Shrikrishna-Harane
Shrikrishna-Harane

नोकरी गमावली; पण रेशीम शेतीतून पत कमावली

सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या संग्रामपूर तालुक्‍यातील चांगेफळ बुद्रुक ( जि. बुलडाणा) येथील श्रीकृष्ण हरणे या उच्चशिक्षित तरुणाला नोकरी गमवावी लागली. मात्र हिंमत न हारता गेल्य पाच वर्षांपासून उत्कृष्ठ व्यवस्थापनातून रेशीम शेती तो यशस्वी करतो आहे. नोकरीची संधी पुन्हा चालून आली तरी शेतीत करणार असल्याचा ठाम विश्वास त्याने प्रकट केला आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील चांगेफळ बुद्रुक (ता. संग्रामपूर) येथील श्रीकृष्ण हरणे हा कायम धडपड करणारा युवा शेतकरी आहे. बीए डीएड पर्यंत त्यांचे शिक्षण झाले आहे. सध्या ते एमएचे शिक्षण घेत आहेत. मध्यतंरीची काही वर्षे बुलडाणा जिल्हा परिषदेंतर्गत अंशकालीन शिक्षक म्हणून ते नोकरीस होते. मात्र न्यायालयातून स्थगनादेश (स्टे) आल्याने इतरांप्रमाणेच श्रीकृष्ण यांची नोकरी धोक्यात आली. नोकरी गेल्याने ते नाऊमेद झाले. पण, खचून चालण्यासारखे नव्हते. 

रेशीम शेतीतून मिळवली उमेद 
नोकरी गमावली तरी हिंमत न गमावलेल्या श्रीकृष्ण यांनी सन २०१२-१३ मध्ये रेशीम शेतीत पाऊल टाकण्याचे धाडस केले. या परिसरात त्या वेळी रेशीम शेतीचा फारसा बोलबाला नव्हता. श्रीकृष्ण यांनी रेशीम कार्यालयाशी संपर्क केला. तेथील अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करण्याबरोबरच विविध योजनांची माहिती देत प्रोत्साहित केले. पाठबळही दिले. श्रीकृष्ण यांची पाच एकर शेती आहे. संपूर्ण शेतीत बागायती पिके घेण्याची व्यवस्था आहे. यापैकी एक एकरात तुतीची लागवड केली. 

रेशीम शेतीची सुरवात 
रेशीम शेतीचा सविस्तर अभ्यास केला. माहिती संकलित केली. पहिल्या वर्षी शेडची उभारणी करणे शक्य झाले नाही. मग निंबाच्या झाडाखाली हिरवे नेट लावून प्रयोगास सुरवात केली. पहिला हंगाम जेमतेम राहिला. व्यवसायात अनुदान मिळत गेले तसतसा हुरूप वाढला. नेटाने प्रयत्न सुरू ठेवले. पारंपरिक पिकांपेक्षा ही शेती फायदेशीर वाटू लागली. मग आणखी दीड एकरात तुतीची लागवड केली.  

पाणीटंचाईची झळ
बारमाही सिंचनासाठी ओळख असलेल्या संग्रामपूर तालुक्‍यात मागील तीन वर्षांत सातत्याने पाऊस कमी पडत आहे. यामुळे जमिनीतील पाण्याची पातळीही खालावली आहे. अनेकांच्या विहिरी कोरड्या पडल्या आहेत. हरणे यांची विहीरही पूर्वी बारा महिने पाणी द्यायची. आता मात्र सहाच महिने सिंचन करता येईल इतके पाणी त्यांच्याजवळ आहे. त्यामुळे संपूर्ण लक्ष आता रेशीम शेती व फळशेतीवर केंद्रित केले आहे. दीड एकरात तीन वर्षांपूर्वी लिंबूची बाग घेतली आहे. पाच एकरांपैकी चार एकर क्षेत्र आता रेशीम व 
लिंबू पिकाखाली आले आहे. उर्वरित क्षेत्रात भाजीपाला पिके घेतली जातात. त्यामुळे कमी पाण्यात पिकांचे व्यवस्थापन करणे शक्य झाले 
आहे. 

मार्केट
अकोला येथे खासगी व्यापाऱ्याला कोषांचा पुरवठा होतो. मात्र रामनगर (कर्नाटक) येथे अलीकडे दोनवेळा सामूहिक विक्री सुरू केली आहे. त्यामुळे स्थानिक व परराज्य या तुलनेत एकूण नफ्यात १० हजार रुपयांपर्यंत फरक पडू शकतो असे श्रीकृष्ण म्हणाले. मागील वर्षी मार्चच्या दरम्यान किलोला ४७० रुपये दर मिळाला. यंदा तो ३३० रुपये 
मिळाला. 

आंतरपिकांतून खर्च केला कमी 
तुतीची सहा बाय दोन व चार बाय दोन फूट अशी दोन प्रकारांत लागवड आहे. यात मेथी, कोथिंबीर, पालक यांसारखी आंतरपिके घेतली जातात. त्यांच्या विक्रीतून रेशीम शेतीतील बराच खर्च निघून जातो. वर्षाला ही शेती दोन ते अडीच लाख रुपयांचे उत्पन्न देत असल्याचे श्रीकृष्ण यांनी सांगितले.

अडचणींवर केली मात 
सुरवातीला उत्पादन कमी मिळत होते. दरांचीही समस्या होती. अळ्यांना रोगाचा प्रादुर्भाव व्हायचा. अडचणींना तोंड देताना काहीवेळा नकारात्मक विचारही मनात यायचे. पण हार मानली नाही. या व्यवसायातील कौशल्य मिळवण्यासाठी २०१४-१५ मध्ये म्हैसूर येथे सात दिवसांचे प्रशिक्षणही घेतले. ठिकठिकाणचे रेशीम उत्पादक जुळत गेले. मग कुठलीही अडचण आली की त्यावर उत्तर शोधणे सोपे बनत गेले.

घरातील सर्वजण राबतात शेतीत 
श्रीकृष्ण, आई-वडील व बहीण असे चार जणांचे कुटुंब आहे. सर्वजण शेतीत राबतात. साहजिकच मजुरीवरील खर्च कमी झाला आहे. आता पुन्हा नोकरीची संधी आली तरी शेतीच करणार असल्याचे श्रीकृष्ण यांनी सांगितले.

सध्याचा रेशीम व्यवसाय दृष्टिक्षेपात 
 तुतीचे क्षेत्र- एक हेक्टर
 रेशीम कीटक प्रकार- बायव्होल्टाईन- याला जास्त दर असल्याचे श्रीकृष्ण सांगतात.
 वर्षभरात सुमारे पाच ते सहा बॅचेस घेण्याचे नियोजन- पाऊस व पाण्याच्या उपलब्धतेनुसार त्या कमीही होतात.
 उत्पादकता- प्रतिशंभर अंडीपुंज- ६० ते ८० किलो कोष उत्पादन
 प्रत्येक बॅच सुमारे २०० अंडीपुंजांची
 रेशीम कीटक संगोपन शेड- ४० बाय २२ फूट
 अनुदान- ठिबक, लागवड, साहित्य असे एकूण किमान दोन ते अडीच लाख रुपये मिळाले. 

सोशल मीडियाने आणले एकत्र 
रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची बुलडाणा भागात संख्या खूप कमी आहे. लागवडक्षेत्र कमी असल्याने मार्केटसह अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यावर ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून उत्तर शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. रेशीम उत्पादक शेतकऱ्यांचा ‘व्हाॅटसअप’ ग्रुप तयार झाला अाहे. यात रेशीम विभागाचे उपसंचालक, जिल्हा, तालुका अधिकारी व रेशीम उत्पादक शेतकरी सहभागी आहेत. कोणतीही समस्या, शंका असली तर या ग्रुपवर ‘शेअर’ केली जाते. अधिकारी किंवा एखादा जाणकार शेतकरी त्याचे उत्तर देतो. यामुळे माहितीचे आदानप्रदान होते. ‘ग्रुप’मधील शेतकरी एकाचवेळी अंडीपुंजाची मागणी करतात. एकाचवेळी बॅच घेण्याचे नियोजन केल्याने त्याचा फायदा सामूहिक मार्केट मिळवण्यासाठी होतो. कर्नाटकातील रामनगर येथे कोषांना चांगले दर मिळतात. मात्र तेथे एकट्याने माल घेऊन जाणे परवडत नाही. त्यामुळे सर्वांनी माल एकत्र नेल्यास फायदा होतो. व्हॉटसअप ग्रुपचा असाही फायदा झाल्याचे श्रीकृष्ण यांनी सांगितले.

कृषी खात्याने घेतली दखल
श्रीकृष्ण यांना या वर्षी जिल्हा परिषदेच्या वतीने कृषिदिनी राष्ट्रमाता जिजाऊ सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी बुलडाणा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, संग्रामपूर तालुका कृषी अधिकारी, रेशीम अधिकारी यांनाही भेट देऊन श्रीकृष्ण यांना प्रोत्साहित केले.

- श्रीकृष्ण हरणे, ९७६३१९७१८१

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com