
भडगाव : निम्म्या जळगाव जिल्ह्याचा पिण्याचा पाण्याचा आणि शेत भिजविणाऱ्या गिरणा धरणात सोमवारी (ता. ७) ८५ टक्के जलसाठा झाला. धरणात पाणलोट क्षेत्रातील धरणातून आवक सुरू असल्याने गिरणा धरणातून केव्हाही पाणी सुटणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन गिरणा पाटबंधारे विभागाने केले आहे.
परिसरात पाऊस किती झाला, यापेक्षा गिरणा धरणात किती साठा वाढला, याकडे निम्म्या जळगाव जिल्ह्याचे लक्ष लागून असते. एक जूनला गिरणा धरणात ३१ टक्के जिवंत साठा होता. तीन महिन्यांत धरणात ५४ टक्के साठा वाढला. धरणात १५ हजार ६०५ दशलक्ष घनफूट उपयुक्त साठा आहे, तर तीन हजार दशलक्ष घनफूट मृत साठा असून, एकूण १८ हजार ६०५ दशलक्ष घनफूट साठा आहे. त्यामुळे गिरणा पट्ट्यात शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
तीन हजार ९६६ क्यूसेकने आवक
गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाचपैकी तीन धरणे शंभर टक्के भरली. दोन धरणांतही ९५ टक्क्यांपेक्षा अधिक साठा आहे. त्या धरणातून विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे धरणाच्या साठ्यात वाढ होत आहे. हरणबारी, केळझर, नाग्यासाक्या धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत, तर चणकापूर ९४.१५ टक्के, पुनंदमध्ये ९५ टक्के साठा आहे. ठेंगाळा बंधाऱ्यातून सोमवारी तीन हजार ४४४ क्यूसेक पाण्याची धरणात आवक सुरू असल्याचे गिरणा पाटबंधारे विभागाचे एस. आर. पाटील यांनी सांगितले. मन्याड धरणातून गिरणा पात्रात पाणी येत असून, नदी प्रवाही झाली आहे.
पिण्याचा प्रश्न मिटला
गिरणेच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या १५८ ग्रामीण व चार पालिकेच्या पाणीयोजनांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. मात्र, कालव्यांमध्ये पाणी येण्यासाठी धरणात अजून साठा होणे आवश्यक आहे. गिरणा धरणाच्या पाण्यावर जवळपास ६९ हजार हेक्टर क्षेत्र अवलंबून आहे. गेल्या वर्षी धरण १०० टक्के भरले होते. त्यामुळे रब्बी हंगामासाठी धरणातून तीन आवर्तने सोडली होती. यंदा रब्बी हंगाम गिरणेच्या पाण्यामुळे बहरण्याचे चिन्हे आहेत. गिरणा धरणातून पाझंण डावा, जामदा डावा, जामदा उजवा व निम्न गिरणा कालव्यातून शेती भिजते.
गिरणा धरणात ८५ टक्के साठा आहे. लवकरच धरण १०० टक्के भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावकऱ्यांनी सतर्कता बाळगावी.
-धर्मेद्रकुमार बेहरे, कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे, जळगाव
गिरणा धरणात पाणलोट क्षेत्रातील धरणातून अशीच आवक कायम राहिल्यास कोणत्याही क्षणी धरणातून
पाणी सोडण्यात येऊ शकते. त्यामुळे नदीकाठच्या गावकऱ्यांनी सतर्कता बाळगावी, अशा नोटिसा बजावल्या आहेत.
-हेमंत पाटील, उपविभागीय अधिकारी, गिरणा पाटबंधारे, चाळीसगाव
संपादन- भूषण श्रीखंडे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.