रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील काजळी नदीच्या तीरावर वसलेल्या हरचेरी गावातील शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे. नदीला पूर आल्यामुळे पाणी भातशेतीत घुसले. तब्बल पाच फूट पाणी शेतामध्ये होते. पूर ओसरला पण सर्व भात आडवे झाले. मळ्यात पाणी साठून राहिल्याने सर्वच भात कुजले. कापलेल्या भाताची उडवी वाहून गेली. काही भातालाही कोंब आलेत. त्यातून भाताची रोपे बाहेर आली आहेत.
परतीच्या पावसामुळे कोकणासह रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकरी पूर्णत: कोलमडून गेला आहे. कुठे कापण्यासाठी तयार तर कुठे कापून मळ्यात सुखण्यासाठी ठेवलेले भात अचानक आलेल्या पावसाने कुजून गेले. एक महिना उशिराने भातकापणी सुरू झाली. यंदा चांगले पीक आले होते. वर्षभर धान्य पुरेल या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांनी परतीच्या पावसाने चांगलीच निराशा केली आहे. पंधरा दिवसात भात कापणी, झोडणी पूर्ण करून 'इरले' भरून भात ठेवू, अशी स्वप्न पाहणाऱ्या बळीराजाची स्वप्न धुळीला मिळाली आहेत.
काजळी नदीकिनारी भागातील हरचिरी, चांदेराई, तोणदे, सोमेश्वर, पोमेंडी, टिके या गावात पुराच्या पाण्याने थैमान घातले होते. पूर ओसरल्यानंतरही पाऊस थांबून थांबून पडत असल्यामुळे भात कापायची अडचण अजूनही आवासून आहे. अनेक शेतकरी अल्प भूधारक असल्यामुळे दुसऱ्याची जमीन घेऊन कसतात. या पावसामध्ये त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यांना भरपाई देण्याचा प्रश्नच येत नाही. सातबाऱ्यावर नाव नसल्यामुळे भरपाईची रक्कम शेतमालकाला जाणार. त्यामुळे पंचनाम्यांकडे असे शेतकरी पाठच वळवत आहेत.
"चार महिन्यात पिकणाऱ्या भातावर आम्ही वर्ष जगतो. घास तोंडाजवळ आला होता. दोन दिवसाच्या पावसाने तो हिरावून नेला. शासनाला मदत करायची असेल तर ती गुंठ्यातील शेतीसाठी करावी."
- संतोष भुर्के, शेतकरी
संपादन - स्नेहल कदम
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.