जेव्हा व्यापला अवघा "सवाई आसमंत'...

सवाई गंधर्व महोत्सवाला सुरवात; श्रोत्यांच्या गर्दीमुळे रंगली "स्वरयात्रा'
पुणे - एव्हाना कित्येक श्रोते आपापल्या खुर्च्यांवर आसनस्थ होतच होते आणि बरेचसे तर अजूनही मंडपाच्या प्रवेशद्वारापाशीच घुटमळत होते, तोवरच "गाणाऱ्या' सनईचे मधूर स्वर अवघा "सवाई आसमंत' कवेत घेते झाले होते. राग "मारू बिहाग'ची आर्तता आणि गोडवा कानांत साठवून घेत आणि या वातावरणात अलवारपणे स्थिरावत रसिकांनी आपल्या स्वरयात्रेला प्रारंभ केला होता. अर्थात, या सगळ्याला कारणंही तसंच होतं- खास ठेवणीतल्या सुरांचे वेचे रसिकांच्या ओंजळीत वर्षानुवर्षं रिते करणाऱ्या "सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा'ला सुरवात झाली होती...

गेली साडेसहा दशकं नेमानं काहीसं असंच स्वरधुंद करणारं वातावरण अनुभवायला देणारं आणि रमणबाग प्रशालेच्या विस्तीर्ण पटांगणावर विसावलेल्या अवाढव्य मंडपात पाहायला मिळणारं हे स्वरदृश्‍य बुधवारी "सवाई'च्या चौसष्ठाव्या वर्षीही अनुभवता आलं. अगदी त्याच नेहमीच्या धाटणीत आणि मंत्रमुग्ध गर्दीत. अर्थात, या अनुभवाचं श्रेय जेवढं सवाई परंपरेला होतं, तेवढंच ते होतं एस. बल्लेश आणि कृष्णा बल्लेश या सनईवादनातल्या ख्यातनाम पिता-पुत्र जोडीलाही !
पुण्यासारख्या एखाद्या शहराच्या सांस्कृतिक वैभवात मोलाची भर टाकणाऱ्या आणि त्या अर्थाने इथला "घरगुती'च उत्सव असणाऱ्या "सवाई'ची सुरवात सनईसारख्या खास पारंपरिक वाद्याच्या सुरावटींनी व्हावी, याहुन अधिक चांगले द्योतक ते काय असावे ?... शांतता आणि प्रेमाचा संदेश देणाऱ्या आणि शब्दशः गाणाऱ्या सनईची ठायीठायी प्रचितीच देणाऱ्या उस्ताद बिस्मिल्ला खॉंसाहेब यांच्या तालमीत घडलेल्या या जोडगोळीने रसिकांना आपल्या सादरीकरणाने भारून टाकलं नसतं तरच नवल ! बिस्मिल्ला खॉं यांच्या जन्मशताब्दी निमित्त आजचं सत्र त्यांनाच समर्पित करण्यात आलं होतं.

या आगळ्या ढंगाच्या सनई पर्वणीनंतर मंचावर आल्या त्या ख्याल सादरीकरणासाठी विशेष ओळखल्या जाणाऱ्या अन्‌ पुण्याचं माहेर असणाऱ्या गायिका गौरी पाठारे. आपल्या आवाजाला साजेश्‍या राग "भीमपलास'ने त्यांनी आपल्या गायनाला सुरवात केली. आलापीच्या स्वरूपात सुरांना खेळवत गायलेल्या बहुढंगी बंदिशींनी त्यांनी रसिकांना स्तिमित केलं, खिळवून ठेवलं.

यानंतर मंच सज्ज झाला तो इमदादखानी इटावा घराण्याची वादन परंपरा समर्थपणे पुढे नेत असलेले आणि सतारीसोबतच सूरबहार या सतारीशी मिळत्या-जुळत्या आणि अतीव मधूर स्वरांच्या वाद्यासाठी परिचित असणारे उस्ताद इर्शाद खॉं यांच्या आगमनासाठी. स्वतः आपल्या वादनाचा मनमुराद आनंद घेत या अवलिया वादकाने रसिकांनाही त्याच आनंदाची सफर मनसोक्त घडवली. सूरबहार आणि सतार या दोन्हीही वाद्यांवरची त्यांची हुकूमत सहजवादनातून पावलोपावली जाणवत होती. तंत्र अंग आणि गायकी अंगाचा सुश्राव्य संयोग असलेला तराणा सादर करून त्यांनी मैफल वेगळ्याच उंचीवर नेत रसिकांना उत्स्फूर्तपणे उभं राहून मानवंदना द्यायला भाग पाडलं. स्वरांनी भारावलेल्या या पहिल्या दिवसाची सांगता किराणा घराण्याचे गायक पंडित गणपती भट यांच्या सुरेल गायनाने झाली.
आनंद देशमुख यांनी निवेदन केलं.

होरी पासून ते ठुमरी पर्यंत !
सुरेल गायकीच्या सोबतच गायकी अंगाच्या वादनाने "सवाई'चा पहिला दिवस रंगला. "बिरज में धूम मचायें शाम' किंवा "याद पिया की आयें' यांसारख्या होरी आणि ठुमरी या गानप्रकारांनीही हा दिवस अविस्मरणीय केला. त्यातही "सैय्या मोरे थारें बिन निंदीया ना आयें' ही राग "पिलू'तली बंदिश स्वतः गात आणि सतारही वाजवत इर्शाद खान यांनी वातावरण अंतर्मुख केल्याचा अनुभव दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com