Chopda Sugar Factory: चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची ३२ वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी (ता. २७) दुपारी एकला चहार्डी येथील कारखाना ‘साईट’वर झाली. सभेच्या अजेंड्यावर एकूण नऊ विषय होते. यापैकी तीन विषय नामंजूर तर एक विषय तहकूब करण्यात आला. सभेला अनेक ऊस उत्पादक सभासदांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले.
सभेत अनेक विषयांवर वादळी चर्चा झाली. यामध्ये ‘चोसाका’ आणि ‘बारामती ॲग्रो’मध्ये झालेला भाडे करारनामा हा सर्वसाधारण सभेची मंजुरी न घेता करण्यात आला असून, कराराची नक्कल कोणालाही वाचायला मिळाली नाही. झालेल्या कराराविरोधात १३ संचालकांनी राजीनामा दिला. (3 topics out of 9 rejected in Chopra Sugar factory meeting jalgaon news)
कोणत्याही नेत्याला माहीत नसताना करारनामा करण्यात आला असून, तो आम्हाला मान्य नसून करारनामा रद्द व्हावा, अशी कठोर भूमिका घेत तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची ३२ वार्षिक सभा गाजवली.
या वेळी व्यासपीठावर ‘चोसाका’ अध्यक्ष चंद्रहास गुजराथी, माजी आमदार कैलास पाटील, उपाध्यक्ष एस. बी. पाटील, माजी अध्यक्ष ॲड. घनश्याम पाटील, संचालक डॉ. सुरेश श्यामराव पाटील, माजी अध्यक्ष अतुल ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवर सभेस उपस्थित होते.
या वेळी कारखाना भाडेतत्त्वावर देताना व्याजाचा प्रश्न नव्हता, तो आला कुठून? यासाठी सभा घेतली का? ठराव करताना कारखान्याचा क्षेत्रातील कामगार, ऊस याला प्राधान्य दिले नाही, भाव दिला नाही, निम्म्यापेक्षा जास्त लागवड चांगल्या ‘रिकव्हरी’चा ऊस लावला तरी भाव नाही, शेतकऱ्यांच्या कष्टाने, (स्व.) धोंडू आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना उभा राहिला आहे.
वाचलेले प्रोसेडिंग शेतकऱ्यांना समजले नाही. तेवढ्यात तुम्ही शेतकऱ्यांकडून मंजुरी का घेतात? वार्षिक सभेचा अहवाल सभासदांना का दिला नाही? यासह अनेक प्रश्नांची सरबत्ती चहार्डी येथील शेतकरी नारायण पाटील यांनी केली. माजी संचालकांनी ‘चोसाका’कडून ॲडव्हान्स का व किती घेतली ते सांगावे. रोपवाटिका तयार करणे, रोपे पुरविणे असे अनेक वादे ‘बारामती ॲग्रो’ने केले होते, ते पूर्ण करताना दिसत नसल्याबाबत माजी संचालक विजय पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला.
तसेच माजी संचालक मंडळावर उपस्थित झालेल्या प्रश्नांवर माजी अध्यक्ष अतुल ठाकरे हे स्वतः पुढे येत उत्तर देऊ लागले आणि ‘दूध का दूध, पानी का पानी’ होऊ द्या, असे आव्हान दिले. असे अनेक प्रश्न उपस्थित करत शेतकऱ्यांनी सभा गाजवली. तर आमच्या समस्या ‘बारामती ॲग्रो’शी संबंधित आहेत आणि तेच सभेला नाहीत, असा प्रश्नही काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील यांनी उपस्थित केला.
..या विषयांवर झाली चर्चा
सभेत यावेळी विषय क्रमांक एकवर चर्चा करताना ‘बारामती ॲग्रो’ला भाडेतत्त्वावर देण्याचा ठराव करताना व्याजदर फेररचना करावी, केलेला करारनामा दुरुस्त करावा, केंद्र सरकारच्या ‘एनसीडीसी’कडे प्रस्ताव पाठवून कमी व्याजदराने कर्ज घ्यावे, कारखाना ‘बारामती ॲग्रो’ चालवेल पण टॅगिंग ‘एनसीडीसी’कडे वर्ग करावी.
यात पहिल्या वर्षात कारखान्यास व्याज आकारण्यात येणार नाही तर व्याजदर अवघा ७ टक्के इतका असल्याने याकडे लक्ष देण्यात यावे. विषय क्रमांक तीन तहकूब तर विषय क्रमांक चार, पाच, सहा नामंजूर करण्यात आले, अशी माहिती प्रभारी कार्यकारी संचालक आधार पाटील यांनी दिली आहे. या वेळी के. एन. पाटील, अशोक पाटील, अनिल पाटील, हिंमत साळुंखे, संजय पाटील आदी उपस्थित होते.
"कारखाना चालविण्यासाठी ऊस लावावा लागेल. आजची ‘रिकव्हरी’ दहावर आहे. करार रद्द करून व्याज विषयावर कारखाना चालणार नाही. कामगारांचा थकीत पेमेंटचा विषय देखील लवकरच मार्गी लागेल. बारा टक्के व्याजाचा विषय संचालक मंडळाला मान्य नाही." - चंद्रहास गुजराथी, अध्यक्ष, चोसाका
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.