खासगी ट्रॅव्हल्स बसची चाके अद्याप रूतलेलीच..! 

खासगी ट्रॅव्हल्स बसची चाके अद्याप रूतलेलीच..! 

जळगाव  : खासगी ट्रॅव्हल्सला प्रवासासाठी अटी-शर्तींवर परवानगी देण्यात आली असली, तरी अद्याप प्रवाशांचा प्रतिसाद व वाहतूक करातील सवलतीचा प्रश्‍न मार्गी न लागल्याने खासगी ट्रॅव्हल्स बसची चाके अद्याप रूतलेलीच आहे. जळगावातून सध्यापुण्याला अवघ्या सात-आठ फेऱ्या, तर मुंबईसाठी दिवसातून चार-पाच फेऱ्याच जात आहेत. परिणामी ट्रॅव्हल्सचालक अजूनही आर्थिक विवंचनेत आहेत. 

कोरोना महामारीचा सर्वच क्षेत्रांना बसलेला फटका व त्याचे परिणाम प्रकर्षाने जाणवू लागले आहेत. गेल्या २४ मार्चपासून देशभरातील रेल्वे, प्रवासी वाहतूक लॉकडाउनच्या बरोबरीने पूर्णपणे बंद झाली. जूनपासून अनलॉकचा पहिला टप्पा व त्यानंतरच्या काळात विविध टप्प्यांत अनलॉक करण्यात आले. सप्टेंबरमध्ये अनलॉक-४ सुरू झाले आहे. 

एसटी, रेल्वेही सुरू 
प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद होती, ती रेल्वेच्या माध्यमातून काही प्रमाणात जुलैत सुरू झाली. ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये आणखी काही विशेष रेल्वे वाढविण्यात आल्या. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून एसटीही सुरू झाली असून काही नियम, अटी-शर्तींवर एसटीच्या फेऱ्याही सुरू झाल्या आहेत. 

खासगी ट्रॅव्हल्स थांबलेल्याच 
खासगी ट्रॅव्हल्सची चाके मात्र अद्याप गतिमान झालेली नाहीत. एक सप्टेंबरपासून अनलॉक-४च्या टप्प्यात खासगी ट्रॅव्हल्सला अटी-शर्तींनुसार परवानगी देण्यात आली. सीटर बसला एक सीट वगळून प्रवासी बसविणे, स्लिपर गाडीला दोन सीटवर एक प्रवासी तसेच प्रत्येक फेरीनंतर वाहन निर्जंतुकीकरण करणे, प्रवाशांची प्रवासाआधी थर्मल गन, आक्सिमीटरने तपासणी करणे आदी अटी घालून दिल्या आहेत. परंतु, तरीही पूर्ण क्षमतेने खासगी बस सुरू झालेल्या नाहीत. 

अवघ्या दहा टक्केच फेऱ्या 
जळगावहून पुणे, मुंबई, अहमदाबाद, इंदूर, नागपूर, सुरत, बडोदा आदी ठिकाणी खासगी बस जातात. पुणे, मुंबईसाठी जास्त फेऱ्या आहेत. एरवी पुण्याला दररोज ७० ते ८० बस जातात. मुंबईकडे जाणाऱ्यांची रोजची संख्या २५-३० आहे. परंतु, सध्या त्या तुलनेत अवघ्या १० टक्केच फेऱ्या सुरू आहेत. पुण्याला दररोज सात- आठ बस, तर मुंबईकडे चार- पाच फेऱ्या होत आहेत. अन्य राज्यांमधून जळगावात मात्र खासगी बस मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या आहेत. इंदूर, अहमदाबाद या ठिकाणाहून त्या राज्यातील बस सुरू झाल्या आहेत. त्या परतीच्या प्रवासात स्थानिक प्रवासी घेऊन जात आहेत. 

खासगी ट्रॅव्हल्स बसला प्रवासासाठी परवानगी देण्यात आली असली, तरी अद्याप प्रवाशांचा हवा तसा प्रतिसाद नाही. प्रवासी जसे वाढतील तशा फेऱ्या वाढू शकतील. अद्याप वाहतूक करातील सवलतीचा प्रश्‍न कायम असून, त्यातून मार्ग निघाल्यावर पुणे, मुंबईसाठी सुरू असलेल्या फेऱ्या पूर्ण क्षमतेने वाढू शकतील. 
- मुकेश बेदमुथा 
अध्यक्ष, खासगी ट्रॅव्हल्स बस संचालक संघटना 

संपादन- भूषण श्रीखंडे
 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com