पोटच्या गोळ्याप्रमाणे जपलेली बाग उद्‌ध्वस्त; सिंधुदुर्गातील देसाई कुटुंबाची व्यथा

पोटच्या गोळ्याप्रमाणे जपलेली बाग उद्‌ध्वस्त; सिंधुदुर्गातील देसाई कुटुंबाची व्यथा

दोडामार्ग - पंचवीस वर्षे कष्टाने उभी केलेली बागायती पुराच्या तडाख्यात उद्‌ध्वस्त झाल्याने नवरा सैरभैर झालाय. मला पोटच्या मुलाप्रमाणे त्यांच्यावर लक्ष ठेवावे लागते. भीतीने रात्री डोळ्याला डोळा लागत नाही, नुकसान बघून आजपर्यंत पोटात अन्नाचा कण गेलेला नाही, असे सांगताना सुहानी देसाई यांचे डोळे डबडबले. त्यांना काय बोलावं हेही सुचले नाही. 

सुहानी या कुडासे-वानोशी येथील सतीश देसाई यांच्या पत्नी. त्यांच्या माड, पोफळीच्या बागायती नुकत्याच आलेल्या पुरामुळे वाहून गेल्या. सुमारे वीस लाख रुपयांचे उत्पन्न पाण्या-मातीत मिळाले. पूर ओसरला, गावागावांतील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले; पण पुराने अनेकांना दिलेल्या जखमा आजही भळभळताहेत. जीवन आणि मृत्यूच्या सीमारेषेवर त्यांच्या जगण्याचे द्वंद्व सुरू आहे. सतीश आणि सुहानी बोलताना ते द्वंद्व त्यांच्या शब्दाशब्दांतून जाणवत होते.

वडील आजारी म्हणून सतीश यांनी दहावीतून शाळा सोडली. त्या दिवसांपासून ते शेतीत राबराब राबताहेत. शेतीत कष्ट करून त्यांनी संसार उभा केला. लग्न केले. दोन मुलांचे शिक्षण ते करताहेत. पक्षाघाताने आई अंथरुणाला खिळलेली आहे. गेली चार वर्षे दोघी नवरा-बायको त्यांची सेवा करताहेत. महिन्याला किमान चार हजार रुपये आईच्या औषधावर खर्च होतो. दोन मुलांच्या शिक्षणाचा, कपड्यालत्त्याचा आणि चौघांच्या औषधपाण्याचा खर्च, सगळं बागायतीवर विसंबून. खर्च वाढला म्हणून त्यांनी कष्ट वाढवले, शेजारच्या शेतकऱ्यांची जमीन लीजवर घेऊन केळी लावल्या.

मशागत, खत औषध, केळीची  रोपे, त्यांना आधारासाठी कणक बांबूसाठी म्हणून विकास संस्थेकडून साडेतीन लाख रुपये कर्ज घेतले. त्यातील तीन लाख बागायतीत घातले. मंडळ जातीच्या पंधराशे केळी लावल्या. नुकत्याच त्या तोडणीस आल्या होत्या आणि तेवढ्यातच पुराच्या तडाख्याने काही क्षणात बाग होत्याची नव्हती करून टाकली. सगळ्या केळी मुळातून उखडून प्रवाहाबरोबर वाहून गेल्या. लागते माड, पोफळी तशाच गेल्या. देसाई कुटुंब उद्‌ध्वस्त झालं. त्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला.

आता मदतीची गरज
जीवन जगवणारे, जीवन फुलवणारे पाणी कधीकधी कसे जीवावर उठते त्याचे ते मूर्तिमंत उदाहरण म्हणावे लागेल. पंचवीस वर्षांपूर्वीचा कष्टाचा आणि उमेदीचा काळ आणि आता पूर्वीच्या शून्याकडून पुन्हा शून्याचा प्रवास नक्कीच कोलमडून टाकणारा आहे. त्यामुळे त्यांना सावरणाऱ्या हातांनी आता पुढे येण्याची गरज आहे.

‘तिलारी’चे अधिकारी जबाबदार
सुहानी म्हणतात, ‘‘केळीचे नुकसान गवे करायचे, वाऱ्याने त्या मोडून पडायच्या; पण कधी तक्रार केली नाही. शासनाकडे भरपाईसाठी हात पसरला नाही. उलट अधिक कष्ट करून नुकसान भरून काढण्याची जिद्द ठेवली; पण आताचे नुकसान कल्पनेपलीकडचे आहे. याला निसर्ग जबाबदार आहे, त्यापेक्षा तिलारी प्रकल्पाचे अधिकारी जबाबदार आहेत. त्यांनी अचानक मोठ्या प्रमाणावर पाणी सोडल्याने नदीने किनारे गिळले आणि बागांसह शेतकऱ्यांना मातीत मिळवले.’’ 

उमेदीचे खच्चीकरण
बागेत फिरताना त्यांच्या मनाची घालमेल, घुसमट स्पष्ट जाणवत होती. मुलाप्रमाणे वाढवलेली बाग आणि झाडे नजरेसमोर नाहीशी होताना बघण्याचे दुःख किती क्‍लेशकारक असेल त्याची कल्पना करणेही अशक्‍य आहे. त्यांच्या शब्दांतून जाणवणारे कारुण्य दोघांची उमेद खच्ची झाल्याचे सांगत होते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com