गेली बरीच वर्षे मला दम्याचा त्रास होत होता. ॲलोपॅथिक औषधे चालू होती, पण तरीही सतत अशक्तपणा जाणवणे, काही काम केले की छातीत दुखणे वगैरे त्रास होत असत. बऱ्याच तपासण्या केल्या पण काही निदान झाले नाही. संतुलनमध्ये तपासणी करून घेऊन औषधे सुरू केल्याने गेली दोन महिने खूपच बरे आहे. ॲलोपॅथिक व आयुर्वेदिक अशी दोन्ही औषधे सुरू ठेवण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. ही दोन्ही औषधे एकत्र घेतली तर चालतात का, त्याचा काही त्रास होणार नाही ना, याचे मार्गदर्शन करावे.
- चंद्रकांत बोकिल, नागपूर
उत्तर – आयुर्वेदिक औषधे वनस्पती किंवा नैसर्गिक वस्तूंपासून तयार केलेली असतात व ही औषधे रोगाच्या मुळावर काम करतात, शारीरिक शक्ती, वीर्य व प्रतिकारशक्ती वाढवायला मदत करतात. ॲलोपॅथिक औषधे सहसा रोगाच्या लक्षणांवर काम करतात. त्यामुळे दोन्ही प्रकारची औषधे एकत्र घ्यायला काही हरकत नाही. दोन्ही प्रकारची औषधे घेताना मध्ये किमान अर्धा ते एक तासाचे अंतर ठेवणे जास्त उत्तम.
संतुलनच्या वैद्यांनी तुम्हाला छातीला नियमित अभ्यंग करण्याचा सल्ला दिलाच असेल. एकूणच दम्याचा त्रास आहे व छातीत दुखते आहे त्यादृष्टीने रोज शरीराला अभ्यंग करणे उत्तम. याचबरोबरीने शास्त्रोक्त पंचकर्म करण्याचाही फायदा होऊ शकेल. पंचकर्म केल्यावर ॲलोपॅथिक व आयुर्वेदिक औषधे कमी करायला वा बंद करायला मदत होऊ शकते असा आत्मसंतुलनमध्ये बऱ्याच रुग्णांमध्ये अनुभव आहे.