कापूस नोंदणी थांबल्याने शेतकरी रस्त्यावर 

कापूस नोंदणी थांबल्याने शेतकरी रस्त्यावर 

पारोळा : जिल्ह्यात सीसीआय व पणन महासंघ या दोन्ही एजन्सींकडून कापूस खरेदी केंद्रे सुरू झालेली नाहीत. तरीही येथील कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आजवर आठशेच्या वर नावनोंदणी झाल्याने शेतकरी संभ्रमात पडले असून, याबाबत जिल्हा उपनिबंधकांनी योग्य निर्णय घेऊन प्रारंभी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा विचार करावा, अशी आग्रही भूमिका शेतकरी संघटनेने घेतली आहे, तर ऑनलाइन प्रणालीनुसार नावनोंदणी प्रक्रिया झाली तर प्रारंभी सुरवातीच्या शेतकऱ्यांची नावनोंदणी बाजार समितीने करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. 

अद्याप सीसीआय किंवा पणन महासंघाकडून कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत जिल्हा प्रशासनाला कळविण्यात आले नसताना पारोळा बाजार समितीकडून ९ ऑक्टोबरपासून शेतकऱ्यांची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली. याबाबत सोमवारी (ता. १२) झालेल्या जिल्हा बैठकीत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने सूचना करीत नावनोंदणी बंद करण्याचे आदेश दिले. यामुळे १४ ला बाजार समितीकडून नावनोंदणी होत नसल्याने शेतकऱ्यांनी याबाबत नाराजी व्यक्त करीत दिशाभूल थांबविण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या वेळी शेतकऱ्यांनी परिसरात गर्दी करीत बाजार समितीच्या कामकाजाबाबत संताप व्यक्त केला. 

शेतकरीहिताचा निर्णय व्हावा : शेतकरी संघटना 
तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कापसाची नोंदणी प्रक्रिया पारदर्शीपणाने व्हावी, कोणताही गलथान कारभार न करता प्रत्येक शेतकऱ्याला आपला कापूस मोजता यावा, यासाठी बाजार समितीने नियोजन करण्याची मागणी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक डॉ. पृथ्वीराज पाटील, तालुकाध्यक्ष किशोर पाटील, दत्तू पाटील, अधिकार पाटील, भिकनराव पाटील, सुनील देवरे, नितीन देसले यांनी केली. दरम्यान, शेतकऱ्यांची दिशाभूल बाजार समितीने थांबविण्याची मागणी उंदीरखेडेचे शेतकरी उमेश पाटील यांनी केली. 

शेतकऱ्यांच्या कापूस खरेदीसाठी नोंदणी सुरू करण्यात आली. मात्र, जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार नावनोंदणी प्रक्रिया ऑनलाइन विकसित होणार असल्याने नावनोंदणी प्रक्रिया बंद करण्यात आली आहे. याबाबत मार्गदर्शक सूचना आल्यावर नोंदणी पूर्ववत सुरू करण्यात येईल. 
-रमेश चौधरी, 
सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, पारोळा 

शेतकऱ्यांची दिशाभूल थांबवावी : डॉ. पाटील 
आमदार चिमणराव पाटील यांनी मंडळ बैठकीत कापूस खरेदीबाबत अधिकाऱ्यांना रविवारी (ता. ११) मार्गदर्शक सूचना केल्या व या वर्षी कोणताही गलथान कारभार होणार नाही, याबाबत आश्वासन दिले. मात्र, एकीकडे बाजार समितीने ‘डीडीआर’ची कोणतीही परवानगी न घेता कापूस नोंदणी सुरू केली. याबाबत डीडीआर नोंदणी तत्काळ थांबविण्याचे आदेश दिल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांत संभ्रम निर्माण झाला आहे. मागील वर्षी टोकन वाटपात सावळागोंधळ झाला. कापूस नोंदणीत अनेक व्यापाऱ्यांची नावे आहेत. त्यामुळे डीडीआर यांनी संबंधित बाजार समितीची चौकशी करण्याची सूचना माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांनी केली आहे. या वेळी त्यांनी प्रत्यक्षदर्शी दूरध्वनीवरून आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी नेहमीच रस्त्यावर उतरण्याची भूमिका आपली राहणार असल्याचे ते म्हणाले. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com