

The Warkari tradition teaches that love, humility and chanting Vitthal's name are the true essence of the Pandharpur pilgrimage.
sakal
अभय महाराज जगताप
आषाढ महिना सुरू झाला आहे. बहुतेक संतक्षेत्रांवरून संतांच्या पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या आहेत. सोपानदेवांच्या अभंगामधून ही आनंददायी, प्रेमरसाची वारी समजून घेता येते.
‘चला रे वैष्णवहो जाऊ पंढरीसी
प्रेमामृत खुणा मागू त्या विठ्ठलासी’
असे म्हणत सर्व वैष्णवांना त्यांच्यासह पंढरपूरला येण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. पंढरपूरला कशासाठी जायचे तेसुद्धा त्यांनी सांगितले आहे. ते म्हणतात- ‘प्रेमामृत खुणा मागू त्या विठ्ठलासी’. पंढरपूरला जाऊन त्या पांडुरंगाकडे प्रेमामृत मागायचे आहे. सोपानदेवांनी पंढरपूरला माहेर म्हटले आहे. विठ्ठल व रुक्मिणी माता-पिता आहेत. अशा या माहेराला जायचे ते त्यांचे प्रेम मिळवण्यासाठी. सोपानदेव प्रेम मागत आहेत. प्रेम त्यांच्या दृष्टीने अमृत आहे. द्वेष, मत्सर, क्रोधावर मात करण्यासाठी प्रेमाची आवश्यकता असते. आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्या व्यक्तीवर रागवत नाही. त्या व्यक्तीच्या भल्यासाठी रागावतो. संत कोणावर चिडत नाहीत. त्यांच्या वचनातून क्वचित कधी क्रोध जाणवला तरी तो समाजाच्या भल्यासाठी असतो. संतांकडे द्वेष आणि मत्सराला थारा नसतो. वारकऱ्यांकडेही नसावा अशी त्यांची अपेक्षा आहे. संतांकडे प्रेमरसाचा भरपूर साठा आहे. त्यांचे हृदय सर्व प्राणिमात्रांविषयीच्या प्रेमरसाने ओथंबून भरले आहे. हा प्रेमरस वाटतच ते पंढरपूरला निघाले आहेत. देवाचे प्रेम मिळवण्यासाठी स्वतः सर्वांना प्रेम देणे ही इथे पूर्वअटच आहे.