बनाना सिटी अकरा महिन्यानतंर पुन्हा गजबजू लागली !

बनाना सिटी अकरा महिन्यानतंर पुन्हा गजबजू लागली !

सावदा : राज्यासह संपूर्ण देशात केळीची पंढरी म्हणून ओळख असलेली ‘बनाना सिटी’ सावदा शहर तब्बल अकरा महिन्यांनंतर केळी उत्पादक, व्यापारी, कामगारांनी पुन्हा गजबजू लागली आहे. सात वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर प्रायोगिक तत्त्वावर दिल्लीला रेल्वेद्वारे केळी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात केळी उत्पादक, व्यापारी व कामगारांना त्याचा फायदा होत आहे. गेल्या वर्षी सुरवातीपासूनच कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर उत्पादकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. सोन्यासारखा माल मातीमोल विक्री करावा लागला होता. पण आता केळी उत्पादकांना पुन्हा सुगीचे दिवस येऊ पाहत आहे. 

शेतकऱ्यांची मरगळ झटकण्यासाठी व आपला शेतमाल इच्छित स्थळी पोचवण्यासाठी शासनाकडून किसान एक्सप्रेसद्वारे सावदा रेल्वे स्टेशन येथून आठवड्यातून दोन वेळा व्हीपीयु व एकदा बीसीएन वॅगनद्वारे साधारणतः: पंधरा हजार क्विंटल केळी दिल्ली येथील आजादपूर मंडीला रवाना होत आहे. म्हणूनच कासव गतीने होणारी केळी भाववाढ अचानक मुसंडी मारत हजाराच्या पार पोहोचली असून यात स्थिरता राहील, असे जाणकारांचे मत आहे. सात वर्षांपासून ओस पडलेल्या सावदा रेल्वे स्थानकाला केळीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर लोकल ट्रक कामगार व मजुरांमुळे गतवैभव प्राप्त झाले आहे. सावदा स्टेशन येथे मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर, मुक्ताईनगर, यावल, रावेर, जामनेर, चोपडा, भडगाव, जळगाव या भागातून देखील केळी येत असल्याने केळीची पंढरी फुलली आहे. 

रेल्वेकडून ५० टक्के अनुदान 
देशाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत शेतमाल जलद वाहतुकीद्वारे लवकर पोहोचून शेतकरी आणि ग्राहक दोघांना फायदा होईल म्हणून किसान रेलद्वारे रेल्वे मंत्रालय व अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने ऑपरेशन ग्रीन- टॉप ते टोटल अंतर्गत भारतीय रेल्वेने रेल्वे सेवा प्रकाराच्या माध्यमातून ५० टक्के अनुदान केळी व अन्य फळांना उपलब्ध करून दिली आहे. 

सातशे जणांना रोजगार 
रेल्वेने केळी वॅगन भरण्यासाठी मनुष्यबळाची गरज भासत असते एका डब्यासाठी १५ कामगार लागतात. एक दिवसाआड ४० डबे सावदा रेल्वे स्थानक येथून लोड होत असतात, त्यामुळे सावद्याला नव्याने सहाशे ते सातशे लोकांना व ट्रकचालक, क्लीनर, ट्रॅक्टरचालक यांनादेखील रोजगार उपलब्ध झाला आहे. 

भाड्याच्या तफावतीमुळे बाजारभावात वाढ 
रेल्वे एका क्विटंलसाठी १४० रुपये दर आकारणी करत असते. मात्र याउलट डिझेल व पेट्रोलच्या किमती वाढल्याने दिल्लीचे आजचे ट्रक भाडे ४५० रुपये प्रतिक्विंटल आहे. ६ जानेवारी ते आजपर्यंत रेल्वेने ८० हजार क्विंटल केळी, दिल्लीला पोचण्यात आली आहे. त्यामुळे रेल्वेला एक कोटी १२ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. हेच भाडे ट्रकने करायचे झाल्यास तीन कोटी ६० लाख रुपये एवढे असून, दोन कोटी ४४ लाखांची बचत झाली असून, याचा सरळ फायदा केळीच्या बाजारभाव वाढीसाठी झाला आहे. 


जिल्ह्यातील आर्थिक जीवनरेखा असलेल्या केळीला रेल्वे वाहतुकीमुळे सुगीचे दिवस आले आहेत. रेल्वेने दिल्लीपर्यंत होणारी केळी वाहतूक उत्तर भारतातील जम्मू, पंजाब, कानपूर, लखनौ सह इतर राज्यांत रेल्वेने वाहतूक झाल्यास केळी उत्पादकास आणखी दोन पैसे अधिकाचे मिळतील. 
- कमलाकर पाटील 
केळी उत्पादक, कोचूर 

केळीचे पंजे करून बॉक्स भरणे व डोक्यावर केळीचे घड वाहतूक करणे मोठ्या जिकरीचे काम आहे. तरुणांनाच रोजगार उपलब्ध होता, पण रेल्वेने केळी वाहतूक सुरू झाल्याने मध्यमवयीन व्यक्तीदेखील हे काम करीत आहेत. बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाल्याने आम्ही समाधानी आहोत. 
- पंकज पाटील, 
सचिव, केळी कामगार कल्याणकारी संघ 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com