अवयवदानामुळेच कोमलला पुनर्जन्म!

अवयवदानामुळेच कोमलला पुनर्जन्म!

सातारा - कहाणी एका जीवन-मरणाच्या संघर्षाची...मृत्यू समोर असताना एकेका श्‍वासासाठीच्या धडपडीची... दुर्दम्य इच्छाशक्तीची आणि जवळ आलेल्या मृत्यूला दूर सारत जगण्यासाठी झुंज देणारी ती सावित्री आणि तिला पुनर्जन्म देणाऱ्या सत्यवानाची!

साताऱ्यातील कोमल आणि धीरज गोडसे या दांपत्याच्या संघर्षातून माणसाच्या जगण्याच्या इच्छाशक्तीची झुंज स्पष्ट झाली. ह्रदय आणि फुफ्फुसाचे प्रत्यारोपण झाल्यानंतर कोमल गेल्या सहा महिन्यांतच पूर्ववत जगण्याचा आनंद घेऊ लागली आहे. आता ती फक्त जमिनीवर चालतच नाही, तर तिने पॅराशूट रायडिंगही केले. २०१९ मध्ये होणाऱ्या अवयव प्रत्यारोपण ऑलिंपिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याची इच्छा ती व्यक्त करीत आहे. त्याशिवाय ‘मिसेस इंडिया’स्पर्धेतही तिचे स्थान महत्त्वाचे ठरण्याची शक्‍यता आहे. केवळ अवयवदानामुळे पुनर्जन्म लाभल्याची जाणीव तिच्या मनात आहे, म्हणूनच पुन्हा अशी वेळ कुणावर येऊ नये व आली तर मदत व्हावी, या हेतूने साताऱ्यात ती गुरुवारी (ता. २८) कोमल न्यू लाइफ फाउंडेशनची स्थापना करीत आहे.     

गोडसे दांपत्याच्या आयुष्यात आनंदाचे क्षण फुलू लागले होते. दोघेही इंजिनिअर प्राध्यापक. पुढे शिक्षणाची आस आणि प्रगतीचा ध्यासही. या आनंदाच्या क्षणांना नियतीची नजर लागली. अचानक संकटांची मालिका उभी समोर ठाकली. कोमलचे श्‍वास अडखळू लागले. उभे राहणेही अशक्‍य, चालणेही कठीण झाले. दवाखान्याच्या चकरा सुरू झाल्या आणि आयुष्याची दोरी कमकुवत झाल्याचा दावा ठिकठिकाणांच्या रुग्णालयातून सांगितला जाऊ लागला. कोमलच्या जगण्याविषयी साशंकताच नाही तर मरण दारी आल्याची सातत्याने चाहूल खुणावू लागली. अनेक डॉक्‍टरांचे सल्ले; पण उत्तर एकच या आजारावर इलाज नाही. धीरजने मात्र धीर सोडला नाही. अखेर एके दिवशी धीरजने कोमलला चैन्नईच्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये नेले.

तिच्या जगण्याच्या थोड्या आशा पल्लवित झाल्या. त्यावेळी निकामी हृदय आणि फुफ्फुस घेऊन तिची जीवघेणी तडफड सुरू होती, ती एकेक श्‍वासासाठी अन्‌ जगण्यासाठी ! कोणाकडून तरी हृदय आणि फुफ्फुस मिळण्याची आशा उरली होती. लढण्यासाठी आर्थिक मदतीची गरज होती. त्याने समाजाला मदतीसाठी आवाहन केले. समाजाकडून अर्थरूपी मदतीचा ओघ सुरू झाला.

आता वैद्यकीय क्षमतेची आणि चेन्नईच्या ग्लोबल हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या टीमची कसोटी होती. या हॉस्पिटलमध्ये फुफ्फुसाची तपासणी करताना हृदयही निकामी होत चालल्याचे लक्षात आले. दोन अवयवांशिवाय जगविण्यासाठी ना तिने हार मानली, ना त्याने जिद्द सोडली. डॉ. संदीप अत्तावर यांच्या टीमनेही अथक परिश्रम घेतले. सुदृढ अवयवांची भूक अन्‌ तिच्या मूक वेदना आणि त्याची तिला जगविण्याच्या इच्छाशक्तीची अंतिम लढाई सुरू झाली. अखेरच्या १४ दिवसांत तिची जगणे आणि मरणे यातील एका श्‍वासाच्या अंतराची झुंज सुरू होती. अपघातातील तरुणाच्या अवयवदानाला दात्याच्या आई-वडिलांची मान्यता मिळाली. डॉक्‍टरांचे कौशल्य पणाला लागले. व्हेन्टिलेटरच्या आधाराने श्‍वास फुलवत अवयवांच्या प्रत्यारोपणासाठी अखेर २८ जानेवारी २०१७ रोजी शस्त्रक्रिया पार पडली. जगात पहिले हृदयासह फुफ्फुसाचे प्रत्यारोपण यशस्वी झाले. शांत ग्लानीत पहुडलेल्या तिचे डोळे उघडले. डॉक्‍टरांच्या टीमच्या चेहऱ्यावर हास्य पसरले. श्‍वासाला नियमित करण्यासाठी तिने आसमंत भरला एका श्‍वासात आणि आधुनिक युगाने पुनर्जन्म अनुभवला. मृत्यूच्या दारातून तिला परत आणण्याचे नियतीलाही दान द्यावे लागले.

अवयवदात्याच्या भावनेला परिमाण लाभले. तिचे न्‌ त्याचे सुंदर जगणे पुन्हा सुरू झाले. सत्यवानाच्या प्राणांसाठी सावित्रीने दिली होती झुंज. इथे सत्यवानाने सावित्रीच्या प्राणांत परत आणला जीव. अवयवदानाने ही किमया साध्य झाली. शरीरातील एकेका अवयवांचे कार्य वेगळे जगण्याचा आनंद देणारे असते. अवयवाचे महत्त्व आगळे असते, स्वतःसाठी आणि दुसऱ्यासाठीही! हेच या घटनेने सिद्ध केले.  आता हे दांपत्य आपल्या फाउंडेशनमार्फत अवयवदानाचे महत्त्व पटविण्यासाठी जागृती करीत अशा गरजू रुग्णांना मदत करण्याची भूमिका घेत नवी इनिंग सुरू करणार आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com