कडेगाव (सांगली) : काय रिमझिम,काय गारवा अन काय तांबडा पांढरा ओक्केय. आषाढ महिना सुरु झाल्याने सर्वत्र 'आकडी पार्ट्यां' रंगू लागल्या आहेत. सध्या सुरु असलेला रिमझिम पाऊस व हवेतील गारठा 'आकाडी पार्ट्यां'साठी पोषक ठरत असून मांसाहारी खवय्ये झणझणीत तांबड्या पांढऱ्या रश्श्यावर ताव मारत असल्याचे चित्र सर्वत्र दिसू लागले. (paschim maharashtra celebrated as a non veg party)
आषाढ महिन्यामध्ये सर्वदूर पावसाचे आगमन होते. त्यामुळे हवेमध्ये मोठ्या प्रमाणात गारठा निर्माण होतो. अशा वातावरणात ग्रामीण भागात म्हसोबा, वीर, मागली आई, मरीआई आदी देवदेवतांना कोंबडा व बोकडाचा बळी देण्याची प्रथा आहे.
आषाढ महिन्यानंतर श्रावण महिना येतो हा महिना हिंदू धर्मियांमध्ये पवित्र मानला जातो. या महिन्यात विविध देवदेवतांची उपासना, पूजा, आराधना, व्रतवैकल्ये यांची मोठी रेलचेल असते.
यानंतर श्रावणातील दर सोमवारी अनेक ठिकाणच्या देवदेवतांच्या यात्रा असतात. त्यामुळे पवित्र अशा श्रावण महिन्यामध्ये बहुतांश हिंदूधर्मिय मांसाहार आहार करणे टाळतात.
परिणामी आषाढ महिन्यातच लोक मांसाहारी जेवणाचा पुरेपूर आस्वाद घेत असतात. तर आकाडीच्या पार्श्वभूमीवर सध्या ग्रामीण भागात देशी कोंबडा व बोकड खरेदी विक्रीची गडबड उडाली आहे.
साधारणपणे दहा किलोच्या बोकडाची किंमत पाच ते सहा हजारावर तर देशी कोंबड्याची किंमत ५०० ते ६०० रुपयांवर पोहोचली आहे. आकाडीच्या पार्श्वभूमीवर देशी कोंबडा व बोकडांची टंचाई भासू लागली आहे.
परिणामी, मिळेल तेथे व मिळेल त्या किंमतीला लोक देशी कोंबडा व बोकड खरेदी करुन आकाडी साजरी करण्याकडे ग्रामीण भागात कल दिसून येत आहे. आकाडीचे पै-पाहुणे व मित्रमंडळीना निमंत्रण दिले जात आहे.
सर्वत्र आकडीच्या निमित्ताने रात्रीच्यावेळी तांबड्या पांढऱ्या रश्श्यासह झणझणीत मटणाच्या जेवणावळी वाढू लागल्या आहेत.
तर अनेकांनी गटारी अमावस्येची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे सध्याच्या गारवा वातावरणात अनेक ठिकाणी आकाडीची 'धूम' पाहायला मिळत आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.