चोपडा : राज्यासह जळगाव जिल्ह्यातील तापमानात कमालीची वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात जिल्ह्यात दाटलेले अवकाळीचे ढग कमी होऊन, जिल्ह्यात आता उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. मंगळवारी जळगाव जिल्ह्यातील तापमानाचा पारा ४२ अंशावर गेला आहे. चोपडा शहरासह तालुक्यात ही तापमान ४२ अंशाच्या वर गेल्यामुळे जिल्ह्यात उष्णतेची लाट निर्माण झाल्याने या तापमानवाढीचा फटका केळी बागायतदार शेतकऱ्यांना बसत आहे. (Jalgaon Banana Crop)
घड सटकण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. पाने करपत आहेत. बाष्पीभवनामुळे केळी सुकू लागली आहे. जिल्हयात चोपडा, यावल, रावेर हा भाग केळीपट्टा म्हणून ओळखला जातो.गेल्या दोन तीन दिवसांपासून तालुक्यातील सरासरी तापमान ४२ अंशांपेक्षा अधिक झाले आहे. काल बुधवारी (ता.१७) ४४अंश सेल्सिस तर आज गुरुवारी (१८) ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद तालुक्यात झाली.
वाढत्या तापमानामुळे केळीबागांना फटका बसला असून पाने, शेंडा करपण्यासह केळीचे घड सटकणे, उन्हाच्या चटक्यांमुळे घडांना काळे डाग पडण्याचे प्रमाणही वाढले आहे. उष्णतेमुळे केळीची गुणवत्ताही कमी होऊन उत्पादन घटणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चोपडा तालुक्यात जवळपास ७ हजार हेक्टर वर कांदे बाग केळीची लागवड करण्यात आली असून या केळीला याचा फटका बसला आहे.
विमा कंपनीने याकडे त्वरित लक्ष देण्याची गरज आहे. केळीच्या वाढीसाठी साधारणपणे ३८ अंशांचे तापमान आवश्यक असते. त्यापेक्षा अधिक तापमानात केळी बागांवर अनिष्ट परिणाम होतात. केळी पट्यात चोपडा परिसरात ४४ अंशांपर्यंत पारा पोहोचला आहे. या कारणांमुळे केळीचे घड सटकण्याची सर्वात मोठी समस्या निर्माण झाली आहे. (latest marathi news)
प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी उपयुक्त असलेली मोठया आकाराची पाने उन्हामुळे फाटून करपत आहेत. तर कोवळा शेंडा काळा होऊन वाढ थांबली आहे. दररोज प्रति झाड २५ ते ३० लिटर पाणी देऊनही बाष्पीभवनाची प्रक्रिया वेगाने होत असल्याने केळी बागेच्या दोन ओळींमध्ये जमिनीला भेगा पडल्या आहेत. या मुळे केळी उत्पादकांवर आता केळी अधिक पाणी देण्याची वेळ आली आहे.
केळी पिकाचे प्रचंड नुकसान :-
चोपडा,यावल व रावेर तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी केळी पिकाची लागवड केली असून, निसर्गाच्या लहरीपणाचा फटका केळी पिकांसह शेतकऱ्यांना बसतो आहे.नुकतीच जिल्ह्यातील विविध ठिकाणी वादळी वारा व गारपीट झाल्याने केळी पिकांचे मोठे नुकसान झाले असतांना, गेल्या तीन दिवसांपासून चोपडा तालुक्यातील मंगरूळ,अडावद,धानोरा,वडगाव.
वढोदा, विटनेर मोहिदा, घोडगाव, वेलोदा सह परिसरात तापमानाचा पार ४३ डिग्री सेल्सिअस पार झाल्याने,केळीचे घड निसटून पडत आहेत.शेतकरी वाढत्या तापमानापासून केळीच्या घडाचे रक्षण करण्यासाठी कोरड्या पानांचे घडावर आच्छादन करत आहेत. भूजल पातळी खोल गेल्याने तसेच, वीज पुरवठाही मर्यादित वेळेत होत असल्याने या संकटाची तीव्रता वाढत आहे.
अशी काळजी घ्यावी
केळीच्या पानांमधून पाण्याचे उत्सर्जन टाळण्यासाठी केवोलिन हे बाष्परोधक फवारणी करावी, केळी बागेचे उष्ण हवेपासून संरक्षणासाठी कुंपण करावे. केळी बागेत आद्रता टिकविण्यासाठी काडी कचरा पॉलिथिन पेपरने आच्छादन करावे, मातीत ओल राहू द्यावी.
"केळी पिकाची रोपे महाग असून, केळीचे संगोपन करण्याचा खर्च अफाट आहे.रासायनिक खते,तसेच मजुरीचे वाढते दर यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च खूप वाढला आहे."शेतकऱ्यांनी हवामान बदलावर आधारित फळपीक विमा काढला असून,या वाढत्या तापमानाची दखल घेऊन संबंधित इन्शुरन्स कंपनीने इन्शुरन्सचा लाभ शेतकऱ्यांना द्यावा."- प्रा.संदीप पाटील (केळी बागायतदार शेतकरी आदर्शगाव वडगाव बुद्रुक)