Helath : योग- जीवन : अनारोग्याची कारणे

रजस आणि तमस हे त्रिगुण पंचक्लेशांचे आणि चित्तवृत्तींचे पालन-पोषण करतात. हे क्लेश आणि ह्या वृत्ती अनारोग्याची मूळ कारणे आहेत.
yoga
yogasakal
Summary

क्लेश आणि ह्या वृत्ती अनारोग्याची मूळ कारणे आहेत

आपण अनारोग्याच्या कारणांचा विचार करतो, पतंजलींनी त्या कारणांच्या कारणांचा विचार केलेला आहे .सत्त्व , रजस आणि तमस हे त्रिगुण पंचक्लेशांचे आणि चित्तवृत्तींचे पालन-पोषण करतात. हे क्लेश आणि ह्या वृत्ती अनारोग्याची मूळ कारणे आहेत.

अविद्यास्मितारागद्वेषाभिनिवेशाः क्लेशाःll साधनपाद सूत्र-३ ll

अविद्या : म्हणजे अज्ञान. पण ज्ञानाचा अभाव नव्हे तर चुकीचे ज्ञान असणे होय .अविद्या म्हणजे गैरसमजुती. जो आत्मा नाही त्याला आत्मा मानणे. जे अशुद्ध आहे त्याला शुद्ध मानणे. जे दुःखप्रद आहे त्याला सुखप्रद समजणे. जे अशाश्वत आहे त्याला शाश्वत समजणे म्हणजे अविद्या. ह्या अविद्येमधूनच पुढील चार क्लेश उत्पन्न होतात.

अस्मिता : ज्ञान ग्रहण करण्याची इंद्रियांची क्षमता आणि ज्या शक्तीच्या (आत्मा )आधाराने ज्ञानग्रहण केले जाते त्या दोन्ही एकच समजणे (अहंकार). ''मी''पणा.स्वतःच्या वेगळेपणाची जाणीव म्हणजे अस्मिता होय.

राग : विषय सुखांचा अनुभव घेतल्यानंतर त्यांविषयी आसक्ती निर्माण होणे. ती सुखे पुन्हा- पुन्हा कशी प्राप्त होतील या विचारातच मन सातत्याने गुरफटून जाणे. राग म्हणजे आसक्ती.

द्वेष : दुःखांचा अनुभव आल्यानंतर त्यांविषयी आणि त्यांच्या कारणांविषयी तिरस्कार, तिटकारा निर्माण होणे.

अभिनिवेश : आपल्या अस्तित्वाविषयी तीव्र आसक्ती. म्हणजेच मृत्यूविषयी भीती. हा अत्यंत सूक्ष्म असा क्लेश आहे. सर्वसामान्यांपासून विद्वानांपर्यंत सर्वांमध्ये आढळतो. सर्व भयांचे मूळ कारण असा हा क्लेश आहे.

अय्यंगार गुरुजी म्हणतात, ‘‘सुखाचा पायाच हरवला आहे. शुद्ध ,पवित्र सुख केवळ आत्मिक आनंदात आहे याचा विसर पडल्याने, भौतिक सुखांच्या मागे धावण्याने, इंद्रिय भोगांच्या गरजा प्रमाणाबाहेर वाढल्याने, शारीरिक व मानसिक विकार रुजू लागतात. त्यामुळे मन भयभीत, शंकाग्रस्त होते. भावनिक गोंधळ निर्माण होतो यालाच मनोशारीरिक रोग असे म्हणतात.

जसे पर्यावरणाचे प्रदूषण वाढले आहे तसे अंतर्गत प्रदूषणही वाढलेले आहे. आपली कर्मे आणि विचारही संस्कारांमधून उद्भवतात. शरीर व मन घडविणारे आचार आणि विचार जेव्हा दूषित होतात तेव्हा शारीरिक व मानसिक रोग होण्यास वेळ लागत नाही.

जीवनातील सरळपणा, साधेपणा नष्ट झाला आहे. असंतुष्टता वाढत आहे. नीटनेटके राहणे, प्रामाणिक असणे हे जणू अशक्य झाले आहे. द्वेष, असूया, मत्सर, हाव, लोभ, काम, क्रोध या सर्व जंजाळात अडकलेल्या जिवाला शांती कशी लाभणार?’’

आजचे आसन आहे सुप्त एक पादआकुंचनासन-

पाठीवर असे निजा की दोन्ही तळपाय भिंतीला पूर्णपणे टेकलेले राहतील.

गुडघ्यांमागचा भाग, पार्श्वकडा, उदरपोकळीचा कणा जमिनीकडे जाऊ द्या.

तळपाय टाचेसहित भिंतीस रोवून ठेवा.

उजवा पाय गुडघ्यात वाकवा. श्वास सोडा व उजवी मांडी पोटाकडे आणा.

उजवी पार्श्वकड आक्रसू देऊ नका. कंबर जमिनीपासून उचलू नका.

दोन्ही हातांनी उजवी मध्यनडगी पकडा. मांडी पोटावर दाबा.

या स्थितीत थांबण्याचा काळ वाढविण्यापेक्षा, एकदा उजवीकडे व एकदा डावीकडे असे तीन-चार वेळा करा.

उपयोग

कंबरेतील दोष, खुब्यांतील दुखण्यामुळे जेव्हा पायदुखी उद्भवते तेव्हा या दुखण्यांवर लाभदायक. महिलांना घरकामात उद्भवणाऱ्या कंबर दुखीवर गुणकारी. कटिबंधाची हाडे वर खाली असतील तर ती एका पातळीत आणण्यास मदत होते. गुडघे, मांड्यांच्या दुखण्यात लाभदायक.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com