दीड एकर खजूर शेतीतून १५ लाखांचे उत्पन्न

दीड एकर खजूर शेतीतून १५ लाखांचे उत्पन्न

नागपूर - उष्ण वातावरणात आणि प्रामुख्याने वाळवंटी भागात घेतले जाणारे खजुराचे पीक विदर्भात घेऊन दीड एकर क्षेत्रात तब्बल १५ लाखांपर्यंतचे उत्पन्न घेण्याची किमया मोहगाव-झिल्पी येथील एका शेतकऱ्याने साधली. खजुराची यशस्वी शेती करून विदर्भातील अनुकूल हवामानात येणाऱ्या एका पिकाचा पर्याय त्यांनी दिला. 

विदर्भातील उष्ण वातावरणामुळे पिकांच्या उत्पादनावर परिणाम होत असल्याची ओरड होते. पण, याच हवामानाला वरदान मानत त्याचा पुरेपूर फायदा घे त खजुराची लागवड करून त्यातून भरघोस उत्पन्न घेऊन सर्वांनाच विचार करण्यास

भाग पाडले. नागपूरपासून १५ किमी अंतरावरील मोहगाव झिल्पी गाव सध्या खजुराच्या शेतीमुळे एकप्रकारे पर्यटनाचे केंद्र ठरले आहे. सेवी तंगवेल असे त्या प्रयोगशील शेतकऱ्याचे नाव आहे. विदर्भात खजुराचे पीक घेतले जाऊ शकते, अशी कल्पनाच कुणी करणार नाही. काही प्रगतिशील शेतकरीसुद्धा सुरुवातीला यावर विश्‍वास ठेवायला तयार नव्हते. मात्र, तंगवेल यांनी केवळ खजुराची लागवड करून नव्हे, तर त्यातून तब्बल १५ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न घेऊन यावर विश्‍वास ठेवण्यास भाग पाडले. तंगवेल यांची मोहगाव झिल्पी येथे ८ एकर पडीक जमीन होती. या शेतीत त्यांनी खजूर लागवड करण्याचा निर्णय आठ वर्षांपूर्वी घेतला. तमिळनाडू येथे जाऊन खजुराच्या शेतीचा अभ्यास केला. त्यानंतर तेथून खजुराची रोपे मागवून त्याची दीड एकरवर लागवड केली. खजुराला पाणी कमी लागत असल्याने आणि उष्ण वातावरणात हे पीक चांगले येत असल्याने सातव्या वर्षीपासूनच उत्पादन निघण्यास सुरुवात झाली. संपूर्ण दीड एकर शेतीला ठिबक सिंचनाची सोय केली. त्यामुळे उत्पादनात दुप्पट वाढ झाल्याचे तंगवेल सांगतात. 

एका झाडापासून तीनशे किलोपर्यंत उत्पादन
खजुराच्या एका झाडापासून तीनशे किलोपर्यंत उत्पादन येते. सुरुवातीला शंभर ते दीडशे किलो आणि त्यानंतर यात सातत्याने वाढ होते. स्थानिक बाजारपेठेत ओले खजूर दोनशे ते तीनशे रुपये किलो दराने विकले जातात. या पिकासाठी पाणी कमी व मजुरांचा खर्चदेखील कमी आहे. केवळ शेणखत आणि ठिबकचा वापर करून उत्पादन घेता येते. 

आंतरपीक घेणे शक्‍य
खजुराच्या झाडांची २५ बाय २५ या अंतरावर लागवड केली जाते. त्यामुळे मध्ये फार जाग शिल्लक असते. त्या जागेत आंतरपीक घेणे शक्‍य आहे. त्यामुळे लागवड खर्चात बचत करण्यास मदत होते.

विदर्भातील उष्ण वातावरण शेतकऱ्यांना मिळालेले वरदानच आहे. शेतकऱ्यांनी प्रयोगशील होऊन या वातावरणाचा फायदा घेतल्यास चांगले उत्पादन घेण्यास मदत होईल.
- सेवी तंगवेल, खजूर उत्पादक शेतकरी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com