Raksha Bandhan 2022: ओवाळणीच्या ताटात ठेवा 'या' 7 गोष्टी
रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या लाडक्या भाऊरायाला राखी बांधण्याइतकेच त्याला ओवाळणेदेखील महत्त्वाचे असते. या ओवाळणीच्या ताटात या 7 गोष्टी असणं आवश्यक आहे.
1. कुंकू: रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर भावाला ओवाळण्यासाठी जे ताट सजवाल त्यामध्ये कुंकू असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात कपाळी टिळा लावून करण्याची पद्धत आपल्याकडे आहे. त्यामुळे ताटातील कुंकवानं भावाच्या माथी टिळा लावणं हे प्रतिष्ठेचं प्रतीक मानलं जातं.
2. अक्षता: ओवाळणीच्या ताटात अक्षता(तांदूळ) असणंही तितकंच महत्त्वाचं आहे. अक्षता म्हणजे ज्या अपूर्ण नाहीत, ज्या अखंड आहेत. त्यामुळे रक्षाबंधानानिमित्त केलेलं पूजन देखील अक्षतांप्रमाणे पूर्ण असावे हा त्यामागील अर्थ आहे.
3. नारळ: नारळ हे सुख-समृद्धीचे प्रतीक आहे. भावाच्या आयुष्यात सुख-समृद्धी कायम राहावी अशी प्रार्थना बहिण करत असल्याने या ताटात नारळाच विशेष महत्व आहे .
4. राखी: मनगटावर राखी बांधल्याने शरीरातील वात, पित्त आणि कफ हे त्रिदोष शांत होतात असा समज आहे. मनगटांच्या नसांवर राखीच्या धाग्यानं दाब पडल्यानं हे तिन्ही दोष नियंत्रित राहतात असंही म्हटलं जातं.
5. गोड पदार्थ: भावाचे तोंड गोड करण्यासाठी ताटात . गोड पदार्थ असणं आवश्यक आहे. बहिण-भावाच्या नात्यात कटुता निर्माण होऊ नये आणि त्यांच्या नात्याचा गोडवा असाचं कायम राहावा यासाठी ताटात गोड पदार्थाला विशेष महत्त्व असते.
6. आरती : ओवाळणीच्या ताटात दिवा असणं महत्त्वाचं आहे. सर्व प्रकारच्या वाईट शक्तींपासून भावाचं रक्षण व्हावं यासाठी प्रकाशाच्या ज्योतीनं त्याला ओवाळतात शिवाय दिव्याला सकारात्मकतेचे प्रतीक मानण्यात आलं आहे.
7. सोनं : ओवाळणीच्या ताटात सोनं असणं महत्त्वाचं आहे. भावाच आयुष्य सोन्यासारख उजळाव म्हणून ओवाळणीच्या ताटात सोनं महत्त्वाच मानलं जातं.