जिगरबाज युवकांनी रात्रभर जागून वसंतगडावरील विझवला वणवा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या किल्ले वसंतगडाला वणवा लावण्यात आला आहे.
कऱ्हाड (सातारा) : जागतिक वसुंधरा दिनाच्या (World Earth Day) शुक्रवारी रात्री ऐतिहासिक वसंतगडाला Vasantgad (जि. सातारा) वणवा लागला होता.
त्याची माहिती मिळताच जिगरबाज युवकांनी जिवाची बाजी लावून रात्रभर तब्बल सात तास परिश्रम घेवून आग आटोक्यात आणली. त्यामुळं वृक्षसंपदा वाचली असून पुढील अनर्थही टळला आहे. मावळ्यांच्या या कामगिरीचं मोठं कौतुक होत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या किल्ले वसंतगडाच्या उत्तरेकडील बाजूकडून वणवा लावण्यात आला. रात्री आठच्या सुमारास आग लागली. गडावर वाऱ्याचा जोर मोठा असल्यानं आगीनं लगेचेच रौद्ररुप धारण केलं. त्यामुळं काही वेळातच आग सर्वदूर पसरली.
त्याची माहिती गडावर असणारे प्रकाश साळुंखे यांनी वसंतगडमधील युवकांना दिली. त्यानंतर काही वेळातच वसंतगड टीमचे सदस्य प्रथमेश चव्हाण, राज होवाळ, प्रणव चव्हाण, गजानन माळी, रामभाऊ माळी, दत्ता जामदार यांनी कऱ्हाडमधील बांधकाम व्यावसायिक डॉ. महेश पाटील यांच्याकडून आग विझवण्यासाठी सिलेंडरची अग्निशमन यंत्रणा घेवून ते तातडीनं गडावर दाखल झाले.
त्यावेळी आगीन रौद्ररुप धारण केल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी तातडीनं संबंधित यंत्रणा जोडून रात्रभर वणवा विझवण्याचा प्रयत्न केला. आगीत मोठ्या प्रमाणात वृक्षसंपदा, प्राण्यांचं नुकसान झालं आहे.
दरम्यान, युवकांनी जिवाची बाजी लावून आग विझवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळं मोठा अनर्थ टळला आहे. त्यामुळं त्या युवकांच्या कामगिरीबद्दल त्यांचं कौतुक होत आहे.