प्रगल्भतेच्या प्रसंगाला ‘राजकीय फोडणी’ नको!

प्रगल्भतेच्या प्रसंगाला ‘राजकीय फोडणी’ नको!
devendra fadnavis eknath khadse
devendra fadnavis eknath khadsedevendra fadnavis eknath khadse

जळगाव : देवेंद्र फडणवीसांनी (Devendra fadnavis) रक्षा खडसेंच्या निमित्ताने ‘मुक्ताई’ला जाणे जसे गैर नाही, तसे आपल्या अनुपस्थितीत फडणवीस घरी येत असतील तर खडसेंनी त्यांना ‘भोजन केल्याशिवाय जाऊ नका..’ असे आदरातिथ्य दाखविण्यातही वावगे काहीच नाही. या भेट, संवाद आणि भोजनाच्या आग्रहाच्या निमित्ताने दोघा नेत्यांनी राजकीय परिपक्वतेचे उदाहरणच घालून दिलेय. (jalgaon-political-news-devendra-fadnavis-eknath-khadse-tolk-in-phone)

भाजपने माजी मंत्री एकनाथ खडसेंना (Eknath khadse) टप्प्याटप्प्याने मंत्रिमंडळ, निर्णयप्रक्रिया, संघटना, विधिमंडळ आणि शेवटी पक्षातून ‘मायनस’ होईपर्यंत यशस्वी डाव खेळले. खडसे राष्ट्रवादीत आले, पण ना मंत्रिमंडळात स्थान, ना विधिमंडळातील सदस्यपद, ना पक्षातील प्रमुख पद, ना प्रशासकीय पातळीवरील अधिकार. उलटपक्षी गेल्या तीन-चार वर्षांत एकामागून एक नकारात्मक बाबीच वाट्याला आलेल्या. असे असतानाही जिल्ह्यात कोणत्याही पक्षातील राजकीय घडामोडी अथवा नेत्यांच्या हालचाली होतात तेव्हा खडसेंचे नाव या ना त्या कारणाने समोर येतेच.

devendra fadnavis eknath khadse
जिल्ह्यातील ६६ गावांनी कोरोनाला रोखले वेशीवरच

मुळातच या क्षेत्रातील राजकारणात गेल्या ३५ वर्षांपासून खडसेंचाच दरारा राहिला आहे. त्यामुळे खडसेंना ‘मायनस’ करून जिल्ह्याचे राजकारण पुढे जाऊ शकत नाही, ही आजही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जिल्ह्यात आले आणि खडसेंच्या संदर्भाची किनार या दौऱ्याला लागली नसती तरच नवल! झालेही तसेच..! पक्षातील स्थानिक नेत्यांचा विरोध डावलून फडणवीस मुक्ताईनगरात खडसेंच्या निवासस्थानी गेले. गावातच दौरा आणि खासदार भाजपचे म्हटल्यावर फडणवीस ‘मुक्ताई’स्थानी गेले नसते तर त्याच्याही बातम्या झाल्याच असत्या. पण, त्यापलीकडे जाऊन फडणवीस व खडसेंमध्ये ‘मुक्ताई’च्या साक्षीने जो संवाद झाला, त्या संवादाने अनेक राजकीय तर्कविर्तकांना चर्चेची फोडणी बसली.

सार्वजनिक जीवनात, विशेषत: राजकारणाच्या क्षेत्रात काम करताना असे अनुभव अनेकदा येतात. राजकीय अथवा अन्य कोणतेही मतभेद, कितीही तीव्र स्वरूपाचे असले तरी अशा प्रसंगांतून नेत्यांच्या राजकीय प्रगल्भतेचे दर्शन घडत असते. तेच फडणवीसांची खडसेंच्या निवासस्थानी भेट व खडसेंकडून त्यांना भोजनाचा आग्रह या प्रसंगातून घडले.

devendra fadnavis eknath khadse
एकाच वेळी ५१ गुन्हेगार हद्दपार; ‘अनलॉक’च्या पार्श्वभूमीवर मिशन

अर्थात, या प्रसंगांतूनही काही राजकीय चर्चा झडत असेल, तर सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर तीदेखील स्वाभाविक म्हणावी लागेल. राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू अथवा मित्र नसतो, हे नेहमीच सांगितले जाते, अनुभवासही येते. फडणवीसांना जसे ‘मुक्ताई’ भेट टाळणे शक्य होते, तसे फडणवीस निवासस्थानी आल्यावर खडसेंनाही त्यांच्याशी संपर्क करणे टाळता आले असते, पण तसे झालेले नाही. दोघा नेत्यांमध्ये मधल्या काळात निर्माण झालेली तीव्र कटुता सर्वांनीच अनुभवली आहे. त्यामुळे अशी एखादी नैमित्तिक भेट अथवा संवादही अशी कटुता दूर करायला पूरक ठरू शकते.

राजकारणात ‘पुढे असे काही होणारच नाही’ असा दावा कुणी करू शकत नाही, केला तरी तो खरा ठरेल, असे नाही. त्यामुळेही फडणवीसांना ‘आमच्या पक्षाच्या खासदार होत्या, म्हणून गेलो...’ अशी बाजू मांडावी लागली.. आणि ‘घरी आले म्हणून भोजनाचा आग्रह केला, त्यामुळे राष्ट्रवादीचा त्याग करेल या शक्यतेत अर्थ नाही,’ असे स्पष्टीकरण खडसेंनाही करावे लागले.

एकंदरीत या संपूर्ण विषयात केळीच्या नुकसानीपेक्षाही फडणवीसांची खडसेंच्या निवासस्थानी भेट, दोघांमधील संभाषण याच बाबी केंद्रस्थानी राहिल्या. राजकीय अर्थच काढायचा तर, खडसेंना यात ‘मायलेज’ मिळाल्याचे वरवर वाटणे स्वाभाविक असले तरी फडणवीसांनी संवाद साधून खडसेंची गोची केल्याची किनारही या प्रसंगाला आहेच.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com