गोवा महाराष्ट्रात विलीन करण्याचा प्रयत्न झाला होता, पण...

An Attempt  Made To Merge Goa Into Maharashtra Konkan News
An Attempt Made To Merge Goa Into Maharashtra Konkan News

पणजी/दोडामार्ग - आजचा गोवा १९६१ नंतर महाराष्ट्रात विलीन करण्याचा प्रयत्न झाला होता. एवढ्यापुरते गोव्याचे महाराष्ट्राशी असलेले नाते मर्यादित नाही. त्याला मोठी पार्श्‍वभूमी आहे. गोव्यातील (कै.) राजाराम पैंगीणकर यांनी देवदासी प्रथेवर हातोडे मारून तिचा चक्काचूर केला होता, त्याचे प्रतिबिंब मुंबईत भरलेल्या तिसऱ्या गोमंतक मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष काकासाहेब कालेलकर यांच्या भाषणात १९४५ मध्ये पडले होते. असे हे गोव्याचे नाते असले तरी ते दुरावण्यासाठी गोव्यातील भाषावाद हे महत्त्वाचे कारण ठरले आहे.

गोवा स्वतंत्र ठेवावा की महाराष्ट्रात विलीन करावा यासाठीचे सार्वमत १९६७ मध्ये घेतले गेले. त्यावेळी विलीनीकरणविरोधकांनी महाराष्ट्राविरोधी गरळ ओकणे साहजिक होते. त्याला आता ५२ वर्षे होत आली, विलीनीकरणाचा कोणी समर्थक राहिलेला नाहीतरी १९६७ च्याच शब्दांनी महाराष्ट्राचा उद्धार होतो. गोव्यात मराठीवाद्यांना डोके वर काढू दिले तर आपल्याला धोका आहे, असे नव्या पिढीच्या मनावर बिंबवत मराठीचा द्वेष पसरवत गेले. यातून कोकणी मराठी संघर्ष गोव्यात उभा राहिला.

भाषावादाचा परिणाम

१९८७ मध्ये राजभाषा कायदा झाला कोकणी राजभाषा झाली आणि मराठीला सहभाषेचा दर्जा मिळाला. या साऱ्या भाषावादाचा गोवा महाराष्ट्र, कर्नाटकात किंवा कर्नाटक व महाराष्ट्रातील काही भाग गोव्याला जोडण्याशी काय संबंध, असा प्रश्‍न पडू शकतो.
गोव्यातील मराठीप्रेमींना अल्पसंख्याक ठरवण्याठी कोकणी बोली असलेला आणि भौगोलिक सलगता असलेला प्रदेश एकत्र आणण्याचे प्रयत्नही मध्यंतरी झाले. १८९१ च्या जनगणेनुसार दक्षिण कोकणातील कोकणी बोलणाऱ्यांची संख्या १५ लाख ६५ हजार होती. दर दहा वर्षांनी दहा टक्के वाढ धरली तर ५० वर्षांनी म्हणजे १९४१ त हा आकडा २५ लाखांवर पोचला पाहिजे. खऱ्या कोकणीच्या उत्तरेला बाणकोटी, संगमेश्वरी कोकणी असून, १८९१ त तो आकडा १३ लाख १४ हजार होता. पन्नास वर्षांत तो आकडा २१  लाखांवर पोचला असेल. बाणकोटच्या उत्तरेला दमणगंगेपर्यंत १८८१त उत्तर कोकणीचा आकडा १० लाख १६ हजार होता. तो गेल्या ५० वर्षात १६ लाख असायला हवा. म्हणजे दमणगंगेहून सगळ्या कोकणातील कोकणी बोलणाऱ्यांची संख्या ६२ लाख असायला हवी. या सर्वांना एकत्र आणण्याचे स्वप्न पाहिले गेले.

...यातूनच पुढे आला मराठीविषयीचा द्वेष

कोकणी राज्य अस्तित्वात आणण्याचे ते प्रयत्न होते; मात्र कर्नाटक आणि महाराष्ट्रातील प्रादेशिक अस्तिमा प्रखर असल्याने ते प्रयत्न यशस्वी होऊ शकले नाहीत. पोर्तुगीजांनी गोमंतकाचे फिरंगाण केले. तेव्हापासून भाषा, संस्कृती, परंपरा आणि इतिहास यांचा मुळचा धागा तोडण्याचे सारखे प्रयत्न सुरु झाले. गोमंतकचा गोवा झाला. गोमंतकाची मातृभाषा मराठी नसून स्वतंत्र कोकणी अशी या मिशनरी विचारसरणीतून ही बिजे रोवली गेली. त्यातून पुढे मराठीविषयीचा द्वेष आणि महाराष्ट्राविषयींचा अनादर व्यक्त होणे सुरू झाले आहे.

नाते तोडता येणारे नाही!
कोकणी राज्य ही आजची संकल्पना नव्हे. १९४२ मध्ये मुंबईत तिसरी कोकणी परिषद भरली होती त्यात कोकणी भाषेचे कोकण राष्ट्र ही संकल्पना मांडण्यात आली होती. त्याचा पाठपुरावा झाला; पण महाराष्ट्रातील भाग गोव्यात आला तर मराठीवाद्यांची बाजू बळकट होईल हे लक्षात आल्याने महाराष्ट्रद्वेष रुजवण्यात आला. त्यामुळे विलीनीकरणाचे कितीही प्रयत्न झाले तरी त्यातून फारसे काही निष्पन्न होईल, असे नाही. असे असले तरी गोव्याचे महाराष्ट्राशी असलेले नाते तोडता येणारे नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com