मळगाव घाटीत दारूच्या बाटल्यांचा खच 

Bottles of liquor in Malgaon valley of Sindhudurg district
Bottles of liquor in Malgaon valley of Sindhudurg district

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - येथील मळगाव घाटीमध्ये तब्बल 30 ते 35 बिअरच्या बॉटल अज्ञाताने फेकल्या आहेत. हा भाग वनहद्दीत येत आहे. वनविभागाने कचरा फेकू नये असल्याचे सूचित केले असतानाही नियमांची पायमल्ली करण्यात येत आहे. नागरिकांत याबाबत मोठी नाराजी व्यक्त होत आहे. 

शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या व वनविभागाच्या हद्दीत येणाऱ्या मळगाव घाटीमध्ये यापूर्वीही अनेकवेळा कचरा फेकण्याचे प्रकार घडले होते. माजगाव, मळगाव आणि सावंतवाडी परिसरातील काही जणांकडून हा प्रकार वारंवार सुरू होता. यामुळे मळगाव घाटामध्ये रस्त्या शेजारी ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना कचऱ्याचे दर्शन होत असे.

या घाटीच्या सौंदर्यालाही बाधा पोहोचत असे. घाटीमध्ये दोन ठिकाणी धबधबे असून येथे ये-जा करणारे काही मोजके पर्यटक थांबत असतात तसेच सेल्फीही घेत असतात. अलीकडेच घाटीतील धबधब्या शेजारी डागडुजीही करण्यात आली होती. यापूर्वी दैनिक "सकाळ' ने दोन वेळा घाटीत कचऱ्याचे साम्राज्य या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केल्यानंतर वनविभागाने कारवाईचा बडगा उगारत मळगाव घाटीत स्वच्छता मोहीम, कचरा न टाकण्याचे, कारवाईचे फलकही तीन ते चार ठिकाणी लावले होते. अलीकडे दोन महिन्यापूर्वी घाटात टाकत असलेल्या एका अज्ञात व्यक्तीला नागरिकांनी पकडून वनविभागाच्या ताब्यात दिले होते. त्याच्यावर दंड आकारून कारवाई केली होती.

पावसाळ्याच्या दिवसात घाटीत कचरा टाकण्याचे फारसे प्रकार झाले नाहीत; मात्र पाऊस आल्यानंतर आता पुन्हा एकदा घाटीत कचरा टाकण्याचे प्रकाराला सुरुवात झालेली दिसून येत आहे. घाटीत नुकतेच अज्ञाताने तुम्हारे 30 बिअरच्या रिकाम्या बाटल्यांचा बॉक्‍स आणून फेकला आहे. सूचना फलकापासून 100 मीटर अंतरावर हा बॉक्‍स आणून टाकला आहे. घाटीतून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांच्या हा बॉक्‍स दृष्टीस पडत असल्याने नागरिकांतून या कृत्याबाबत नाराजी व्यक्त होत आहे.

घाटामध्ये नैसर्गिक संपदा तसेच विविध जीवसृष्टी असल्याने प्लास्टिकचा कचरा काचेच्या बॉटल्स याचा या सर्वांना धोका आहे. दरम्यान, कचरा फेकू नये, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असे फलक वनविभागाने घाटीमध्ये लावले आहेत. वनविभागाने फक्त फलक लावण्याबरोबरच कचरा टाकणाऱ्यांवर मोठ्यात मोठी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे. 

जैवविविधतेला धोका 
घाटीमध्ये याआधीही काचेच्या बॉटल्स टाकण्यात आल्याने घाटात मोठ्या प्रमाणात काचा पसरल्या आहेत. याचा नागरिकांना तसेच घाटीत जैवविविधतेला धोका आहे. नरेंद्र डोंगर आणि मळगाव घाटी येथील जैवविविधतेमुळे प्राणी या दोन्ही ठिकाणी ये-जा करीत असतात. त्यामुळे या कचऱ्याचा धोका या प्राण्यांना असतो. घाटीतून सकाळच्या सुमारास मॉर्निंग वॉकही नागरिक करत असतात त्यांनाही काचा लागण्याचे प्रकार काही वेळा घडले आहेत. 
 

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com