्वांना देऊन प्रसाद घेणाऱ्यांच्याही पोटात पंचामृत जावे ही योजना पूर्वापार काळापासून दिसते. असे असताना मध खाऊ नये अशी हाकाटी अचानक का सुरू झाली? याची दोन कारणे असू शकतात, एक म्हणजे मधामुळे आरोग्य टिकले तर निसर्गविरोधी औषधे कशी खपणार? दुसरे कारण असे की, भेसळयुक्त आणि बनावटी मध बाजारात येऊ लागले.
बऱ्याच वर्षांपूर्वी एक शास्त्रज्ञ पंचकर्म करण्यासाठी परदेशातून येथे आलेले होते. त्यांनी सांगितले की जखम झाली, भाजले, कापले तर त्यावर तूप-मध लावण्याने जखम भरते, हे अत्यंत सोपे व प्रभावी औषध आहे. यासाठी कोरफडीचा रस व मध हेही लावता येते. त्यांनी असे सांगितल्यावर भाजलेल्या व कापलेल्या जखमेवर तूप-मध लावून पाहिले व त्याचा अप्रतिम गुण येत असल्याचे दिसले.