कापूस पिकविम्याच्या प्रतीक्षेत 20 हजार शेतकरी 

cotone
cotone

पातोंडा (ता. अमळनेर) : तालुक्‍याची अतिवृष्टी तसेच आणेवारी पन्नासच्या आत असल्याने कापूस पीक विमा मंजूर होणे गरजेचे आहे. अमळनेर तालुक्‍यातील 28 हजार शेतकरी कापूस पीक विम्याच्या प्रतीक्षेत असून, विमा कंपनी मात्र क्वारंटाइनमध्ये गेल्याचे दिसून येत आहे. 

मागील वर्षी पातोंडा व परिसरातील 51 गावांमध्ये ऑगस्ट महिन्यात व संपूर्ण तालुक्‍यात ऑक्‍टोबरमध्ये सलग अतिवृष्टीची नोंद करण्यात आली होती. जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे संबंधित अधिकाऱ्यांनी पातोंडा, मठगव्हाण, रूंधाटी, सावखेडा व इतर गावांमध्ये अतिवृष्टीची पाहणी केली होती. महसूल प्रशासनाने सरासरी उत्पन्नाची आणेवारी ही 50 टक्‍क्‍याच्या आत घोषित केलेली आहे. तरीही विमा कंपनी कापूस पीक नुकसानीचा विमा मंजूर करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा संताप शेतकरी करीत आहेत. शासन निर्णायनूसार पीक लागवड व कापणीच्या दिनदर्शिकेनूसार 15 जून दरम्यान कापूस पीक लागवड व 20 डिसेंबर हा कापणीचा कालावधी घोषित असताना या वर्षीच्या खरीप हंगामाला सुरूवात होऊन नवीन कापसाची लागवड देखील झाली आहे. तरीही मागील वर्षीच्या पीक नुकसानीचा विमा मंजूर झाला नसल्याने कोविड संसर्गाच्या पार्शभूमीवर विमा कंपनीच क्वारंटाईन तर झाली नाही ना असा सवाल शेतकरी करीत आहेत. 2018- 2019 मध्ये देखील पीक विमा मंजुरीबाबत पातोंडा मंडळातील शेतकऱ्यांवर अन्याय झाला अशी खंत माजी सरपंच संभाजी बिरारी यांनी व्यक्त केली. 

पीक कापणी प्रयोग तक्ता 
दरवर्षी विमा कंपनीच्या देखरेखीखाली मंडळातील दोन ते तिन गावे निश्‍चित करून तेथे कापूस पिकाचे सहा प्लॉट ठरवले जातात. स्थानिक ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, कृषी व महसूल मंडळ अधिकारी यांच्या देखरेखीत वेचणी केलेला कापूस मोजला जातो. मागील पाच वर्षातील उत्पन्नाची सरासरी काढून त्याआधारे उत्पन्नातील घट ठरवली जाते. त्यानुसार विमा कंपनी नुकसान भरपाई ठरवते. या वर्षी तालुक्‍यातील पातोंडा, अंमळगाव, नगाव, वावडे, भरवस, अमळनेर, शिरूड व मारवड या आठ मंडळात पीक कापणीचे 48 तक्ते यात पातोंडा मंडळात सोनखेडी, पातोंडा व दापोरी या ठिकाणी प्रत्येकी दोन पीक कापणी तक्ते निश्‍चित करण्यात आले होते. 
 
खरीपातील कडधान्य पिकांचा पाच हजार शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर झाला आहे. लवकरच कापसाच्या पीक विम्याबाबत निर्णय घेण्याविषयी विमा कंपनी अधिकारी व कृषी अधिकारी यांच्याशी चर्चा सुरू आहे. कोरोना काळात मर्यादीत उपस्थितीमुळे प्रक्रीयेवर निर्णय घेण्यात अडचणी येत आहेत. लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. 
-अनिल पाटील, आमदार, अमळनेर. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com