लोकशाहीचा चाैथा स्तंभ भाजपकडून टार्गेट - अजित पवार

लोकशाहीचा चाैथा स्तंभ भाजपकडून टार्गेट - अजित पवार

खेड - पीक विमा योजनेतील घोटाळा हा राफेलपेक्षाही मोठा घोटाळा आहे. अशी बातमी ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी दिली होती. गेल्या काही दिवसांपूर्वींच ही बातमी प्रसिद्धी झाली. परंतु ती वृत्तपत्रांनी उचलून धरली नाही. कारण बातमी न देण्याचा वृत्तपत्रसमुहांचा उद्देश नव्हता. तर मोदी सरकारच्या विरोधात जर आवाज उठवला तर तुमचे वृत्तपत्र, टिव्ही चॅनल बंद करू, अशी धमकी दिली जाते. त्यामुळे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभालाच यांनी टार्गेट केले आहे. असा आरोप राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.

श्री. पवार आज खेड येथे झालेल्या निर्धार परिवर्तनाचा या राष्ट्रवादीच्या परिवर्तन मेळाव्यामध्ये बोलत होते.

श्री. पवार म्हणाले की, गृहखात्यावर खुप मोठा दबाव आहे. यापुर्वी दिवंगत आर आर आबा पाटील, जयंत पाटील यांच्याकडे हे खाते होते. त्यावेळी त्यांच्याकडून असा दबाव कुठेही टाकला गेला नाही. परंतु मुख्यमंत्र्यांनी आपल्या मर्जीप्रमाणे कारभार सुरू केला आहे. असा आरोप करत येणाऱ्या निवडणूकीत ह्या सेना - भाजप युतीच्या सरकारला घरचा रस्ता दाखवा  असे आवाहन श्री. पवार यांनी केले.

सोलापूर येथे पंतप्रधान मोदी याच्या सभेवेळी  राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न केला. त्यांना झेंडे दाखवू नका, नाहीतर कारवाई करावी लागेल असा सज्जड दम देण्यात आला. अरे ही लोकशाही आहे. सर्वांना आपले मत मांडण्याचा अधिकार आहे आणि तुम्ही कुणाकूणाची तोंडे बंद करणार आहात.

-  अजित पवार

शिवसेनेला या कोकणाने खूप काही दिले. परंतु शिवसेनेने कोकणी जनतेला काय दिले ? असा सवाल करीत सहा वेळा निवडून दिलेल्या केंद्रीय मंत्री अनंत गीतेंवर श्री..पवार यांनी शरसंधान साधले. खासदार गीते यांच्याकडे असलेले अवजड उद्योग खाते हे यापूर्वी आमच्या प्रफुल्ल पटेल यांच्याकडे होते. त्यांनी त्यांच्या मतदार संघात सीएसआरच्या माध्यमातून कोट्यावधीचा निधी आणला. त्यांनी त्या पदाचे सोने केले. परंतु सहावेळा खासदार म्हणून निवडून आलेल्या गीते यांनी काय केले ? याचा विचार करा. हवा बदलत आहे. हे पाच राज्याच्या निवडणूकांनी दाखवून दिले आहे.

विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे म्हणाले, देशाच्या 125 कोटी जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखवून पंतप्रधान मोदींनी सर्वांना बनवले आहे. महागाई, बेरोजगारी, आर्थिक तसेच सर्वांच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करतो असे सांगून या सरकारने सांगितले होते. यातील एकही आश्‍वासन त्यांनी पाळले नाही. 2019 ला लोकसभेच्या निवडणूका आहेत. नाहीतर पेट्रोलने 100 री गाठली असती. त्यामुळे यांना आत्ता याची जागा दाखविण्याची वेळ आली आहे. येणाऱ्या निवडणूकीत आपण सर्वचजण परिवर्तन घडविणार आहोत.

या सभेला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, माजी मंत्री श्रीमती फौजिया खान, प्रवक्ते  नवाब मलिक, सुनिल तटकरे, आमदार भास्कर जाधव, आमदार प्रकाश गजभिये, आमदार संजय कदम, आमदार श्रीमती विद्या चव्हाण, राज्य अध्यक्ष चित्रा वाघ आदी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com