कपाशीचे पिक धोक्यात..शेतकरी दमदार पावसाच्या प्रतिक्षेत

Jalgaon Farmer News : कोरडवाहू कापूस ३१ हजार ४५१ हेक्टर क्षेत्रात तर २९ हजार ४२० हेक्टर क्षेत्रावर बागायती कापसाची लागवड झाली आहे.
Farmers
FarmersFarmers
Summary

यंदा पावसाळा सुरू झाल्यापासून जळगाव जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस झालेला आहे. एखादे मंडळ वगळता इतर कुठेही अद्यापपर्यंत समाधानकारक पाऊस झालेला नाही.


मेहुणबारे (ता. चाळीसगाव) ः
चाळीसगाव तालुक्यात पावसाने पाठ फिरवल्यामुळे तब्बल ६० हजार हेक्टरवरील कपाशीचे पीक (cotton crop) धोक्यात आले आहे. पाऊस (Rain) आणखीनच लांबला तर कपाशीला मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. पावसाअभावी कपाशीच्या वाढीवर विपरीत परिणाम होत असल्याने शेतकऱ्यांच्या (Farmers) नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.

Farmers
कोटींच्या निविदा प्रक्रियेत आमदारांचे ‘सिंडिकेट’

चाळीसगाव तालुक्यात ९० हजार ३१८ हेक्टर क्षेत्र पेरणीयुक्त आहे. २०२१-२२ च्या खरीप हंगामात मागील महिन्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे ९८ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यात सर्वाधिक ६० हजार ८७१ हेक्टरवर पांढऱ्या सोन्याची अर्थात कपाशीची लागवड झाली आहे. त्यात कोरडवाहू कापूस ३१ हजार ४५१ हेक्टर क्षेत्रात तर २९ हजार ४२० हेक्टर क्षेत्रावर बागायती कापसाची लागवड झाली आहे. तालुक्यातील लागवडीच्या एकूण क्षेत्रापैकी ५० टक्क्यांहून अधिक पेरा कापसाचा झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची सर्व मदार कापसावरच आहे. दोन- तीन वर्षांपासून तालुक्यात चांगला पाऊस होत असल्याने यंदा कपाशीचा पेरा वाढला आहे. त्या तुलनेत मक्याची लागवड कमी झाली आहे. ११ हजार ३९७ हेक्टर क्षेत्रावर मका लागवड झाली असून त्या खालोखाल ज्वारी ७४९ हेक्टर, बाजरी २ हजार ६५४ हेक्टरवर तसेच केळी ५७६ हेक्टर, ऊस ३ हजार २९५ हेक्टर, फळपिके ४ हजार ९६१ हेक्टर तर भाजीपाला १ हजार १२२ हेक्टरवर लागवड झालेला आहे. सध्या पावसाळा सुरू असला तरी सिंचनासारखा पाऊस तो देखील अधूनमधूनच होत असल्यामुळे जमिनीतील ओल दिवसेंदिवस कमी होत आहे. तीन- चार दिवसात पाऊस आला नाही तर या पोषक स्थितीत असलेल्या पिकांची वाढ खुंटण्याची भिती व्यक्त होत आहे. दुर्दैवाने पाऊस लांबलाच तर दुबार पेरणीचीही शक्यता नाकारता येत नाही. काही शेतांमध्ये तर पिके परिपक्व होण्याच्या स्थितीत आली आहेत. त्यामुळे एक दोन तासाचा पाऊसही या पिकांना जीवनदान देणारा ठरू शकतो.

भीज पावसावर पेरण्या
यंदा पावसाळा सुरू झाल्यापासून तालुक्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस झालेला आहे. एखादे मंडळ वगळता इतर कुठेही अद्यापपर्यंत समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे भीज पावसावरच शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत. एकीकडे कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी भागात अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे पाण्याअभावी पिके जळण्याच्या अवस्थेत आली आहेत. निसर्गाच्या या लहरीपणामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे.

Farmers
पत्नीला भाच्यासोबत बघितले आक्षेपार्ह स्थितीत, अन्...


तालुक्यात अवघा १८१ मिलिमीटर पाऊस

चाळीसगाव तालुक्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७५० मिलिमीटर आहे. पावसाळ्यातील महत्वाचे दोन महिने संपले असून आतापर्यंत तालुक्यात केवळ १८१.१ मिलिमीटर इतकाच पाऊस झाला आहे. येत्या दोन महिन्यात चांगला पाऊस झाला नाही तर उन्हाळ्यात दुष्काळाचे चटके बसण्याची शक्यता आहे. मागीलवर्षी गिरणा व मन्याड धरण १०० टक्के भरून ओसंडून वाहत होती. यंदा या दोन्ही धरणांमध्ये समाधानकारक साठा अजूनही झालेला नाही. गिरणा केवळ ३९.११ टक्के भरले असून मन्याडमध्ये २७.१९ टक्केच पाणीसाठा आहे. याशिवाय तालुक्यातील १४ लघू प्रकल्पांपैकी दोनच प्रकल्पांमध्ये बऱ्यापैकी जलसाठा आहे. येत्या दोन महिन्यात परतीच्या पावसाने हजेरी लावली तरच धरणांसह प्रकल्पांमध्ये पाणी येऊ शकते. अन्यथा पिण्याच्या पाण्याचाही प्रश्‍न गंभीर होण्याची भीती व्यक्त होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com