रत्नागिरीकरांची तब्बल २८ कोटींची फसवणूक ; तीन संशयितांना अटक

28 crore rupees fraud in company cheated by people in ratnagiri
28 crore rupees fraud in company cheated by people in ratnagiri

रत्नागिरी : अथर्व फॉर यू इन्फ्रा ॲण्ड ॲग्रो प्रायव्हेट लि. या कंपनीकडून गुंतवणूकदारांना सुमारे ९०० कोटींचा गंडा घातल्याचे पुढे आले आहे. या प्रकरणी रत्नागिरी तालुक्‍यातून तक्रार अर्ज दाखल झाले. जिल्ह्यात यात सुमारे २८ कोटींची गुंतवणूक असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला. यात जमीन, फ्लॅट आदींचा समावेश आहे. मात्र, एकत्रित गुन्हा मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडे दाखल असल्याने तिकडेच तक्रार दाखल करण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.

जिल्ह्यात या कंपनीची रत्नागिरी, चिपळूण, दापोली आदी ठिकाणी कार्यालये होती. ती काही महिने बंद असल्याने गुंतवणूकदार हवालदिल झाले. गेली दोन वर्षे कंपनीचे रत्नागिरीतील कार्यालय बंद आहे. या प्रकरणी केळ्येमधून एक तक्रार अर्ज ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल झाला. हळूहळू तक्रारी येण्यास सुरवात झाली आहे. मात्र, राज्यभरातील एकत्रित गुन्हा मुंबई आर्थिक शाखेकडे दाखल करण्यात आला. त्यामुळे तक्रारदारांनी तिकडे तक्रार दाखल करण्याच्या सूचना वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

पोलिसांनी केलेल्या चौकशीत जिल्ह्यात सुमारे २८ कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याचे कंपनीच्या एजंटकडून सांगण्यात आले. मात्र, किती गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे, ते समजू शकले नाही. पाच वर्षांपूर्वी जिल्ह्यात ठिकठिकाणी कंपनीने आपल्या शाखा सुरू केल्या. कंपनीकडून गुंतवणूकदारांना दुप्पट व तिप्पट रकमेच्या परताव्याचे आमिष दाखविण्यात आले होते.

अथर्व कंपनीकडून एजंट नेमून गुंतवणूकदारांना प्रलोभने दाखविण्यात आली. गुंतवणूकदारांचा परतावा देणे अशक्‍य होऊ लागताच कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातून पोबारा केला होता. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गुंतवणूकदारांनी पोलिसांत तक्रार दाखल करण्यास सुरवात झाली. त्यानुसार मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला आहे.

तीन संशयितांना अटक

२२ ऑक्‍टोबरला दहिसर परिसरातून या कंपनीचे अधिकारी सूरदास पाटील (वय ४८), सुखदेव म्हात्रे (४१) व सुभाष नाईक (४०) या संशयितांना अटक करण्यात आली. कंपनीचे संचालक शिवाजी नेफाडे, गणेश हजारे, सचिन गोसावी, मुकेश सुदेश यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली होती. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी कंपनी कृषी, शैक्षणिक, आरोग्य, शेळीपालन, आयुर्वेदिक प्रसाधने, औषधे आदी प्रकारांमध्ये गुंतवणूक करीत असल्याचे सांगत होती. 

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com