अरेरे...अतिवृष्टीमुळे मोरीपुलाची काय `ही` दशा

 The bridge work was carried away due to rain
The bridge work was carried away due to rain

बांदा (सिंधुदुर्ग) - रोणापाल-आंब्याचेगाळूकडे जाणाऱ्या मार्गावरील मोरीपूलाचा भराव सतत दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे आज वाहून गेला. परिणामी ग्रामस्थांना मुख्य रस्त्यावर येण्यासाठी सुमारे सहा तास प्रतीक्षा करावी लागली. सुदैवाने या पुरात कोणतीही जीवीतहानी झाली नसली तरी निकृष्ट दर्जाचे बांधकाम केल्यानेच हा नवीन मोरीपूल वाहून गेल्याचे उपस्थित संतप्त ग्रामस्थांनी सांगितले. 

तीन-चार दिवसांपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे मडुरा पंचक्रोशीतील नदी, नाले वाहू लागले आहेत. रोणापाल-आंब्याचेगाळू येथे आमदार निधीतून लाखो रुपयांचा निधी खर्च करून मातीच्या भरावाच्या आधारे मोरीपूल बांधण्यात आले. सहा महिन्यांचा कालावधी सुद्धा पूर्ण न होता नियोजनशुन्य कामामुळे मोरीपूल पावासाच्या पुरात वाहून गेल्याचे उपस्थित ग्रामस्थांनी सांगितले.

सद्यस्थितीत हा मार्ग धोकादायक बनल्याने तात्पुरत्या स्वरुपात तरी प्रशासनाने व्यवस्था करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. लोकांची झालेली गैरसोय ही ठेकेदारामुळे झालेली आहे. सदर कामाची चौकशी लावणार असल्याचे सरपंच सुरेश गावडे यांनी सांगितले आहे. 

दिलेल्या हमीचे काय? 
बांधकामावेळी ग्रामस्थांनी सदर माती वाहून जाणार असल्याचे ठेकेदार व प्रशासनास आगाऊ कल्पना दिली होती; परंतु पुलाला कोणताही धोका नसल्याची दिलेली हमी मात्र आज पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याचे माजी सरपंच प्रकाश गावडे यांनी सांगितले. वाहून गेलेल्या पुलाची उपसरपंच पप्या केणी, तलाठी बी. शिंदे, ग्रामसेवक चंद्रकांत शेडगे, तंटामुक्त समिती माजी अध्यक्ष बाबल तुयेकर तसेच शिवा नाईक, सदानंद नाईक आदी ग्रामस्थांनी पाहणी केली.  

संपादन ः राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com