इनर इंजिनिअरिंग : शिक्षण आणि अध्यात्म
जगातील सगळ्यात बुद्धिमान लोकांनी या ग्रहावरील सर्व हिंसाचारात योगदान दिले आहे. लोकांचा एक विशिष्ट वर्ग नेहमीच मुळात हिंसक राहिला आहे.
सद्गुरू : बरेच सुशिक्षित लोक जे त्यांच्या करिअरमध्ये खूप यशस्वी असतात, त्यांच्या स्वतःच्या जीवनात खूप गोंधळलेले असतात. ते ज्या प्रकारे असतात, यावरून हे अगदी स्पष्ट असते, की जेव्हा त्यांच्या स्वतःच्या जीवनाचा प्रश्न येतो तेव्हा ते त्यांच्या मेंदूचा वापर करत नाही. म्हणून आपण आपल्या मुलांना फक्त लिहिणे-वाचणे नाही, तर बुद्धी कशी वापरायची हे शिकवले पाहिजे. वाचन आणि लेखन महत्त्वाचे आहे, पण मेंदूचा वापर करणे अधिक महत्त्वाचे आहे.
शिक्षणाने तुमच्या बुद्धीला चालना दिली पाहिजे, ती नष्ट करता कामा नाही. आज जगभरातील शिक्षण शास्त्रज्ञ असे म्हणत आहेत, की जर एखाद्या मुलाने वीस वर्षे औपचारिक शिक्षण घेतल्यास त्याची सत्तर टक्के बुद्धिमत्ता कायमची नष्ट होते. याचा अर्थ तुम्ही एक सुशिक्षित मूर्ख म्हणून बाहेर येता आणि हा मानवजातीचा खूप मोठा अपमान आहे, कारण जगाचे भविष्य फक्त या मुलांच्या बुद्धीवर अवलंबून आहे. आपण या ग्रहावर सुंदर वस्तू तयार करणार आहोत, की अत्यंत विध्वंसक बॉम्ब बनवणार आहोत, हे माणसाच्या भावना आणि बुद्धिमत्ता किती सुसंगत आहे यावर अवलंबून आहे.
जगातील सगळ्यात बुद्धिमान लोकांनी या ग्रहावरील सर्व हिंसाचारात योगदान दिले आहे. लोकांचा एक विशिष्ट वर्ग नेहमीच मुळात हिंसक राहिला आहे. सुरुवातीला, जेव्हा माणूस गुहेत राहायचा तेव्हा तो दगडाने मारायचा, तो काळ म्हणजे अश्मयुग. न्यूक्लिअर युग म्हणजे तो आण्विक शस्त्रांनी मारतो. काही लोक नेहमीच मुळात हिंसक राहिले आहेत, पण आज हिंसा खूप मोठ्या स्तरावर होऊ शकते. आणि याचे कारण जगातील सर्वोत्तम मेंदूंनी मानवजातीला मारण्याचे सर्वांत हिंसक मार्ग तयार करण्याचे काम हाथी घेतले आहे. जगातील बुद्धिमानांनी सहकार्य केले नसते, तर एक हिंसक माणूस एकाला किंवा दोघांना, काठीने किंवा दगडाने मारू शकला असता. पण जगातील हुशार लोकांनी सहकार्य केल्यामुळे, एक हिंसक माणूस लाखो लोकांना मारू शकतो. जे वरदान असायला हवे होते, तो इतका मोठा शाप बनला आहे. त्यात शिक्षणाचा नक्कीच एक मोठा वाटा आहे.
खरे तर, ह्या जगाचे लहान मुलांनी मार्गदर्शन केले असते तर ते सुंदर असले असते, कारण ते इतर कोणाहीपेक्षा जीवनाच्या जास्त जवळ आहेत. शेवटी, तुम्ही या ग्रहावर जे काही करू इच्छिता ते फक्त मानवी कल्याणासाठीच आहे. मानवी कल्याण म्हणजे मानवी आनंद. तुम्ही तुमच्या मुलांकडे आणि स्वतःकडे बघितले, तर नक्कीच तुमची मुले तुमच्यापेक्षा जास्त आनंदी आहेत. ते चोवीस तासांच्या काळात, तुमच्यापेक्षा जास्त आनंदी राहण्यास सक्षम आहेत.
असे असताना, मला सांगा जीवनासाठी सल्लागार कोण असावा, तुम्ही की तुमचे मूल? नक्कीच मुले. तुम्ही तुमच्या विचार आणि भावनांमध्ये वाहून जाता पण तुमची मुले जीवनाच्या खूप जवळ आहेत. जर मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा जगाने मुलांकडून शिकले, तर हे खूप सुंदर ठिकाण बनेल.