जळगाव : जिल्ह्यातील कृषी विभागातील रिक्त जागा भरण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील शुक्रवारी चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. रिक्त जागा भरण्यासाठी त्यांनी चक्क आपल्याच पक्षाच्या मंत्र्याकडे असलेल्या कृषी खात्याला अल्टिमेटम दिला आहे. मे अखेरपर्यंत जिल्ह्यामधील कृषी विभागातील जागा न भरल्यास ‘मंत्रालय हलवून टाकेन’ अशा शब्दात ते व्यक्त झाल्याचे पाहायला मिळाले.
‘सकाळ’ने कृषी विभागातील रिक्त पदांबाबत नुकतेच वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत पालकमंत्री पाटील यांनी मंत्रालयात रिक्त पदे भरण्याबाबतची माहिती घेतली. जळगाव जिल्ह्यातील कृषी विभागातील रिक्त पदे येत्या ३१ मे अखेर भरली जातील, असे आश्वासन राज्याचे कृषी सचिव, कृषी मंत्र्यांनी दिले असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शुक्रवारी दिली. पालकमंत्र्यांनी सांगितले, की अर्धा जळगाव जिल्हा केळी व कापूस पिकविणारा आहे. जर सैनिक नसतील तर लढाई कशी लढणार? खरीप हंगाम तोंडावर आहे.
शेतकऱ्यांवर विविध प्रकारची नैसर्गिक संकटे येतात. पिकाचे नुकसान होते. अनेक योजना राबवायच्या असतात. त्यात कृषी विभागात कर्मचारी नसतील तर कृषीचे काम कसे चालेल ? नाशिक विभागात कृषी विभागाची ९८ टक्के पदे भरली आहे. इतर जिल्ह्यातही कृषी विभागात पदे भरलेली आहे. मग केवळ जळगाव जिल्ह्यावरच अन्याय का ? दोन वर्षापासून कमी कर्मचारी संख्येवर कृषी विभाग सुरू आहे. रिक्तपदे भरा नाहीतर मंत्रालय हलवून टाकीन, असे सांगितल्याने मे महिन्याच्या अखेरीस ज्या बदल्या होतात त्यात जळगाव कृषी विभागाची रिक्त पदे भरण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.