Eknath Khadse News : लोकसंपर्क अन्‌ विकासकामांची मालिका हीच ‘खडसें’ची पुंजी : एकनाथ खडसे

Jalgaon News : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजप प्रवेशाची भूमिका घेतली. एकूणच विविध कारणांमुळे चर्चेत राहिलेल्या खडसेंशी या घडामोडींबद्दल साधलेला संवाद...
Eknath Khadse
Eknath Khadse esakal

सत्तेच्या केंद्रस्थानी नसले तरी राज्यातील राजकीय वर्तुळात ‘वजनदार’ नेते, म्हणून एकनाथ खडसे यांचा उल्लेख होतो. फडणवीस सरकारच्या काळात मंत्रिपदाचा राजीनाम्यामुळे व २०१९ ला विधानसभेची उमेदवारी नाकारल्याने त्यांचे फडणवीस यांच्याशी मतभेद झाले. २०२० ला त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची वाट धरली. गेल्यावर्षी त्यांना विधानपरिषदेची आमदारकीही बहाल झाली अन्‌ वर्षाच्या आतच ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजप प्रवेशाची भूमिका घेतली. एकूणच विविध कारणांमुळे चर्चेत राहिलेल्या खडसेंशी या घडामोडींबद्दल साधलेला संवाद... (jalgaon eknath khadse interview)

प्रश्‍न : भाऊ, ‘राष्ट्रवादी’तून अचानक भाजपमध्ये येण्याबाबत ३६० अंशांतील भूमिका बदलाचा निर्णय घेण्यामागचे कारण?

खडसे : गेल्या ४० वर्षांपासून मी सक्रिय राजकारणात आहे. पैकी जवळपास ३५ वर्षांहून अधिक काळ भाजपतच होतो. जळगाव जिल्हाच नव्हे, तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्र आणि राज्यातही भाजपचा पाया, त्यानंतरचे पक्षाचे घर हे माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांच्या योगदानातून उभे राहिलेय. प्रतिकूल स्थितीत आम्ही काम करून पक्ष वाढवला. दरम्यानच्या काळात काही सहकाऱ्यांशी निर्माण झालेल्या मतभेदांमुळे मी थोडा बाजूला झालो होतो. तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एकूणच काम व विचारांनी मी कालही प्रभावित होतो व आजही आहे. त्यामुळेच पुन्हा भाजपत मी स्वत: बांधलेल्या घरात येण्याचा निर्णय घतला.

प्रश्‍न : आपण पक्षात येण्याची घोषणा केली, मग अधिकृत प्रवेश का थांबलांय किंवा कुणी रोखला आहे काय?

खडसे : माझा प्रवेश रोखण्याचे काही कारण नाही. केंद्रीय स्तरावरील नेत्यांशी माझे निकटचे संबंध कायमच राहिले आहेत. त्यांनी ‘ग्रीन सिग्नल’ दिल्यानंतर प्रवेश थांबण्याचे काही कारण नाही. स्वत: पक्षाचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे यांनीही लवकरच प्रवेश होईल, असे स्पष्ट केलेय. देवेंद्रजींनीही त्यांची काहीही हरकत नाही, असे सांगितलेय. निवडणुकीचा माहोल आहे, नेत्यांची व्यस्तता आहे. त्यामुळे औपचारिकता तेवढी राहिलीय. ती लवकरच होईल.

प्रश्‍न : रक्षाताईंना उमेदवारी मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न केलेत, हे खरे आहे काय?

खडसे : रक्षाची उमेदवारी जाहीर झाली, त्यावेळी मी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये होतो. रक्षाला तिने गेल्या दहा वर्षांत केलेल्या कामांमुळे, मतदारसंघात ठेवलेल्या जनसंपर्कामुळे पुन्हा संधी मिळाली. सर्वेक्षणातही रक्षाचे नाव आघाडीवर होते. त्यामुळे मी त्यासाठी प्रयत्न करण्याची गरज नव्हती.

प्रश्‍न : आपण, कुटुंबातच सर्व पदे राखल्याचा आरोप होतो, त्याबद्दल काय सांगाल?

खडसे : मुळात, २०१४ पर्यंत कुटुंबात केवळ मी आणि रक्षा असे दोन्हीच सक्रिय राजकारणात होतो. रक्षादेखील अगदी ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आली. नंतर सरपंच व जिल्हा परिषद सदस्य, सभापती झाली. ती तिच्या योग्यतेने पुढे गेली. रोहिणीदेखील पक्षाची सदस्य होती. पदाधिकारी म्हणून तिनेही काम केले.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी निर्माण झालेल्या परिस्थितीने रक्षाला पक्षाने उमेदवारी दिली, ती निवडूनही आली आणि चांगले कामही करीत आहे. २०१५ मध्ये झालेल्या जिल्हा बँक, दूध संघाच्या निवडणुकीत माझ्या भूमिकेमुळेच दोन्ही ठिकाणी पहिल्यांदा भाजपची सत्ता आली. दोन्ही सहकारी संस्था अडचणीत असताना, खडसे कुटुंबातील सदस्यांना चेअरमन केले आणि दोन्ही संस्था अडचणीतून बाहेर आल्या. रोहिणीने तर जिल्हा बँकेत चेअरमन असताना, बँकेचा साधा चहा व भत्ताही घेतला नाही. (latest marathi news)

Eknath Khadse
Raksha Khadse: खासदार खडसे- कार्यकर्त्यांतील वादाचा व्हीडीओ व्हायरल! नाथाभाऊंचे नाव घेता, गिरीशभाऊंचे का नाही : कार्यकर्ता

प्रश्‍न : पक्षातील अन्य कार्यकर्त्यांना यामुळे वंचित राहावे लागले?

खडसे : असे अजिबात म्हणता येणार नाही. कारण, मी सुरवातीपासूनच माझा कार्यकर्ता कसा मोठा होईल, हे पाहिलेय. ग्रामपंचायत, सहकारी संस्था, जिल्हा परिषदेत अनेक कार्यकर्त्यांना मोठे केले. अनेक नावे घेता येतील, पण त्यांचा उल्लेख करणे उचित नाही. रक्ताचे पाणी करत कार्यकर्त्यांच्या मागे उभा राहिलो. विरोधकांशी संघर्ष करत पक्ष विस्तारात योगदान दिले.

प्रश्‍न : यंदाच्या लोकसभा निवडणुकीकडे, विशेषत: रावेर मतदारसंघातील लढतीकडे कसे पाहता?

खडसे : २०१४ व २०१९ ला झालेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा ही निवडणूक वेगळी आहे. अर्थात, त्याआधीही रावेर व पूर्वाश्रमीच्या जळगाव लोकसभा मतदारसंघात (जळगाव जिल्ह्यातही) भाजपचे वर्चस्व राहिले आहे. शिवाय, गेल्या दहा वर्षांत मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने व व्यक्तिश: रक्षाताईने मतदारसंघात केलेल्या कामांचा प्रभाव आहे. त्यामुळे या निवडणुकीतही मतदार भाजपच्या पाठिशी व पर्यायाने रक्षाताईसोबत उभा राहील, याची खात्री आहे.

प्रश्न : या निवडणुकीत पुन्हा जातीपातीचे समाजाचे राजकारण होतेय का?

खडसे : रावेर मतदारसंघातील नागरिक सुजाण आहेत. ते कधीही जातीपातीच्या अथवा समाजाच्या राजकारणाला बळी पडणार नाहीत. या मतदारसंघाने सातत्याने भाजपला मतदान केले आहे, तसेच खडसे कुटुंबीयांवरही प्रेम केले आहे. या मतदारांचा नेहमीच विकासाकडे कल राहिला आहे. त्यामुळे मतदार जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन भाजप व पर्यायाने रक्षाताईच्या पाठीशी उभे राहतील.

प्रश्‍न : आपण भाजपत जाण्याचा निर्णय घेतला, पण आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही?

खडसे : अडचणीच्या काळात मला शरद पवारांनी साथ दिली. भाजपत जाण्याचा निर्णय मी त्यांना कळवल्यानंतर घेतला. पक्षाचाही राजीनामा दिला. विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचीही तयारी दर्शवली. मात्र, पवारांनीच तो नाकारला. (latest marathi news)

Eknath Khadse
Coffee with Sakal : उमेदवार म्हणून मी केवळ माध्यम, मतदार ‘मोदी पीएम मिशन’वर! रक्षा खडसे

अनेक प्रकल्पांची मुहूर्तमेढ रोवली; काही अपूर्ण राहिल्याची खंत कायम

युती शासनाच्या काळात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री असताना, स्वत:च्या संस्था न उघडता तालुका स्तरावर आयटीआय, मुलींसाठी होस्टेल, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांचे जाळे निर्माण केले. पाटबंधारे खात्याची जबाबदारी आल्यानंतर तापी खोरे विकास महामंडळाची स्थापना करून शेकडो सिंचन प्रकल्पांची मुहूर्तमेढ रोवली.

खानदेशला सुजलाम्‌ सुफलाम्‌ करण्याचा प्रयत्न केला. अंजनी, गूळ, वाघूर, पाडळसरे, शेळगाव, प्रकाशा, सुलवाडे, सारंगखेडा यासह मुंदखेडा, वरखेड-लोंढे, बोदवड उपसा, वरणगाव-तळवेल, जळगाव जामोदजवळील इस्लामपूर सिंचन योजना, आमदगाव यासारख्या सिंचन योजना निर्माण केल्या. धरणगाव, बोदवड तालुक्यांची निर्मिती, नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती माझ्याच काळातील.

२०१४ मध्ये फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात विविध १२ खात्यांचे दायित्व होते, तेव्हाही कृषी विद्यापीठाचे त्रिभाजनासह खानदेशात स्वतंत्र विद्यापीठ, कृषी महाविद्यालय, हॉर्टिकल्चर, पशुवैद्यकीय महाविद्यालय, लिंबूवर्गीय संशोधन केंद्र, केळी टिश्‍यू संशोधन केंद्रासारखे अनेक प्रकल्प घोषित करून त्यासंबंधी कार्यवाहीही केली. दुर्दैवाने या योजना, प्रकल्प पूर्ण होऊ शकले नाही, याची खंत वाटते. येणाऱ्या काळात कुठलेही पद असो वा नसो या प्रकल्पांसह सर्वांत मोठ्या मेगारिचार्ज योजनेसाठी प्रयत्न करेल, अशी ग्वाही त्यांनी या संवादातून दिली.

Eknath Khadse
Jalgaon Raksha Khadse : महिलांच्या सक्षमीकरणासाठी मोदी सरकार कटिबद्ध : रक्षा खडसे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com