ग्रामपंचायत निवडणुकीत कॉंग्रेस संपली ः अंधारी

balu andhari press conference malvan konkan sindhudurg
balu andhari press conference malvan konkan sindhudurg

मालवण (सिंधुदुर्ग) - कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळा गावडे हे निष्क्रिय आहेत. त्यामुळेच ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यात असलेली कॉंग्रेस संपली, अशी टीका कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस महेश ऊर्फ बाळू अंधारी यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.

तालुक्‍यातील चिंदर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत कॉंग्रेसच्या उमेदवाराला शिवसेनेने तिकिट नाकारल्याने त्या उमेदवाराने भाजप पुरस्कृत पॅनलकडून निवडणूक लढवीत विजय मिळविला. यामुळे चिंदर शिवसेनेच्या ताब्यातून गेल्याचेही त्यांनी सांगितले. 
मोरेश्‍वर कॉम्प्लेक्‍स येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी श्रीकृष्ण तळवडेकर, चंदन पांगे, प्रभाकर हेदूळकर, अरविंद मोंडकर, पल्लवी तारी, योगेश्वर कुर्ले, सरदार ताजर, दिलीप तळगावकर, श्रीहरी खवणेकर आदी उपस्थित होते. 

अंधारी म्हणाले, ""बाळा गावडे हे जिल्हाध्यक्ष होऊन वर्षभराचा कालावधी उलटून गेला; मात्र या कालावधीत त्यांच्या हातून एकही विकासकामाचे उद्‌घाटन झाले नाही. सत्तेत असूनही ते कॉंग्रेसच्या एकाही मंत्र्याला जिल्ह्यात आणू शकले नाहीत. जिल्हाध्यक्ष होण्यापूर्वी त्यांनी पक्ष संघटना वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले होते. प्रत्यक्षात त्यांच्याकडून काही प्रयत्न न झाल्याने कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास झाला. ते जिल्हाध्यक्ष व्हावेत यासाठी आम्हीच प्रयत्न केले; मात्र आता पश्‍चाताप होत आहे.'' 

जिल्ह्यात कॉंग्रेसची वाताहत झाली असून ती कशी भरून निघेल यासाठी जिल्हाध्यक्षांकडून प्रयत्न होणे अपेक्षित होते. मात्र त्यांनी केवळ सावंतवाडी, कणकवली, देवगड या तीन तालुक्‍याची कमिटी नियुक्त केली. जिल्ह्यात ते केवळ चार निष्क्रिय माणसांना घेऊन फिरत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी महाविकास आघाडीतील पक्षांच्या जिल्हाध्यक्षांबरोबर बैठक घ्यायला हवी होती; मात्र अशी कोणतीही चर्चा त्यांनी केली नाही. ते केवळ इन्सुलीत ठाण मांडून बसले. यातही कॉंग्रेसची एकही सीट न आल्याने सुफडा साफ झाला. यावरून जिल्हाध्यक्षांचे अस्तित्वच नसल्याची टीका अंधारी यांनी केली. 

सक्षम नेत्यासाठी प्रयत्न 
जिल्हाध्यक्ष म्हणून गावडे यांनी ताठ भूमिका घेत आपल्या पक्षाच्या मंत्र्याशी संपर्क साधत विकासकामांचा आराखडा बनवायला हवा होता. नियोजन करायला हवे होते; मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे जिल्ह्यात कॉंग्रेसला बळ देणारा सक्षम जिल्हाध्यक्ष द्यावा यासाठी पक्षश्रेष्ठींचे लक्ष वेधल्याचेही अंधारी यांनी स्पष्ट केले. 

शिवसेनेकडून कॉंग्रेसचा विचारच नाही 
ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेने कॉंग्रेसला सोबत घेतले नाही. चिंदर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत कॉंग्रेसच्या तालुका सरचिटणीस महेंद्र मांजरेकर यांनी तिकीट मागितले; मात्र शिवसेनेने त्यांना तिकीट नाकारले. परिणामी त्यांनी भाजप पुरस्कृत पॅनेलकडून निवडणूक लढवीत विजय मिळविला. त्यामुळेच चिंदर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेचा पराभव झाल्याचे श्री. अंधारी यांनी सांगितले. 

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com