Jalgaon News : जळगाव महापालिका झालीय आता ‘तरूण’; 21 मार्चला विसावे वर्षे!

Jalgaon Municipal Corporation
Jalgaon Municipal Corporationesakal

जळगाव : जळगाव महापालिका (Jalgaon Municipal Corporation) मंगळवारी (ता. २१) खऱ्या अर्थाने तरूण होत आहे. आपल्या स्थापनेचा विसावा वर्धापन दिन ती साजरा करणार आहे. याच दिवशी विशेष महासभेत महापालिकेचा विसावा अर्थसंकल्प सादर होत आहे.

विशेष म्हणजे स्थापना दिवस दणक्यात साजरा करा, असे आदेशही शासनाने अध्यादेशाद्वारे दिले आहेत. (municipal corporation celebrating 20 th Anniversary on 21 march jalgaon news)

जळगाव महापालिकेची स्थापना २१ मार्च २००३ला करण्यात आली. सायंकाळी पाचला जळगाव महापालिका झाल्याचा आदेश जळगावात धडकला. त्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. संजय मुखर्जी यांनी पहिले प्रभारी आयुक्त म्हणून पदभार स्विकारला आणि १२५ वर्षाच्या नगरपालिकेचा अस्त झाला व महापालिका या नवीन नामाभिधानासह नवीन कारभार सुरू झाला.

महापालिकेचे पहिले अधिकृत आयुक्त म्हणून द. प. मेतके यांची नियुक्ती झाली. त्यानंतर महापालिकेची पहिली सार्वत्रिक निवडणूक होवून पहिल्या महापौर होण्याचा मान आशाताई दिलीप कोल्हे यांना मिळाला.

या महापालिकेला अवघ्या वीस वर्षाच्या तरूणपणात येताना पदरी अनेक अनुभव आले आहेत. अगदी सभागृहात सदस्यांच्या वादावादीपासून तर थेट हाणामारीही महापालिकेने पाहली आहे. ‘घरकुल’प्रकरणही चांगलेच गाजले आहे. तर, याच महापालिकेच्या सभागृहात ‘विकासा’चे पाउलही पडले आहे.

याच महापालिकेने सुरेश भोळे, चंद्रकांत सोनवणे व लताताई सोनवणे हे तीन नगरसेवक आमदार दिले आहेत. महापालिकेत माजी आमदार सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखाली अधिक काळ सत्ता राहिली. सध्या महापौर जयश्री महाजन या शिवसेनेच्या, तर उपमहापौर कुलभूषण पाटील आहेत. आयुक्तपदी डॉ. विद्या गायकवाड या प्रथम महिला आयुक्त आहेत.

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

विसावा वर्धापन दिन साजरा करा

महापालिकेने आपला विसावा वर्धापण दिन जोशात साजरा करावा असे आदेश राज्य शासनाचे आहेत. २०२२ मध्ये शासनाने आदेश काढून राज्यातील प्रत्येक महापालिकेला आपले वर्धापन दिन जोशात साजरे करावे, असे कळविले.

याच अध्यादेशानुसार जळगाव महापालिकेचा विसावा वर्धापन दिन जोरदारपणे साजरा करण्यासाठी महापालिका आयुक्त व महापौर, तसेच पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. वर्धापन दिनानिमित्त जनतेसाठी विविध स्पर्धा, तसेच काही कार्यक्रम घेण्याबाबतही शासनाने सुचविले आहे.

महापालिकेकडून जनतेच्या अपेक्षा

महापालिकेच्या तरूणपणात पदार्पणावेळी आता जनतेकडून काही अपेक्षाही आहेत. महापालिका झाल्यानंतर अपेक्षित विकास झालेला नाही. नवीन असल्यामुळे त्यात त्रुटी राहू शकतात. मात्र, आता या महापालिकेच्या माध्यमातून शहराचा विकास व्हावा, रस्ते, गटारी, तसेच दिवाबत्त्तीच्या चांगल्या सुविधा मिळाव्यात एवढ्याच माफक अपेक्षा जनतेच्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com