Experts recommend boiled water, freshly cooked food, regular hygiene and light meals to reduce the risk of digestive problems and infections during the rainy season.
Sakal
डॉ. मालविका तांबे
जून महिन्याची सुरुवात झाली की सगळ्यांचे डोळे आकाशाकडे लागतात. उकाड्यामुळे हैराण झाल्यामुळे कधी एकदा काळे ढग आकाशात जमा होऊन पावसाची एखादी सर येईल व जिवाला शांत करेल असे वाटते. पण प्रत्यक्ष पावसाळा सुरू झाला की मात्र चिखल, ओले कपडे, ओले केस, सतत छत्री, रेनकोट बरोबर ठेवण्याचा त्रास वगैरे गोष्टी आठवतात. त्याचबरोबर आठवतात ते सहजपणे होणारा सर्दी-खोकला, उफाळणारा दमा, अंगदुखी-सांधेदुखी हे त्रास. मला वाटते हवामान खात्याच्या सर्व अंदाजांची गल्लत करणाराही हाच एक ऋतू असावा. कुठे, कधी, किती पडेल याचे कोणत्याही प्रकारचे बंधन हा पाऊस पाळत नाही. म्हणूनच आरोग्याच्या दृष्टीने विचार करता हा ऋतू सगळ्यांत अवघड असतो. हवेत असलेला गारवा, हवेत वाढलेली आर्द्रता, कमी झालेला सूर्यप्रकाश यामुळे शरीरातील अग्नी मंदावतो. अग्नी मंदावल्यामुळे काहीही चुकीचे खाण्यात आल्यास पोट बिघडणे, उलट्या, जुलाब, अपचन यांसारखे त्रास होऊ लागतात. हवेत असलेल्या प्रदूषणामुळे व स्वच्छता न बाळगल्यास अन्न-पाणी दूषित झाल्यामुळे या काळात संक्रामक आजार वाढायला लागतात. दोन-अडीच वर्षांपासून सर्वदूर धुमाकूळ घालणारा व आत्ता कुठे हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे असे वाटत असलेला कोरोना पावसाळ्याची चाहूल लागताच डोके वर काढू लागला आहे असे आढळते आहे. त्यामुळे सद्यपरिस्थितीत आरोग्याची काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे झालेले आहे.