पहिले दहा हजार तीन महिन्यांत, नंतरचे अवघ्या वीस दिवसांत 

पहिले दहा हजार तीन महिन्यांत, नंतरचे अवघ्या वीस दिवसांत 
Updated on

जळगाव : मुंबई-पुण्याप्रमाणेच जळगाव जिल्ह्यातही गेल्या तीन महिन्यांत कोरोना संसर्गाचा आलेख प्रचंड झपाट्याने वाढला. जिल्ह्यात पहिले दहा हजार रुग्ण होण्यासाठी तीन महिन्यांचा काळ लागला. नंतरचे दहा हजार रुग्ण पूर्ण झाले नसले तरी एकूण रुग्णसंख्या २० हजारांच्या टप्प्यात असून, दोन दिवसांत हा आकडा गाठला जाईल. म्हणजे केवळ २० दिवसांतच नंतरचे दहा हजार रुग्ण वाढले. मृत्युसंख्येबाबतही हा आलेख तसाच आहे. 

जळगाव जिल्ह्यात मार्च २७ ला पहिला रुग्ण, तर २९ ला दुसरा आढळला. त्यांपैकी एकाचा मृत्यू झाला. अमळनेर येथील महिला पॉझिटिव्ह आढळल्यानंतर रुग्णवाढीची मालिका सुरू झाली. 

पहिले १०० महिनाभरात 
२७ मार्चला पहिला रुग्ण आढळल्यानंतर १७ एप्रिलपासून दररोज नवे बाधित आढळणे सुरू झाले. जिल्ह्यात १०० रुग्ण व्हायला एक महिना सात दिवस लागले. ५ मेस रुग्णसंख्या शंभरावर पोचली, तर मृत्यू १४ होते. रुग्णसंख्या ५०० पर्यंत पोचण्यासाठी दोन महिने पूर्ण लागले. २७ मेस जिल्ह्यात ५०० रुग्ण होते, तर तब्बल ६४ जणांचा बळी गेला होता. 

दहा दिवसांत दुप्पट 
मे महिन्यात व नंतर जूनमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली. जिल्ह्यात पाचशे रुग्ण होण्यासाठी दोन महिने लागले असले तरी नंतरच्या अवघ्या दहा दिवसांत त्यात पाचशेने भर पडून एकूण रुग्णसंख्या ६ जूनला हजारावर पोचली, त्या वेळी ११७ मृत्यू झाले होते. पुढे अवघ्या १२ दिवसांत म्हणजे १८ जूनला दोन हजार रुग्ण होऊन मृत्यू झालेल्यांचा आकडा १५५ वर पोचला होता. 

पहिले पाच हजार १०० दिवसांत 
जून व जुलै महिन्यात रुग्णवाढीचा दर कमालीचा वाढला. शे-दोनशेने रुग्ण दररोज वाढू लागले. त्यामुळे पहिला रुग्ण आढळल्यानंतर पहिले पाच हजार रुग्ण १०० दिवसांत आढळले. ८ जुलैस जिल्ह्यातील रुग्णसंख्या पाच हजारांवर पोचून मृत्यूचा आकडा तीनशेवर गेला. नंतरचे पाच हजार रुग्ण अवघ्या २० दिवसांत वाढून २७ जुलैस जिल्ह्यातील रुग्णसंख्येने दहा हजारांचा टप्पा ओलांडला. दहा हजार रुग्ण झाल्यानंतर बरे झालेल्यांचा आकडाही साडेसहा हजारांवर पोचला होता. 

२० दिवसांत दहा हजार 
जिल्ह्यात पहिले दहा हजार रुग्ण व्हायला तीन महिने म्हणजे ९० दिवस लागले. मात्र २७ जुलैनंतर रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होत जाऊन अवघ्या २० दिवसांतच हा आकडा २० हजारांच्या टप्प्यात पोचला आहे, तर एकूण मृत्यूही साडेसहाशेपेक्षा अधिक झाले. 

गेल्या दोन महिन्यांत आपण टेस्टिंग, ट्रेसिंग, ट्रीटमेंट या त्रिसूत्रीवर काम केले. चाचण्यांची संख्या वाढविली, रुग्णसंख्याही त्यामुळे वाढल्याचे दिसते. मात्र, याच दिवसांत आरोग्ययंत्रणा सक्षम केली. मृत्युदर कमी करण्यातही आपल्याला बऱ्यापैकी यश आले आहे. आज जिल्ह्यात पाच हजार ॲक्टिव्ह (उपचाराखालील) रुग्ण असून, जिल्ह्यातील एकूण बेड्स‌ची संख्या साडेबारा हजार एवढी सज्ज ठेवण्यात आली आहे. 
-अभिजित राऊत, जिल्हाधिकारी 

अशी झाली रुग्णवाढ 
तारीख-------रुग्णसंख्या----- मृत्यू 
२७ मार्च -----०१-----------० 
२ मे ---------५०----------१२ 
५ मे----------१००---------१४ 
२७ मे---------५००--------६४ 
६ जून---------१,०००-------११७ 
१८ जून--------२,०००-------१५५ 
८ जुलै---------५,०००-------३०१ 
२७ जुलै-------१०,०००------४६९ 
११ ऑगस्ट ----१५,०००------६१९ 
१७ ऑगस्ट ----१८,५८४------६७१ 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com