चिपळूण (रत्नागिरी) : यावर्षी हवामानातील लहरीपणामुळे चिपळूण परिसरातील काजू पिकावर विपरित परिणाम झाला आहे. दरवर्षीच्या तुलनेत निम्मे उत्पादनही हाताला लागेल, अशी स्थिती नाही. त्यामुळे ओल्या काजू गरांच्या पहिल्या आवकेलाच शेतकऱ्यांना तेजीतील दर मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू खुलले आहे. बागायतदारांना पैसा मिळवून देणारे नगदी पिक म्हणून आंब्यानंतर काजूची ओळख आहे.
कोकणातील सर्वच भागात या पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. येथील काजूगर अगदी पांढरा, स्वच्छ आणि स्वादिष्ट असल्याने बाजारात मागणी अधिक असते. याचा विचार करून गेल्या काही वर्षात येथील शेतकऱ्यांनी काजूची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. यावर्षी थंडीची चाहूल लागताच काजूच्या झाडांना चांगले मोहरे आले होते. मात्र अवकाळी पावसामुळे काजूचे पिक वाया गेले. यावर्षी उत्पादन कमी असले तरी बियांची मागणी तेवढीच आहे. गेल्यावर्षी एक हजार रुपये किलो दराने ओल्या काजूगराची विक्री झाली होती. याहीवर्षी हजार रुपये किलो दरानेच ओले काजू गर विकले जात आहे.
सुक्या बियांचे दर वाढणार
येत्या काही दिवसांत सुक्या काजूबियांचा हंगाम सुरू आहे. सुक्या बियांचे दर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यापारी अस्वस्थ झाले आहेत. असेल तसा आणि मिळेल तेवढ्या काजूबिया मिळविण्यासाठी व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी पायघड्या अंथरण्यास सुरवात केली आहे. मागील वर्षी ८५ ते ९० रुपये प्रतिकिलोने दर सुरु झाला होता. तो यावर्षी १४५-१४७ रुपयापर्यंत गेला आहे.
"यावर्षी काजू उत्पादनात तुटवडा आहे. सुक्या बियांना उशिरा अधिक दर मिळतो त्यामुळे लोक उशिराने बिया विक्रीसाठी आणतात. सध्या आवक मोठी नसल्यामुळे दर अधिक आहेत. यापुढेही काजू बियांचे दर वाढणार आहेत."
- महादेव पवार, कात्रोळी
संपादन - स्नेहल कदम
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.