जळगाव : शिरपूर येथील पानमळे नामशेष होण्याच्या मार्गावर

एकेकाळी शिरपूर होते पानाचे माहेरघर
Jalgaon leaf production
Jalgaon leaf productionsakal

शिरपूर जैन : पूर्वी शिरपूर येथे बरेचसे पान उत्पादक शेतकरी विड्याच्या पानाचे उत्पादन घेत होते, त्यांना पानमळ्यापासून चांगले उत्पन्न मिळायचे. त्यांचा व पारिवाराचा उदरनिर्वाह त्यावर चालायचा. पानमळे तयार करण्यासाठी ज्या वेली वापरण्यात वापरण्यात येतात त्याला नागवेल असे म्हटले जाते. मात्र दैनंदिन स्वरूपात लागणारे विड्याचे पान आता शिरपूर येथे अगदीच मोजक्या स्वरूपात मिळते. विविध अडचणींमुळे येथील पानमळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

आपल्यापैकी अनेकजण पान खाण्याचे शौकीन असतात. जेवणानंतर पान खाणे ही अनेक वर्षांपासून चालत आलेली परंपरा आहे. पान हे पचनाचे काम करते असे मानले जाते. शिरपूर येथे पूर्वी मोठ्या प्रमाणात पानमळे होते. गावाच्या पूर्वेला बहुतांश शेतकरी पानाचे उत्पादन घेत असे. मात्र आज दिवसेंदिवस कमी होत चाललेला पाणीसाठा, दहा-बारा वर्षांपासून या पिकावर येणारे बुरशीजन्य, मर सदृश्य रोग तसेच निसर्गाचा कोप आणि या पिकाला पीक विमा योजनेचे नसलेले कवच व वातावरणात सतत बदल होत असल्याने नागवेलीपासून पानाचे उत्पादन घेणारे शेतकरी अडचणीत आले. पूर्वी शिरपुरला विड्याच्या पानाचे माहेरघर मानले जायचे.

सद्यस्थितीत येथील पानमळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. एकेकाळी पान मळ्याचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरपूर येथे सध्या केवळ दोन-तीन पानमळे तेही छोट्या स्वरूपात उपलब्ध असल्याचे दिसून येते. या पिकाच्या भरवशावर असणारा शेतकरी हा आर्थिक डबघाईस आला आहे. पान मळ्यातून मिळणारे उत्पन्न मिळेनासे झाले. त्यामुळे केवळ या पिकाच्या भरवशावर असणारा शेतकरी हा डबघाईस आला आहे. पर्यायाने तो आता इतर पिकाकडे वळू लागला आहे. या पिकाचा पीक विम्यात उल्लेख करावा अशी पान उत्पादक शेतकऱ्यांची अनेक वर्षापासून मागणी आहे, मात्र पानमळे उत्पादक शेतकरी हा शेवटी यापासून वंचित राहत आहे.

आता मागावी लागताता आंघ्रातून पाने

दरवर्षी निसर्गाची अवकृपा व पिकावर येणारा मर, बुरशीसदृश्य रोग, अवकाळी पावसाचे संकट, गारपीट अशा परिस्थितीत हाताशी आलेला घास नष्ट होऊन जातो. या पिकाला कर्जाची सुविधा नसणे, पिक विमा नसणे या संदर्भात शासनाकडे अनेक शेतकऱ्यांनी मागणी करूनही त्याचा लाभ शेतकऱ्यांना अद्याप मिळालेला नाही. शिरपूर येथे पानमळे भरपूर प्रमाणात उपलब्ध नसल्यामुळे परिसरात लागणारी पाने आंध्र प्रदेशातून मागवावी लागतात. एकेकाळी पानमळ्यासाठी नावाजलेला हा भाग आज पानाबाबत नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

पूर्वी मोठ्या प्रमाणात आम्ही पानमळ्याची शेती करत होतो, पूर्वी उत्पन्नही चांगले मिळायचे. आता थोडक्या क्षेत्रात पानमळा करतो. पाने मिळतात पण कमी मिळत असल्याने त्याची विक्री आता जवळपासच करतो. उन्हाळ्यात पाणी कमी पडते. तरी पूर्वापार चालत आलेला आमचा हा व्यवसाय टिकवून ठेवत आहोत. तरी सर्वसाधारण उत्पन्न मिळते.

- विलासआप्पा लाहे ,पान उत्पादक शेतकरी, शिरपूर जैन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com