आठ महिन्यात सहा खून; कारणे वेगवेगळी, पण कशासाठी इतका क्रुरपणा!

Murder
Murder
Updated on

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : चाळीसगाव तालुक्यात गेल्या आठ महिन्यात तब्बल सहा खून झाले. त्यातील काही खून हे कौटुंबिक वादातून झाले. वाढत्या खुनांच्या घटनांनी संपूर्ण तालुका हादरला आहे. दोन महिन्यापूर्वी हातले येथे दुहेरी हत्याकांड घडले. या हत्याकांडातील मारेकऱ्यांचा अद्यापही शोध लागला नाही. खून, अत्याचार, हाणामाऱ्या, चोऱ्या, बेकायदा दारू विक्री अशा गुन्ह्यांचा आलेख वाढतोच आहे. गेल्या काही काळापासून गुन्हेगारी कारवाया वाढल्या असून खाकी वर्दीचा धाक संपला असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. 

चार जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या चाळीसगाव तालुक्याची लोकसंख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. आजच्या घडीला ही लोकसंख्या पाच लाखाच्या आसपास आहे. त्या मानाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा तोडकी आहे. तालुक्यात सुमारे १३६ खेडी आहेत. त्यापैकी बहुताश गावांची संख्या ही तीन हजाराच्या पुढे आहे. पूर्वी चाळीसगाव पोलीस ठाणे व मेहूणबारे पोलीस ठाणे अशी दोन ठाणी होती. मात्र या यंत्रणेवर ताण पडत असल्याने चाळीसगाव पोलीस ठाण्याचे विभाजन करून चाळीसगाव शहर व चाळीसगाव ग्रामीण अशी दोन पोलीस ठाणी कार्यान्वीत करण्यात आली. त्यामुळे गुन्हेगारी कारवायांवर आळा बसून कायदा व सुव्यवस्था राहील अशी अपेक्षा होती. मात्र तिन्ही पोलीस ठाण्यांमध्ये असलेल्या अपुऱ्या पोलीस बळामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांची दमछाक होते. तपासाचे आव्हान, बंदोबस्ताचा ताण कायम आहे. अशा स्थितीतही पोलीस अनेक गुन्ह्यांचा तपास करून गुन्हेगारांना शोधून काढण्याचे काम करीत आहेत.

वाढती लोकसंख्या आणि अपुरे पोलीस बळ यामुळे गुन्हेगारी घटनांमध्येही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. तालुक्यात अवैध धंद्यांना मोठ्या प्रमाणावर पेव फुटले आहे. या अवैध धंद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर तरुणाई घुसली. अल्पावधीत हातात पैसा पडू लागल्याने चैन वाढली. त्यातून वर्चस्व दिसावे म्हणून गुन्हेगारी कारवाया वाढल्या. त्यातून काहींच्या टोळ्याही तयार झाल्या. या टोळ्यांमध्ये क्षुल्लक कारणांवरून नेहमीच धुसफूस सुरू असते. हाणामारीसारखे गंभीर प्रकार घडतात आणि सर्व सामान्य जनता वेठीस धरली जाते. संबंधीतींना गुन्हे दाखलही होतात पण तरीही या टोळ्यांच्या कारवाया थांबत नाही. क्षुल्लक कारणांवरूनही हाणामारी होणे आणि थेट तलवारी, चाकू, सुरे यासारखे हत्यारांचा वापर करणे आता सहज सोपे झाले आहे. 

आठ महिन्यात सहा खुन
जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान तालुक्यात तब्बल सहा जणांचे विविध कारणांमुळे खुन झाले आहेत. त्यात काही खून हे घरगुती, शेतीच्या वादातून झाले. त्यात काहींचे कारण स्पष्ट झाले पण काही खुनांच्या घटना अजुनही गुलदस्त्यात आहे. चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत हातले येथे २८ जून रोजी मोरे दाम्पत्याचा निर्घृण खून झाला. हा खून कोणी केला? कशासाठी केला? हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. या खूनाप्रकरणी एका संशयितास अटक केली होती. कुंझर येथे जानेवारीमध्ये जयेश चौधरी या बालकाचा विहीरीत मृतदेह आढळून आला होता. पिलखोड येथे शेतीच्या वादातून पुतण्याने काकाचा खून केला. दहिवद येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून ट्रक चालकाचा खून झाला. मेहूणबारे येथे बहीणीचे लग्न मोडले म्हणून तरुणाला संपवण्यात आले. दोन दिवसापूर्वी सख्या भावाने मोठ्या भावाचा खून केला. आठ महिन्यात तब्बल सहा जणांचा खून झाला; तर काही जणांच्या मृत्युचे गुढ कायम राहीले.    

दारुमुळे समाजमन अस्वस्थ
तालुक्यात मोठ्या प्रमाणावर देशी, विदेशी व गावठी दारूची विक्री होत आहे. त्यामुळे सामाजिक स्वास्थ पुरते बिघडले आहे. या दारुमुळे अनेक संसार उद्धवस्त झाले. बेकायदा दारु विक्री विरोधात अनेक गावांतील महिलांनी एल्गार पुकारला परंतू तेवढ्या पुरती कारवाई झाली पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण झाली.सट्टा, जुगार, गांजा विक्री यातूनही गुन्हेगारी वृत्ती वाढीस लागली आहे.

संपादन ः राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com