चाचण्या निम्म्यावर कारण, रुग्णसंख्या घटली ! 

चाचण्या निम्म्यावर कारण, रुग्णसंख्या घटली ! 

जळगाव : महिनाभरापासून जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या घटत आहे, त्यामागे चाचण्या कमी केल्याचे कारण दिले जात असले तरी रुग्ण कमी झाल्यामुळे त्यांच्या संपर्कातील व्यक्तीही स्वाभाविकपणे घटल्याने चाचण्या कमी झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. गेल्या महिन्यापर्यंत दररोज होणाऱ्या अडीच- तीन हजार चाचण्यांची संख्या घटून ती सध्या रोज हजार- पंधराशे चाचण्यांपर्यंत घटली आहे. 

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग गेल्या महिन्यापर्यंत झपाट्याने वाढत होता. सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत संसर्गाचा आलेख चढता होता. जिल्ह्यातील रुग्णसंख्या ५० हजारांच्या टप्प्यात असताना ॲक्टिव रुग्णही अकरा हजारांपर्यंत पोचले होते. त्यामुळे गेल्या महिन्यात कोविड सेंटरमध्ये बेड उपलब्ध होणेही कठीण झाले होते. 

औषधींचाही तुटवडा 
वाढत्या रुग्णसंख्याने गेल्या महिन्यात कोरोना बेड, औषधींचा तुटवडाही निर्माण झाला होता. कोरोनासाठी उपयुक्त ठरणारे टॉसिलीझुमॅब, रेमडेसीवर या प्रकारची इंजेक्शन सहज उपलब्ध होत नव्हती. यासह अन्य औषधींचा काळा बाजार सुरु झाला होता. ऑक्सिजन व आयसीयू बेडसाठी रुग्णांना झडगावे लागत होते. 

रुग्णसंख्या घटल्याचा दिलासा 
मात्र, सप्टेंबरच्या पंधरवड्यानंतर रुग्णसंख्या कमी होत जाऊन ती महिनाभरात खूप खाली आली. नवीन रुग्ण आढळणे कमी झाले, त्या तुलनेत बरे होणाऱ्यांची संख्याही लक्षणीय वाढली. जिल्ह्याचा रिकव्हरी रेट तब्बल ९३ टक्क्यांवर पोचला. सध्या ॲक्टिव रुग्ण दोन-अडीच हजारांच्या घरात असून त्यापैकी केवळ सहा-सातशेच रुग्णांना लक्षणे आहेत. 

चाचण्या कमी, कारण.. 
रुग्णसंख्या घटण्याच्या मागे चाचण्या कमी झाल्याचे कारण सांगितले जात आहे. आकडेवारीचा विचार करताना ऑगस्ट, सप्टेंबरच्या तुलनेत सध्या चाचण्यांचे प्रमाण घटल्याचे दिसते. मात्र, चाचण्या कमी झाल्याने रुग्णसंख्या घटली, असे म्हणता येणार नाही. उलटपक्षी रुग्णसंख्या घटल्याने चाचण्या कमी झाल्या, असा दावा प्रशासन करत आहे. त्यामागे संसर्गाचे समीकरण आहे. क रुग्ण वाढला की, त्याच्या ‘हाय’ व ‘लो रीस्क’ संपर्कातील व्यक्तींच्या चाचण्या कराव्या लागतात. प्रत्येक रुग्णामागे अशा संपर्कातील व्यक्तींच्या चाचण्या वाढतात, पुढे त्यांच्यापैकी कुणी बाधित आढळला तर त्यांच्या संपर्कातील व्यक्तींची संख्या वाढून ही साखळी याच पद्धतीने वाढते. स्वाभाविकत: प्रत्येकाचीच चाचणी करावी लागते, त्यामुळे चाचण्या वाढतात. गेल्या महिनाभरात रुग्णसंख्या सातत्याने घटत असल्याने संपर्कातील व्यक्ती व त्यांच्या संपर्कातील साखळी निर्माण होत नाही. त्याचा परिणाम चाचण्यांवर होऊन त्या कमी झाल्या आहेत. 

संपादन- भूषण श्रीखंडे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com